Monday, May 3, 2010

आगरातली आगर बोली

शंकर सखाराम
दर्यावरचा कोळी, आगरातला आगरकर-आगरी, माळातला माळी आणि रानातला आदिवासी अशा भौगोलिकदृष्ट्या कोकणातल्या आगरातील वसाहती. आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. (थोडक्‍यात, प्लांटेशन) असे आगर पिकविणारा तो आगरकर-आगरी. या आगरी समाजाची वस्ती रायगड (पूर्वीचा कुलाबा), ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोकण सोडून धुळे, जळगावपासून गुजरातपर्यंत ती तुरळक प्रमाणात आहे. या समाजाची बोली ती आगरी बोली, असे या बोलीचे नामकरण करता येईल, परंतु आगरी ही एक जात समजली जाते. तेव्हा अशी जातीची बोली- आगरी बोली म्हणणे संकुचितपणाचे आहे. शिवाय ही बोली हाच समाज बोलतो असे नाही, तर आगरातील बलुतेदार, आदिवासी यांच्याबरोबर दुकानदार-मारवाडीही प्रसंगपरत्वे ही बोली बोलतात. शिवाय कोळी, माळी हे समाज जवळ असल्याने त्या बोलींची मिश्रता या बोलीत आहे. तेव्हा सर्वसमावेशक दृष्ट्या या बोलीस आगरातील बोली- "आगर बोली' म्हणणे संयुक्तिक वाटते.ही आगर बोली समुद्राकाठची असल्याने हीत उच्चारस्पष्टता हवी तशी नाही. विरार-वसईकडे ही बरीचशी अनुनासिक आहे; तर अलिबागकडे तशी स्पष्ट आहे. ही बोली जवळजवळ प्रत्येक गावानुसार थोडीशी बदलते. मुंबईतील हा मूळ समाज ही बोली विसरला आहे; तर नवी मुंबईतील ही बोली कोळी समाजबोलीमिश्रीत अशी आहे. वसई-पालघरकडे ही बोली वाडवळ, भंडारी बोलीमिश्रीत अशी येते.आगरी समाजाचे पूर्वी 1) शुद्ध आगरी, 2) दस आगरी व 3) वरप आगरी असे पोटजातीत वर्गीकरण होत होते. शुद्ध आगरीत मीठ आगरी, जस आगरी व ढोल आगरी असे उपपोट प्रकार होते. आज मात्र असे प्रकार मानले जात नाहीत. खुद्द मुंबाआईच्या मुंबईत चौदा पाटील, बारा पाटील, आगळे आगरी असे स्तर मानले जात, तेही आता मानले जात नाहीत.आगर बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे "ळ'च्या ऐवजी "ल' व "ण'च्या ऐवजी "न' जसे सकाळ- सकाल, पळव-पलव, कोण-कोन, बाण-बान, वळण-वलन.या बोलीची रूपे व काही शब्द महानुभाव पंथीय व भागवतधर्मीय ग्रंथलेखनात दिसून येतात. विशेषतः लीळाचरित्र, दृष्टांतपाठ व ज्ञानेश्‍वरीत जास्त प्रमाणात दिसतात. आगरात लोकगीते व लोककथा यांचा भरणा जास्त आहे. ही लोकसंपदा म्हाताऱ्या आजीकडून- डोकऱ्यांकडून ऐकायला कर्णमधुर वाटते.गाय बा चऱ्हतं भीमा तीरी गो,भीमा तीऽऽरीगायला राखीत किस्न हरी गो,किस्न हऽऽरीकाय बा वर्नू गायची शेपू गोगायची शेऽऽपू,जशी नांगीन घेतं झेपू गो,नांगीन घेतं झेऽऽपूकाय बा वर्नू गायच्या मांड्या गो,गायच्या मांऽऽड्याजशा पालुखीच्या दांड्या गोपालुखीच्या दांऽऽड्याइथे तेराव्या शतकातील प्राकृत बोलीतील शेपू, नाकू, कानू अशी रूपे साकारलेली दिसतात.आगर बोलीत लोककथा अमाप आहेत. या लोककथा सांगताना अलिबागच्या आगरात नेहमी गोष्टीच्या ओनाम्याला येते ती तीन भावंडांची गोष्ट-अकामकची गोष्टयक व्हता अका, यक व्हात मका. आन्‌ त्या दोघांची यक बह्यनीस व्हती हिजू. त अका, मका आन हिजू गेली खारीन, झोलाला. अकला मिलला निवटा, मकला मिलला खरबा आन हिजूला मिलली कोलबी. तिघाजना आली घरा. अकनी निवटा टाकला चुलीन भुजत, मकनी खरबा आन हिजूनी कोलबी टाकली भुजत. न तिघाजना गेली नदीवर आंग धवाला. तिघाजना आंग धऊनशी आली, त हिजूची कोलबी करापली! मंग अकनी दिला डोचूक, मकनी दिला शेपूट आन हिजूचा जवान केला चालता. अशी तिघाजना जवली.(यक- एक, व्हता- होता, खारीन- खाडीत, झोलाला- मासे पकडायला, निवटा (खरबा, कोलबी)- मासळीचे प्रकार, चुलीन- चुलीत, भुजत- भाजत, आंग धवाला- आंघोळीला, करापली- करपली, डोचूक- डोके, जवान- जेवण, अधिक माहितीसाठी पाहा- "शब्दानुबंध'.कावला-चिरीची गोष्टयकदा कावला आन चिरीनी केली भागीन भातशेती. यलंवर पाऊस परला, आगोठ लागली. कावलनी धरला नांगर, चिरीनी केली भातपहिरनी. यलवर लावनी केली. चांगला पाऊस झाला. मस्त मशागत केली. जाम पीक आला. दोघाही मिलून लानी केली, भांदनी केली. मातर कावलनी यकटनीच मलनी काऱ्हली आन भाताच्या भरल्या बारीक गोनी, पलजीच्या भरल्या म्होट्या म्होट्या गोनी. आन चिरीला बोलला, "चिरबाय, तुल्हा या म्होट्या गोनी घे, मना बारक्‍या गोनी दे. "चिरीनी गोनी हालवून बघितल्या. ती कावलचा कावा समाजली. ती बोलली, "कावलंदादा, माझा बारका जीव मना बारक्‍या गोनी दे, तू म्होटा तुला म्होट्या गोनी घे.' पन कावला काय ऐकना. शेवटी परकरन गेला न्यायाधीसाकरं. त्यांनी केला न्याय आन चिरीला तिचा हिस्सा-वाटा मिलवून दिला. चिरी बोलली, "कावलंदादा, तुझी माझी आथा वाट यगली. तू तुझे वाटन जा, मी माझे वाटन.'दृष्टांतपाठात शोभाव्या अशा किती तरी आगर बोलीत लोककथा आहेत. अशी बोली ऐकताना या बोलीची काही वैशिष्ट्ये नोंदता येतील.1) "ळ' बद्दल "ल'- कंटाळा- कंटाला, नळ- नल, धूळ- धूल.2) "ण' बद्दल "न'- आठवण- आठवन, पण- पन, गोण- गोन.3) शब्दात प्रथम येणारा "ड' तसाच राहतो मात्र नंतरच्या "ड'चा "र' होतो. डबा- डबा, डसा, कडू- करू, वेडा- यरा, तडांग- तरांग.4) शब्दान्ती येणारा ओकार ऊकार होतो- गेलो- गेलू, आलो- आलू.5) ओकारान्त शब्द अकारान्त होऊन पुढे "स' येतो- घेतो- घेतस, मारतो- मारतस, करतस, जातस इ.6) शब्दान्ती "त' ऐवजी "व' येतो- घेतलात- घेतलाव, बघितलेत- बघितलाव, केलाव, तोरलाव इ.7) एकारान्त शब्द अनुस्वारान्त होतो- कुठे- कुठं, तिथे- तिथं, इथं.8) एकारान्त अनेक वचनात आकारान्त होते- झाडे- झारा, पोरे- पोरा, लाकडा, शेता.9) अनुस्वार स्पष्ट उच्चारला जात नाही- आंबा- आऽबा, चिंच- चिऽच, रंग- रऽग, हंडा- हाडा, पिंपळ- पिपल, खुंट- खूट.10) छ चा सर्रास स होतो- छत्री- सत्री, छोटा- सोटा, छोकरा- सोकरा, छगन- सगन, छडी- सरी.11) शब्दान्ती कटोर व्यंजन येऊन तत्पूर्वी व आला तर व चा अर्धा व होऊन त्यापुढे महाप्राण येऊन अन्तीच्या कठोर व्यंजनाचा र होतो- केवडा- कव्हरा, तेवढा- त्यव्हरा, जेवढा- जव्हरा.12) शब्दाच्या सुरुवातीच्या र चा कधी ल होतो- रडतोय- लरतय, रबर- लबर,13) जोड शब्दातील र वेगळा उच्चारला जातो- प्रकाश- परकास, मात्र- मातर, कात्री- कातर, श्रीमंत- शीरीमंत.14) श चा स होतो- शरद- सरद, शाप- सराप, शोध- सोद.15) सुरुवातीचा वि जाऊन त्याजागी इ. येतो- विमान- इमान, विमल- इमल, विषय- इषय, विरजण- इरजन.16) पण ऐवजी पन किंवा बी येते- मीपण- मीपन/बी, तू पण- तूपन/बी (सुद्धा ह्या अर्थाने- तू सुद्दा चल- तूपन/बी चल).17) ऊन, हून प्रत्ययाऐवजी शी येतो- गर्दीतून- गर्दीशी, गावातून- गावानशी, लांबून- लांबशी, गावाहून- गावशी.18) ला प्रत्यया ठिकाणी ल+महाप्राण येतो- तुला- तुल्हा, तिला- तिल्हा. मलाचे मना होते.19) त ऐवजी न येतो- फुलात- फुलान, रानात-रानान, मनात- मनान.20) नो (संबोधन) ऐवजी नू किंवा हू येतो- पोरांनो- पोरांनू/पोरांहू, गाववाल्यांनो- गाववाल्यानू/हू.21) "प्रमाणे' ऐवजी सारा/सारी येते- त्याप्रमाणे- त्या सारा/री मुलाप्रमाणे- मुलासारा, साखरेप्रमाणे- साकरंसारा.22) "होता', "नव्हता' ऐवजी "व्हता', "नता' येते.23) "आता'चे "आथा' होते- आथा कल्हा लरतस?24) "अ'चा सर्रास "आ' होतो- अंग-आऽग, अंतर- आंतर, असा- आसा.25) कशालाचे कन्हाला किंवा कल्हा होते- कन्हाला आलास?26) "वे' ऐवजी "य' येतो- वेडा- यरा, वेस- यस, वेगळा- यगला, वेद- यद, वेसण- यसन.27) "म' ऐवजी "म्ह' येतो- महादेव- म्हादेव, मोठा- म्होटा, मारुती- म्हारोती, महाराज- म्हाराज.28) "ढ' ऐवजी "ऱ्ह' येतो- गाढव- गाऱ्हव, पेढा- पेऱ्हा, कढी- कऱ्ही.29) सुरुवातीच्या "ओ' ऐवजी "व' येतो- ओटा- वटा, ओवा- ववा, ओकारी- वकारी, ओल- वल.30) "ए' ऐवजी "य' येतो- एक- यक, एकदा- यकदा, एवढा- यवऱ्हा.31) शेवटच्या ईऐवजी य येतो- सुई- सुय, रुखमाई- रुखमाय, आई- आय, घाई- घाय, जावई- जावय.32) सुरुवातीचा ऐ कार जाऊन मूळ अक्षरापुढे ई कार येतो- बैल- बईल, म्हैस- म्हईस, वैद्य- वईद, मैल- मईल, खैर- खईर, सैल- सईल.33) सुरुवातीचा औ कार जाऊन मुळाक्षरापुढे ऊ येतो- मौज- मऊज, गौर- गऊर, फौज- फऊज, हौद- हऊद, कौल- कऊल.अशी ही उत्तर कोकणची आगर बोली मराठी सारस्वतात पूर्वी लेखनात न आल्याने फारशी रुळली नाही, पण तशी ही समजण्यास कठीण मात्र नाही. माझ्या कथा, कादंबरी व ललित लेखनातून ही प्रथमच कलात्मकरीत्या मोठ्या प्रमाणात आली आहे. बरोबरच आदिवासी-कातकरी, कोळी, माळी, कोकणी मुसलमानी याही कोकणी बोली माझ्या अनेक पुस्तकांतून आल्या आहेत. जिज्ञासूंनी मुंबई विद्यापीठात अभ्यासास असणारी कादंबरी एसईझेड, घरपरसू, गावदरणी, कोसलन, आगरातली माणसं, बलुतेदार वगैरे पुस्तके पाहिली तर या बोलींचा परिचय होईल.

संगणकावर "सोप्पी मराठी' लिहिण्यासाठी!

मराठीचा संगणकातला वापर सोपा व्हावा यासाठी गेली काही वर्ष वेगवेगळ्या पातळ्यावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे "शोध मराठीचा'तर्फे नुकतीच एक सीडी प्रकाशित करण्यात आली. त्याबद्दल-
----
"शोध मराठीचा' टीम
---
"सोप्पी मराठी'च्या अंतरंगातील काही महत्त्वाच्या गोष्टी1. "हवेवर ओठांनी लिहिले तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे आणि संगणकीय फॉण्टने अर्थातून विहरावे' या "शोध मराठीचा' संशोधनाच्या सिद्धान्ताला अनुसरून निर्माण केलेला पहिला टप्पा म्हणजे "सोप्पी मराठी' होय.2. संगणकात चिरकालीन टिकणारा, मायक्रोसॉफ्ट आणि इतर कंपन्यांच्या विविध ऍप्लिकेशन्समध्ये चालणारा. 100 टक्के मराठी फॉण्ट "गांगल 1'चा वापर "सोप्पी मराठी' या उपक्रमात केलेला आहे. "गांगल 1' फॉण्ट आणि "सोप्पी मराठी' ही जोडगोळी मराठीच्या "आश्‍चर्यकारक सहजसुलभ संगणकीय वापरासाठी' अत्यावश्‍यक ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे. "मराठीच्या संगणकीय प्रमाणीकरणाचा सूत्रधार' म्हणजे "गांगल 1 फॉण्ट + सोप्पी मराठी' होय.3. आपण ध्वनीच्या उच्चारातून जे प्रदर्शित करतो, ते सर्व लेखनातून कागदावर गोंदविता येत नाही. पण "संगणकीय लेखनाचा' उपयोग; त्यानंतर त्यावर करता येणाऱ्या "ऍप्लिकेशन्सच्या ऍटेचमेंटस्‌'च्या संस्कारांसह विविधतेने करता येतो. "सोप्पी मराठी' हा त्यातील एक टप्पा आहे. हा प्रवास इथेच थांबणार नसून मराठीला करता येणाऱ्या "संगणकीय आंदोलनाची' ही सुरुवात आहे.4. स्वर-अक्षर "हवेवर ओठांनी लिहिताना' आपण निव्वळ स्वराचा उच्चार करतो. "अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः' असे स्वर मराठीत आहेत. या स्वरांसाठीची चिन्हे व्यंजनाला लावली, की व्यंजन-अक्षरे बनतात. "व्यंजनाला जोडता येणाऱ्या एका स्वराचे एक चिन्ह एकाच चावीतून संगणकात उमटावे' आणि "प्रत्येक व्यंजनाला योग्य ठिकाणी जोडले जावे', अशी सोय "सोप्पी मराठी'ने केली आहे.5. "इ, उ व ए' यांची दीर्घ रूपे संगणकात गोंदविण्यासाठी "इ'साठीचा रफार, "उ'साठीचा दीर्घ-उकार व "ए'साठीची मात्रा शोधावी लागते. "सोप्पी मराठी'ने या मानसिक त्रासातून मुक्तता देण्यासाठी "इ'चे चिन्ह दोनदा दाबले की "ई', "उ'चे चिन्ह दोनदा दाबले की "ऊ' व "ए'चे चिन्ह दोनदा दाबले की "ऐ' साकारेल, असे घडविले आहे. उच्चारासाठी जिभेचा वापर मेंदूने दिलेल्या आज्ञेनुसार सहजतेने होतो. "की-बोर्डवरील चाव्या आणि आपली मराठी-बोटे' यातील सहजता "मराठीच्या संगणकीय मानसिकतेतून' जाणून "शोध मराठीचा' संशोधनाने "सोप्पी मराठी' घडविली आहे. मराठी भाषेच्या "ध्वनी-वृत्ती'ला तिच्या "कागदी-वृत्ती'पर्यंत देवनागरी लिपी पोचविते. देवनागरी लिपीमुळे मराठीला एक विवक्षित "कागदी-वृत्ती' मिळते. त्यातून निर्माण होणाऱ्या मराठीच्या "संगणकीय-वृत्ती'नुसार तिच्या टायपिंगला आश्‍चर्यकारक सहजसुलभता देण्याचे काम "सोप्पी मराठी' करीत आहे.6. व्यंजनानंतर "र' हे व्यंजन आले, तर ते मराठीत "प्र', "क्र', "ड्र' असे भिन्नपणे लिहिले जाते. त्यासाठी संबंधित चिन्ह व्यंजनाला कसे व कोठे जोडायचे यासाठी टायपिंग करणाऱ्या बोटांना' विचार करावा लागतो. हे सोपे व्हावे यासाठी तशी सोय मूलभूत फॉण्टमध्येच दिली जात असे. "टायपिंग करणाऱ्या बोटांचा विचार' मूलभूत फॉण्टने केल्याने मराठीच्या संगणकीय वापरासाठीची एकूण चिन्हे 94 पेक्षा जास्त भरतात. संगणकाच्या अंतर्गत प्रस्थापित व्यवस्थेचा उपयोग करून घेण्याच्या क्षमतेवर असंख्य मर्यादा येतात. "आजचा संगणक आणि त्यातील विविध रचना', इंग्रजी भाषेच्या ठेवणीला अनुसरून घडविल्या गेल्या आहेत. मराठीने याच पद्धतींचा वापर करण्यावाचून आज तरी दुसरा मार्ग उपलब्ध नाही. मराठी फॉण्टची व्याख्याच "शोध मराठीचा' संशोधनाने बदलली आहे. 100 टक्के मराठी चिन्हे उपलब्ध करणे, "तो चिरकालीन चालण्याची व्यवस्था निर्माण करणे', "संगणकाच्या विविध पद्धतींतून ती व्यवस्थित चालणे अशा असंख्य गोष्टी म्हणजे "मूलभूत फॉण्ट' होय. अशा मराठी "मूलभूत फॉण्ट'च्या "टायपिंग करणाऱ्या बोटांना' सहजसुलभता प्रदान करणे हा त्यानंतर साध्य करता येणारा भाग ठरतो. "टायपिंग करणाऱ्या बोटांना' मराठीचा "गद्य, पद्य व संगीत' यातून साकारणाऱ्या अगणित अर्थ-निर्मितीपर्यंत पोचता यावे, यासाठीची सूत्रे "सोप्पी मराठी'सारख्या तंत्रातून मार्गस्थ करता येतात.7. "सोप्पी मराठी'ने "मराठी टायपिंग सोपे केले' आहे. त्याला "अपडेट'ची जोड द्यायचा विचार आहे.8. "सोप्पी मराठी'मुळे आनंदाने मराठी लिहिणारा समाज निर्माण होईल. मराठी सोपे, सहजसुलभ व आनंददायी ठरेल. मराठी भाषेच्या प्रगतीचा हा महत्त्वाचा टप्पा ठरतो, असे आम्हाला वाटते.-

कविराजांना दिसलेला महाराष्ट्र

डॉ. सुधीर मोंडकर
"महाराष्ट्र' हे नाव उच्चारताच, आमच्या मराठी भाषिक राज्याचा ऐतिहासिक, भौगोलिक नि सांस्कृतिक बाज नजरेसमोर उभा राहतो. पण हाच महाराष्ट्र येथील कविरायांना कसा दिसला? असा त्रिमिती बाज त्यांनी आपल्या काव्यातून रंगवलाय का? की काही वेगळ्या छटा त्यांनी दाखवल्या आहेत?श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या "महाराष्ट्र गीतात' येथील संपन्न भूमीचे दर्शन घडते. गगनभेदी पर्वत, विस्तृत जलायशय, भव्य प्रसाद, संपन्न शेती, चारित्र्यवान माणसांनी वसलेली घरे यांनी महाराष्ट्र बनलाय. विक्रम नि वैराग्य हे याच ठिकाणी नांदतात. जरीपटक्‍याच्या जोडीला भगवा डोलतोय. शक्ती-युक्ती, धर्म-राजकारण यांची विधायक युती झाल्याने महाराष्ट्राची कीर्ति त्रिखंडात पसरलीय. सदर महाराष्ट्र गीताच्या अपूर्व गेयतेमुळे मराठी रंगभूमीवर नांदीचे भाग्य या गीताला लाभले नि ज्याच्या-त्याच्या तोंडी ते घोळू लागले -बहु असोत सुंदर संपन्न की महा।प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा।।कोल्हटकरांचेच पट्टशिष्य राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज हे आपल्या काव्यात महाराष्ट्र रंगवताना म्हणतात, हा देश दगडासारखा कणखर, फुलासारखा कोमल, करवंदीसारखा काटेरी आणि बकुळप्राजक्तांनी फुललेला आहे. बुद्धी व भक्ती यांच्या युतीने तो फुलला आहे. गोदा, कृष्णा, भीमेच्या जलाने महाराष्ट्राच्या पाषाणदेहाला स्नान घातले आहे. डोंगरदऱ्यात वसलेले शिवशाहीचे गडकोट त्याच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत, तर संतशाहीर त्याचे गुणगान आपल्या कवनाद्वारे करत आहेत. या काव्याचा प्रभाव एवढा की, 83 व्या मराठी संमेलनात अमिताभ बच्चनसारख्या अमराठी कलाकाराला ह्या गीताच्या पंक्ती सादर कराव्याशा वाटल्या -मंगलदेशा। पवित्र देशा। महाराष्ट्र देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।"महाराष्ट्र लक्ष्मी' ही विनायकांची कविता. भक्तिभावाने महाराष्ट्राचे गुणगान करताना ते म्हणतात -महाराष्ट्र लक्ष्मी माते जगी धन्य वाटे।यशोगीत तिचे गाता मनी हर्ष दाटे।।असा हा महाराष्ट्र परचक्राने ग्रासलेला, पारतंत्र्यात खितपत पडलेला, दुष्काळाने गांजलेला असला तरी संकटातही ताठ कण्याने मान उंच करून पाहतोय. आपल्या जीवनात महाराष्ट्राने जे दिव्य सोसलेय, त्यामुळे त्याचे भवितव्य उज्ज्वल असणार आहे.महाराष्ट्रात परस्परविरोधी भूभाग पाहावयास मिळतात. कोकणभूमी ही आंबा, सुपारी, साग, नारळ यांनी लगडली आहे, तर घाटावरचा भाग कळकीचे बेट, करवंदी-बाभळ-बोरी यांसारख्या वृक्षराईंनी बहरलेला आहे. अशा भूमीचे स्तवन करताना एक शाहीर म्हणतो -हिरवे हिरवे सारे रानकुठे नागवेली पानकसा पिकला गं गहू हरभरा!हा शाळू मक्‍याचा तुरामहाराष्ट्र देश सुंदरा!डॉ. सुधीर फडके विरचित व शाहीर अमर शेखांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सभांमध्ये आपल्या पहाडी आवाजात पुढील गीत सादर केले-जनतेच्या सत्तेची ज्योत जागती।गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती।।मराठी माणूस मग तो कोकणी, घाटावरचा, नागपूर-विदर्भाचा असो सारे महाराष्ट्रासाठी एक होतात. शेतकरी, कामगार हे सारे जाती-धर्माची बंधने तोडून अन्यायाविरुद्ध लढतात. हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशासाठीदेखील! या "अमर' गीताने साऱ्या महाराष्ट्राला जाग आणली नि संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यास उद्युक्त केले.जानेवारी 1956! संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ऐन रणधुमाळी. समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू झाली. आचार्य अत्रे प्रथम मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातत व नंतर ठाण्याच्या तुरुंगात. त्यांच्या डोक्‍यात त्या वेळी फक्त "संयुक्त महाराष्ट्र' भरला असल्याने दुसरे काही लिहू म्हटले तरी त्यांना लिहिता येईना. गडकऱ्यांच्या या पट्टशिष्याला "महाराष्ट्र गीताचे' अनुष्टुभ सुचले. चार महिन्यानंतर 5 एप्रिल 1956 ला ते तुरुंगातून सुटले, ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी करू अशा आत्मविश्‍वासपूर्ण निर्धाराने! "नवयुग'च्या कचेरीत आल्यावर पुढील महाराष्ट्र गीताने उभ्या महाराष्ट्राला वंदन करून आपल्या वृत्तपत्रीय कामकाजाचा त्यांनी श्रीगणेशा केला-महाराष्ट्र तुझ्या पायी असो साष्टांग वंदन।तुझ्यासाठी झिजो माझ्या देहाचे चंदन।।या गीतात महाराष्ट्र म्हणजे संतांचे माहेर नि वीरांची कर्मभूमी. त्याला निर्मून सारी पृथ्वी धन्य झालीय. या भूमीतील काटेकुटे हे फुलांच्या बिछान्यागत, तर कणीकोंडा हा गोड मांड्यासारखा अत्र्यांना वाटतो. अत्र्यांची ही उत्कट महाराष्ट्रभक्ती म्हणजे न्यारी देशभक्तीच होती, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मत होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे भीष्माचार्य सेनापती बापट यांनी महाराष्ट्र नि भारत यांच्यातील अतूट संबंधाचे वर्णन करताना म्हटलेय -महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले।खरा वीर वैरी पराधीनतेचा। महाराष्ट्र आधार या भारताचा।।महाराष्ट्राने पारतंत्र्यास आपला खरा वैरी मानले. त्यामुळे देशमुक्तीसाठी टिळक, सावरकर, आंबेडकर यांनी आपल्यापरिने प्रयत्न केले. 1962 मध्ये चिनी आक्रमणानंतर तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले आणि संकटग्रस्त भारताला आधार दिला. "भारते जन्म दुर्लभम्‌। महाराष्ट्रे तु अतिदुर्लभ्‌।।' अशा महाराष्ट्रात आपण जन्मलो, म्हणजे किती भाग्यवान!

मायबोली आणि तिच्या भगिनी

रामदास भटकळ
मायबोली किंवा मातृभाषा हा विषय वाटतो तितका सोपा नाही. माझी मातृभाषा कोंकणी, तर माझ्या नातीची बंगाली. माझ्या शालेय शिक्षणात माध्यम इंग्रजी, तर पर्यायी भाषा मराठी. माझ्या वडिलांची कानडी. माझी मुले, नातवंडे मराठीतच वाढलेली; पण स्वेच्छेने इंग्रजीकडे वळलेली. कर्नाटकातले कुटुंब महाराष्ट्रात राहिले, तर एक मातृभाषा, बेंगळूरुला दुसरे, तर दिल्ली, दुबई, लंडन, मेलबर्नला वेगवेगळे हा गुंता कसा सोडविणार.आपल्याला आई एकच, तशी मायबोली एकच, असे मानले तरी आपल्या आईला बहिणी असू शकतात आणि या मावशाच आपल्या बहिणीला आधार देतात हे जाणले पाहिजे. ज्या माध्यमातून आपण आपल्या परिसरातील आणि परिवारातील मंडळींशी संपर्क साधू शकतो याच नव्हे, तर त्या-त्या भाषेसंबंधी प्रेम आणि जागरुकता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मी घरात कोंकणी बोलतो, मित्रमंडळीत मराठी, कार्यालयात इंग्रजी, बाजारातील व्यवहारात हिंदी, क्वचित आंतरराष्ट्रीय व्यवहारात किडूकमिडूक जर्मन. या सर्व भाषांविषयी मला प्रेम आहे. मी बहुभाषिक आहे, याचा मला अभिमान आहे; किंबहुना आपण सर्वच भारतीय बहुभाषिक आहोत अशी माझी समजूत आहे.प्रत्येक भाषा ही अनेक भाषांपैकी एक आहे आणि भाषा-व्यवहाराच्या आवश्‍यकतेनुसार त्या त्या भाषेला महत्त्व आहे याची जाण बाळगली पाहिजे. स्वतःच्या गुजरातीबद्दल अखेरपर्यंत अभिमान बाळगणाऱ्या महात्मा गांधींनी निरनिराळ्या लिपींतील आठ भाषा शिकून घेतल्या आणि त्यांचा योग्य तो उपयोग केला. आपल्याला भाषांच्या जडणघडणीचे काम करताना "शुद्धीकरणा'ची कास न धरता "वृद्धीकरणा'ची ईर्षा बाळगली पाहिजे. मी स्वतः मराठी भाषेसाठी काय केले? मी प्रकाशक. इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन हा माझ्या पोटापाण्याचा व्यवसाय; परंतु वयाच्या सतराव्या वर्षांपासून तो आता पंचाहत्तरीपर्यंत हौसेपोटी आणि वाङ्‌मयासंबंधीच्या प्रेमाने हजाराहून अधिक मराठी पुस्तके प्रसिद्ध केली. मामा वरेरकर-काका-कालेलकर यांच्या पिढीपासून आजच्या मनस्विनी लता रवींद्र, राही अनिल बर्वेपर्यंत शंभराहून अधिक लेखकांची पुस्तके प्रसिद्ध करण्याची संधी मिळाली. इब्सेन-ओनिल, मोलिअर-आनुई, टागोर-गिरीश कर्नाड अशा अनेकांची पुस्तके मराठीत आणली. विभावरी शिरूरकर, गं. त्र्य. देशपांडे, ऊर्मिला पवार अशा निरनिराळ्या प्रकारच्या लेखकांची मराठी पुस्तके हिंदी-इंग्रजीत प्रसिद्ध केली. माझे बंधू सदानंद भटकळ यांनी वाङ्‌मयकोष तयार केला. आता आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे काम हाती घेताना फक्त मराठी नव्हे, तर एकूणच आपल्या भाषा कशा समृद्ध होतील याचे भान ठेवले आहे.

नाते संस्कृत-मराठीचे

"सं स्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासून झाली?'' संत एकनाथांनी एकेकाळी हा प्रश्‍न उपस्थित केला; त्याला वेगळे संदर्भ होते. मराठीसारख्या प्राकृत भाषेला योग्य तो सन्मान दिला जात नव्हता आणि मूठभर विद्वानांना अवगत असणाऱ्या संस्कृतलाच फक्त महत्त्व होते. मराठीच्या रास्त स्थानाचा आग्रह धरतानाही एकनाथांनी किंवा त्यापूर्वी मराठीतून गीतेचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या ज्ञानेश्‍वरांनी संस्कृतला झिडकारले मात्र नव्हते. उलट या दोघांच्याही रचनांमधून संस्कृत भाषेतील शब्दकळेचे मनोज्ञ दर्शन होताना दिसते. मराठी भाषेचे संस्कृतशी असलेले नाते तोडून टाकण्याची भाषा अलीकडे होत असते त्यासंदर्भात हे आठवले.केवळ मराठीच नव्हे; तर बहुतेक भारतीय भाषांचे मूळ हे संस्कृतात असल्याने या सर्व भाषांवर संस्कृतची छाप या ना त्या स्वरूपात दिसते. मग ते शब्द असोत, भाषेची रचना वा व्याकरण असो की लिपी असो, हिंदी आणि मराठी भाषांनी तर संस्कृतची देवनागरी लिपी थेटच स्वीकारली आहे. अर्थात फक्त एवढ्यापुरतेच संस्कृत-मराठीचे नाते मर्यादित नाही. वाङ्‌मयीन परंपरा, काव्यवृत्ते, समास, सांस्कृतिक भोवताल अशा अनेक गोष्टी संस्कृतमधून मराठीत आल्या आहेत. संस्कृत ही उच्चवर्णीयांची, ब्राह्मणांची आणि हिंदूधर्मीयांची भाषा आहे, म्हणून त्या भाषेची परंपरा जाणीवपूर्वक सोडून दिली पाहिजे, तिचा त्याग केला पाहि,जे अशी भूमिका काही जण घेत असतात किंवा मध्यंतरीच्या शैक्षणिक धोरणांमुळे अथवा हेळसांडीमुळे संस्कृतचे अस्तित्व मराठीच्या क्षेत्रातून काहीसे पुसट होत गेल्याने, संस्कृत भाषा हे मराठीसाठी एक ओझेच बनून गेले. या भाषेचे जोखड फेकून द्या, कशाला हवा संस्कृत-मराठीचा संबंध, अशा तऱ्हेची भूमिका डोके वर काढू लागली. ती सोईचीही होतीच. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जेव्हा मराठीचे नवे लेखननियम तयार करण्यात आले, तेव्हा मराठी साहित्य महामंडळाने लेखन थोडे सुलभ करण्याचा प्रयत्न केला. मात्र संस्कृतला पूर्ण झिडकारण्यात आले नाही. कारण या भाषांमधले नाते सहजासहजी पुसून टाकण्याइतके तकलादू नाही.संस्कृतशी मराठीचे असलेले नाते खूप जुने आहे. या नात्याचे ओझे मानण्याचे कारण नाही. उलट संस्कृतला झिडकारून आपण मराठीचेही नुकसान करीत असतो. बरेचसे नुकसान झालेच आहे. संस्कृत भाषा हीच चोरांची भाषा आहे, अशी भावना बाळगली जाते. एके काळी संस्कृत ही उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती; म्हणून तिच्याकडे पाठच फिरवावी ही भूमिका योग्य नव्हे. तसेच संस्कृत ही केवळ धार्मिक भाषा नाही. या भाषेत तत्त्वज्ञानापासून विज्ञानापर्यंत आणि खेळांपासून भाषेच्या गमतीजमतींपर्यंत अनेक रोचक गोष्टी आहेत. आयुर्वेदासारखे आरोग्याला उपयोगी शास्त्र या भाषेत आहे. संस्कृत व्याकरण हे जर समजून घेतले तर बुद्धीला उत्तम खाद्य मिळते. भाषिक रचना समजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. केवळ यासाठीच नाही तर मराठीच्या पोषणासाठीही संस्कृत आवश्‍यक ठरते. मराठी शब्दांची व्युत्पत्ती, व्याकरण आणि भाषिक परंपरा संस्कृतचे थोडेफार ज्ञान असेल तर चांगल्या प्रकारे समजू शकतात. मराठीतील जुने साहित्य अभ्यासण्यासाठीही संस्कृत उपयोगी ठरते. संस्कृतकडे दुर्लक्ष म्हणजे मराठीचीही एक प्रकारे उपेक्षाच होय. संस्कृत एकेकाळी उच्चवर्णीयांची भाषा असेलही; पण आधुनिक शिक्षणाने ही भाषा सर्वांना खुली केली आणि दलित वर्गातही संस्कृत भाषेचे विद्वान निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अशांपैकी एक होते. उगाच जातीचा आणि भावनिक मुद्दा पुढे करून संस्कृतला विरोध करणे अत्यंत अयोग्य आहे.संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठीत जसेच्या तसे वापरले जातात. इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये ते वापरले जातात. प्रमाण मराठीचे नियम तयार करताना संस्कृत शब्दांचे स्थान विशेष लक्षात घेतले आहे. भाषेचे पोषण आणि विकास होण्यासाठी प्रमाणीकरण आवश्‍यकच असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि मराठीचे प्रमाणीकरण करताना संस्कृतचा आधार घेणे अपरिहार्य ठरते. भाषेच्या सर्व परंपरा सोडून देऊन भाषेचा विकास करता येत नसतो. संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठीत जसेच्या तसे आहेत तरीही असे कैक शब्द आपण मराठीत वेगळ्या प्रकारे लिहितो, म्हणजे तसे अधिकृतपणे स्वीकारण्यात आले आहेत. अशा तऱ्हेचे काही शब्द बघू. ऱ्हस्व, आल्हाद, आव्हान, चिन्ह, वन्हि, जान्हवी, प्रल्हाद, मध्यान्ह हे शब्द मराठीत याच पद्धतीने लिहिले जातात आणि हे सारे मूळ संस्कृत शब्दच आहेत. पण संस्कृतमध्ये ते पुढीलप्रमाणे लिहिले जातात - हृस्व, आह्लाद, आह्वान, चि, व,ि जावी, प्रह्लाद, मध्या. म्हणजे या आणि अशा तऱ्हेच्या इतर अनेक शब्दांबाबत आपण मराठीत त्यांचे स्पेलिंगच बदलून टाकले आहे. हिंदी भाषेत मात्र हे शब्द संस्कृतप्रमाणेच लिहिले जातात. ब्राह्मण हा शब्द तेवढा मराठीत मूळ पद्धतीने लिहिला जातो. खरे तर हाही अपवाद करण्याचे कारण नाही. असो. लिखित भाषेप्रमाणे अर्थाच्या दृष्टीनेही मराठीत काही संस्कृत शब्दांचे अर्थ बरोबर उलटे आहेत; तर काही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. इतरही भारतीय भाषांमध्ये हा प्रकार आढळतो. संस्कृतमध्ये परोक्ष आणि अपरोक्ष असे दोन शब्द आहेत, ज्यांचा अर्थ अनुक्रमे आहे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. पण मराठीत या शब्दांचा प्रयोग बरोबर उलटअर्थी केला जातो. संहार या शब्दाचा, विध्वंस अशा अर्थासोबतच गोळा करणे असाही एक अर्थ संस्कृतात होतो; तर मराठीत विनाश अशा अर्थानेच फक्त तो वापरला जातो. कटू हा शब्द संस्कृतात कडू आणि तिखट असे दोनही अर्थ (या शब्दाचे इतरही अनेक अर्थ आहेत) घेऊन येतो. मराठीत मात्र कटू म्हणजे कडू आणि तिक्त म्हणजे तिखट; तर संस्कृतात तिक्त म्हणजे कडू. मराठीत कटू वचनांनी घायाळ करणे किंवा कटू बोलणे, एखाद्याला झोंबणे असे शब्दप्रयोग केले जातात; तेव्हा मात्र संस्कृतमधील कटू या शब्दाचा तिखट हा अर्थच अभिप्रेत असतो! इतरही भाषांमध्ये अशी उदाहरणे दिसतातच. सत्कार शब्दाचा मराठीतील अर्थ आहे सन्मान; तर बंगालीत सत्कार म्हणजे अंत्यक्रिया. मल्याळीत कल्पना म्हणजे आज्ञा, अपेक्षा म्हणजे विनंती, प्रसंग म्हणजे व्याख्यान, वासना म्हणजे फुलाचा सुगंध. सर्वच भाषांमध्ये संस्कृत शब्दांचे प्रचलित अर्थ असे वेगवेगळे आहेत. शोधले तर अशा खूप गोष्टी सापडतील. भाषेच्या अशा गमतीजमती असतातच. त्यांची माहिती होण्यासाठीही संस्कृतशी थोडी जवळीक हवी.आपण अनेकदा इंग्रजी भाषेतील वचने सहजगत्या वापरतो. वास्तविक संस्कृतमधील सुभाषितांना तोड नाही, त्यातली मार्मिकता आणि अल्पाक्षरी सौंदर्य मराठीजनांना खरे तर परके नाही. संस्कृतची धार्मिकतेशी घातलेली सांगडही या भाषेला मर्यादित करून टाकते. संस्कृतमध्ये विविध विषयांवरील लिखाण असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. संस्कृत साहित्यविश्व तर अफाट आहेच. मराठीलाही त्याचा वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करण्याऐवजी त्याची उपेक्षा केली जाते, हे खेदजनक आहे.प्रमाण मराठीसाठी संस्कृतचा आधार पूर्णपणे सोडून देणे योग्य ठरणार नाही. कोणत्याही शब्दाचा विचार हा स्वतंत्रपणे होऊ शकत नाही, कारण प्रत्येक शब्दामागे काही परंपरा, एखादा धागा असतो. भाषेच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर तिचा वापर करणाऱ्या सर्वांनाच ही जाणीव असली पाहिजे. संस्कृत भाषेसाठी आणि तिच्या मराठीशी असलेल्या संबंधांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे. अलीकडे उत्तरांचलमध्ये असे प्रयत्न होताना दिसते. तिथे संस्कृतला द्वितीय अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. तिथे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. संस्कृतला एवढे प्रोत्साहन देण्यामागची त्याची काही विशिष्ट कारणे असतीलही; पण त्यामुळे तिथे संस्कृतकडे अधिकाधिक विद्यार्थी आकर्षित होत असून दलित वर्गातील मुलामुलींचा त्यात मोठा समावेश आहे. संस्कृत व्याकरण, त्या भाषेतील शब्दांचा वापर या गोष्टी नव्या पिढीत या भाषेबद्दल रुची निर्माण करणाऱ्या आहेत. आजच्या पिढीतील निरीश्वरवादी लोकांना किंवा तरुणांना संस्कृतमधील धर्मग्रंथांशी काहीच देणेघेणे नाही. पण एक भाषा म्हणून तिच्यात ते अतीव रस घेतात, असा तिथला अनुभव आहे. संस्कृतमुळे प्रादेशिक भाषांची समजही वाढते, हा फायदा आहेच. एक भाषा म्हणून मराठी अधिक सशक्त व्हावी म्हणून संस्कृतशी असलेली तिची नाळ तुटता कामा नये.
नंदिनी आत्मसिद्ध
nandini atmasidh@rediff.com

मराठी बोलण्याची सवय जिभेला लावण्याची गरज

जगदीश खेबुडकर
मराठी ही आपली मातृभाषा आहे. आईची भाषा म्हणूनच तिच्याकडे पाहिले पाहिजे. त्यामुळे ज्याप्रमाणे आईला विसरू नये, त्याप्रमाणे आईचा दर्जा असणाऱ्या आपल्या भाषेलाही विसरू नये. आपल्या भाषेचा नम्र आदर असला पाहिजे. "मराठी बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके...' असे खुद्द ज्ञानेश्‍वरांनीच आपल्याला सांगितले आहे. त्यांचा वारसा आपण चालविला पाहिजे. मला स्वतःला मराठीविषयी प्रचंड अभिमान आहे. मी मराठी शिक्षक म्हणून 35 वर्षे विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्याचे काम केले आहे. त्यामुळे मला मराठी भाषेची, मराठी काव्याची विशेष आवड आहे. वेद वाङ्‌मयातील तत्त्वज्ञान सांगणारी सर्व मराठी भाषांतरे मी खरेदी केलेली आहेत. माझे स्वतःचे मराठी वाङ्‌मयाचे छोटे वाचनालय आहे. आज मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे. त्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले पाश्‍चिमात्यांचे संस्कार आपण आजही सोडलेले नाहीत. ते तसेच आपण चालवीत आहोत. पुढे जाण्यासाठी आयुष्यात मोठे होण्यासाठी इंग्रजी आवश्‍यक आहे, असे उगाचच भासविले जात आहे. त्यामुळे पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालत आहेत. या विचारप्रणालीमुळे मराठी भाषा गौण मानली जात आहे आणि इथेच मराठी माणूस चुकत आहे. इतर भाषा शिकण्यास माझा कोणताही आक्षेप नाही. प्रगती व गरजेसाठी इतर भाषाही शिका; मात्र त्या सहभाषा म्हणून शिका. मराठी भाषा झाडाचे खोड आणि त्यांच्या फांद्या म्हणजे इतर भाषा हा दृष्टिकोन ठेवा. मराठी भाषा अत्यंत प्रगल्भ, समृद्ध आहे. त्यामुळे तिची उच्चार पद्धतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे; मात्र आजकाल चुकीचे उच्चार केले जात आहेत. शासनानेही अनुच्चारित अनुस्वार लिहायची गरज नसल्याचा निर्वाळा दिला आहे; मात्र त्यामुळे शब्दांच्या उच्चारावर परिणाम होत आहे. शासनाने विचार करून असे निर्णय घेणे गरजेचे आहे. मराठी ही समृद्ध भाषा असल्यामुळे तिची शुद्धता अबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे. मराठी बोलीभाषेतील काही बदल ठीक आहेत; मात्र मराठीचा मूळ स्वभाव तसाच राहिला पाहिजे. अलीकडे मराठीवर हिंदी, इंग्रजी भाषांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे एका 10 शब्दांच्या वाक्‍यात एखाददुसरा शब्द मराठी व सरसकट हिंदी, इंग्रजी घुसडण्याचे प्रमाण अधिक आहे. हे चुकीचे आहे. मराठी भाषा खरेच इतकी दुबळी नाही; मात्र आपणच तिच्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. मराठी जपण्यासाठी, वाढविण्यासाठी मराठी माणसांनी क्रियाशील राहणे गरजेचे आहे. मराठी ही समृद्ध भाषा आहे. मराठी शब्दांना अनके पर्यायी शब्द आहेत. त्यांची माहिती घेऊन त्यांचा वापर वाढविला पाहिजे. मराठीचा खोलवर अभ्यास झाला पाहिजे. मराठी बोलण्याची सवय जिभेला लावली पाहिजे. वेगळे काम, वेगळा उपक्रम म्हणून मराठीचा अभ्यास झाला पाहिजे. वेगळे कार्य म्हणून ते हाती घेतले पाहिजे. आद्य कर्तव्य म्हणून मराठीच्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रथम घरात, कुटुंबात मराठी रुजले पाहिजे. मी अनेक मराठी माणसांना अस्खलित मराठी बोलताना पाहिले आहे. जर इतर भाषक माणसे मराठीत बोलतात, तर आपण मराठी माणसे मराठीत का बोलत नाही? याचा विचार केला पाहिजे. मराठी बोलण्याने कोणतेही नुकसान होत नाही. मग मराठी बोलणे आपण का टाळतोय? मराठीकडे का दुर्लक्ष करतोय? याउलट बोलीभाषेत, व्यवहारात मराठीचा वापर वाढविला पाहिजे. मराठी बोलण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. तसेच इतरांनीही मराठीतच बोलावे, असा अट्टहास ठेवला पाहिजे. इतरांना मराठीत बोलण्यास भाग पाडले पाहिजे. सरसकट मराठीचा वापर वाढविल्यास मराठी रुजेल.
(शब्दांकन ः माधवी यादव-पाटील)

आमची घोषवाक्‍यंही मराठीतच!

रवींद्र प्रभुदेसाई,
व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्‍टस्‌ प्रायव्हेट

मराठी टिकविण्याची चर्चा करताना त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. मराठी माणूस जागतिक पातळीवर पोचला, तर त्याची भाषाही मोठी होईल; पण तुम्ही कुठेही गेलात तरी स्वभाषेचा अभिमान बाळगणं, तिच्या वृद्धीसाठी प्रयत्न करणं ही त्यासाठीची पूर्वअट आहे.

मराठी भाषा वैश्‍विक आहे; ती आपल्याला विश्‍वकल्याणाची, आनंदी राहण्याची प्रेरणा देते. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकवते. मराठी संस्कृती मराठी माणसावर सात्त्विकतेचा संस्कार करते. त्यामुळेच अत्युच्च प्रेरणा देणारी ही मराठी भाषा व संस्कृती जगभर पोचवली पाहिजे. त्यासाठी मराठी माणसांनी आत्मविश्‍वासाने आपल्या गुणांच्या, कर्तृत्वाच्या जोरावर आर्थिक सत्ता आपल्या हाती घेतली पाहिजे. मराठी भाषेची, मराठी माणसांची वेगळी अशी ठळक वैशिष्ट्ये आहेत. मराठी माणूस सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहे. शिवजी महाराजांसारखा राजा, ज्ञानेश्‍वरांसारखे महाकवी याच संस्कृतीतील आहेत. मराठी भाषा, मराठी साहित्य खूप समृद्ध आहे. इटलीतील एका भाषाशास्त्रज्ञाने मराठी व इतर भाषांच्या अभ्यासातून मराठी भाषेची शास्त्रीय माहिती सांगितली आहे. त्यानुसार मराठी शब्द, मराठीतील वर्णमाला प्रत्यक्ष उच्चारांतून घडते. या उच्चारांमुळे मराठी भाषा बोलल्यामुळे आरोग्यही सुधारते. याला शास्त्रीय आधारही आहे. हेच मराठी भाषेचे वेगळेपण आहे. मराठी ही जगातील एकमेव अशी भाषा आहे. संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे. त्यामुळे या भाषेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तिचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. पंचमहाभुतांची शक्ती येण्याचे सामर्थ्य मराठी भाषेमध्ये आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अभ्यास करून तिच्या मुळापर्यंत गेले पाहिजे.यासाठी चांगले मराठी साहित्य, काव्य, संत वाङ्‌मय आठवड्यातून एकदा तरी वाचले पाहिजे. आपल्या पूर्वजांची चरित्रे वाचली पाहिजेत. चांगले संदर्भ ग्रंथ आपल्या घरामध्ये असले पाहिजेत. मराठी भाषेविषयी संशोधने झाली पाहिजेत. नवनवीन मराठी शब्द आणले पाहिजेत. यासाठी मराठी कवी संमेलने, कथा संमेलने भरविली पाहिजेत. मराठी संगीत, नाटकांमधून मराठी समृद्ध होते. त्यामुळे अशी नाटके आली पाहिजेत. विविध विषय हाताळणारे मराठी चित्रपट निर्माण झाले पाहिजेत. हे सर्व करीत असताना इतर भाषांचाही स्वीकार करणे गरजेचे आहे. संकुचित दृष्टिकोन न ठेवता इतर भाषांमधील तत्त्वज्ञान, उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी हिंदी, इंग्रजी यासारख्या भाषांमध्येही पारंगत असले पाहिजे. हिंदू संस्कृती, मराठी चिरकाल टिकविण्यासाठी इतरांचे अंधानुकरण टाळले पाहिजे. मराठी भाषा सर्वोच्च स्थानावर पोचवली पाहिजे. यासाठी मराठी माणसाने आपले कर्तृत्व सिद्ध करून स्वतः सर्वोच्च स्थानावर पोचले पाहिजे. मराठी माणून आपल्या गुणांच्या जोरावर यशस्वी झाल्यास इतर भाषक आपोआपच आपल्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आपल्या भाषेचा अभ्यास करतील. मी स्वतः माझ्या उद्योगाच्या माध्यमातून मराठी भाषा जगभर पोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माझ्या पितांबरी या उत्पादनाच्या स्लोगन्सदेखील मी मराठीतूनच बनविल्या आहेत. त्यासाठी मराठीमधूनच जाहिराती तयार केल्या आहेत. मराठी उत्पादन आंतरराष्ट्रीय दर्जावर पोचविण्यासाठी नवनवीन प्रयोग मी राबवीत आहे. माझा बहुतेक सर्व कर्मचारीवर्ग महाराष्ट्रीय आहे. आम्ही हिंदू, मराठी सणांच्याच सुट्या घेतो. दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त मराठीचा वापर करतो. बाहेरच्या राज्यांतील अपवाद वगळता आमचे कामाविषयीचे सर्व पत्रव्यवहार मराठीतूनच केले जातात. म्हणूनच मला असं वाटतं, की मराठी माणसाकडे नेतृत्वक्षमता आल्यास मराठीचा प्रसार वाढेल. त्यासाठी अहंकार, स्वार्थ यासारखे अवगुण बाजूला ठेवून तुकाराम, रामदास, ज्ञानेश्‍वर यासारख्या संतसाहित्यातून प्रेरणा घेत आपल्यातील चांगलं इतरांपर्यंत पोचवलं पाहिजे. आपल्या प्रत्येक कार्याच्या सिद्धीसाठी त्या त्या देवतांचं स्मरण करीत भक्ती व श्रद्धेने मराठी बाणा सर्वदूर नेला पाहिजे. -
शब्दांकन माधवी यादव-पाटील

मराठी भाषेला मरण नाही...

अजित कडकडे
"अलीकडे पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करणे ही एक प्रथा झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे राहण्याच्या नादात त्यांचीच भाषा बोलणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जाते. प्रत्येक जण या प्रथेत वाहवत चालल्याने भाषेची भेसळ होत आहे. भाषेची ही भेसळ प्रथम थांबविली पाहिजे. मराठी माणसांनी आपल्या प्रांतावर, मराठी माणसांवर व मराठी भाषेवर प्रेम केले पाहिजे. आपली आपल्या मातीवरची, आपल्या लोकांवरची, भाषेवरची निष्ठा डळमळल्यास प्रगती होणे अशक्‍य आहे.''
----------------
मुंबई ही मराठी माणसांचीच आहे, याबद्दल कुणाचेही दुमत नसावे. बाहेरून येणारे लोक नंतर येथे आले आहेत, हे त्यांनी विसरू नये. त्यामुळे मुंबईवर प्रथम मराठी माणसांचा हक्क आहे. आता इथल्या मराठमोळ्या भाषेचा विचार केल्यास ती मूळातच समृद्ध भाषा आहे. अगदी परदेशातही तिने आपला झेंडा फडकवला आहे. थोडक्‍यात, तुम्ही जगात कुठेही गेलात तरी मराठी भाषेला मरण नाही. त्यामुळे तिला कुणाकडूनही अपाय होऊच शकणार नाही. मात्र हे जरी सत्य असले तरी मराठी भाषिकांनी तिचा अभिमान बाळगलाच पाहिजे. त्यांनी मनापासून मराठी भाषेवर निष्ठा ठेवली पाहिजे. माझी जन्मभूमी गोवा आहे. मात्र मी गायनासाठी मुंबईत आलो आणि इथलाच एक भाग बनून गेलो. मी माझे गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून मराठीतूनच गायनाचे धडे गिरवले. मराठी गीते, मराठी संगीत शिकताना मला तिची गोडी लक्षात आली. त्यामुळे माझे मराठी भाषेवर अत्यंत प्रेम आहे. या भाषेविषयी मला प्रचंड अभिमान आहे. मुंबई ही महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या माणसांना प्रत्येक गोष्टीत पहिले स्थान दिले गेले पाहिजे. मराठी माणसांना डावलून इतर लोकांना नोकऱ्या देणे अयोग्य आहे. मराठी माणसांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मराठी माणूस मागे पडत आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राबाहेरील प्रांतांत ज्याप्रमाणे स्थानिकांना प्राधान्य दिले जाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रानेही ही भूमिका घेतली पाहिजे. अलीकडे पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करणे ही एक प्रथा झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे राहण्याच्या नादात त्यांचीच भाषा बोलणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जाते. प्रत्येक जण या प्रथेत वाहवत चालल्याने भाषेची भेसळ होत आहे. भाषेची ही भेसळ प्रथम थांबविली पाहिजे. मराठी माणसांनी आपल्या प्रांतावर, मराठी माणसांवर व मराठी भाषेवर प्रेम केले पाहिजे. आपली आपल्या मातीवरची आपल्या लोकांवरची, भाषेवरची निष्ठा डळमळल्यास प्रगती होणे अशक्‍य आहे. त्यामुळे आपल्या भाषेवर निष्ठा ठेवली पाहिजे. मराठी संगीत, संगीत नाटके, गायन आदी कलांच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी संगीत नाटकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. सध्या आपल्या रोजच्या बोलण्यात सर्रास इंग्रजी, हिंदी शब्द मोठ्या प्रमाणात येतात. हे टाळण्यासाठी बोलीभाषेत जाणीवपूर्वक मराठी शब्दांचा वापर केला पाहिजे. भाषी कधीच कमी पडत नाही तर आपणच नकळच तिच्याकडे दुर्लक्ष करून तिचा अवमान करीत असतो. याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अर्थात जिथे गरज आहे तिथे इतर भाषांचा वापरही तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र हे करताना विनाकारण मोठेपणासाठी इतर भाषांच टेंभा मिरविणे अयोग्य आहे, हेही विसरून चालणार नाही.
शब्दांकन ः (माधवी यादव-पाटील).

वेळ पडल्यास मराठीची सक्ती करा...

अभिनेते संजय मोने
मराठीला कुणी गृहितच धरत नाही, त्यामुळे मराठी भाषेवरून जे राजकारण चालू आहे त्यात काही वाईट आहे असं मला तरी वाटत नाही. हां आता ते योग्य की अयोग्य ही नंतरची गोष्ट आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि कोणी तरी तिच्यासाठी लढतंय हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. राज ठाकरे मराठी भाषेचं राजकारण करतायत असं बोललं जातं; मात्र त्यात शंभर टक्के राजकारण असेल का? राज ठाकरेंना मिळणारा पाठिंबा पाहता ते मराठीचं राजकारण करीत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यामुळे उगाचंच काही तरी आरोप करून त्याला मोडता घालण्यात काहीच अर्थ नाही. आता त्यांचा मार्ग कसा आहे हे काळ ठरवेल. मुळात राजकारणी लोक निष्क्रिय असतात हा सर्वसामान्य समज आधी बदलला पाहिजे. मला तरी असं वाटतं, की प्रत्येक राजकीय व्यक्तीला काही तरी तळमळ असते, त्यामुळेच तो एखाद्या मुद्द्यासाठी लढा उभारतो; त्यामुळे जे लोक काही करीत नाहीत ते लोकच एखाद्या मुद्द्यावरून राजकारण केलं जातंय असा बोभाटा करतात.मराठीचा वापर वाढलाच पाहिजे. त्यासाठी सक्ती करावी लागली तरी चालेल. सामाजिक स्वच्छतेइतकीच सांस्कृतिक स्वच्छता गरजेची आहे. अर्धवट इंग्रजी, अर्धवट हिंदीत कुणी नम्रतेत बोलत असेल तर त्यापेक्षा मराठीत बोलणारा शुद्ध माणूस मला जास्त आवडेल. भाषावार प्रांतरचना जर आपण केली आहे, तर त्या त्या प्रांतात तीच भाषा बोलली गेली पाहिजे. मला सांगा, नागालॅंडमध्ये तेलगू बोलली तर चालेल का? एखाद्या प्रांतात बाहेरून आलेले लोक जास्त आहेत म्हणून ती भाषा बोलण्यात काय अर्थ आहे? या सगळ्याच्या मुळाशी गेल्यास सध्या मराठी आणि हिंदी हा एवढाच वाद शेवटी उरणार आहे; तर मग राजकारणानेच हा प्रश्‍न सुटू शकेल, सामोपचाराने किंवा समाजकारणाने नाही.मी स्वतः जास्तीत जास्त मराठीत बोलतो. शिवाय बाहेरच्या प्रांतात गेल्यावर मी त्या त्या प्रांतातील भाषा बोलतो. त्यामुळे इतर प्रांतातील लोकांनी महाराष्ट्रात येऊन त्यांची भाषा रेटण्याचा प्रश्‍नच येत नाही. जे काम कुणीही करू शकतं त्या कामासाठी इतर प्रांतातील लोक आणल्यास वाद होणारच. मजूरसुद्धा तुम्ही जर बाहेरून आणले तर दुसरे काय होणार? शिवाय महाराष्ट्रीय नोकरीसाठी खळखळ करतात ही ओरड वेगळीच. आपण जर बाहेरच्या माणसाशी बोललो तर तो आवर्जून सांगतो की महाराष्ट्रात आम्हाला जास्त सुरक्षित वाटतं. इथली माणसं त्यांच्याशी समजूतदारपणे बोलतात. इथले लोक टॅक्‍सीवाल्यांशी हिंदीत बोलतात, कारण ते समजूतदार आहेत. त्यामुळे आम्हाला कुणी समजूतदारपणा शिकवण्याचा प्रयत्न करू नये. जर सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी केवळ मराठीतच बोलायचं ठरवलं तर मात्र इतरांना अवघड जाईल हे त्यांनी विसरू नये.मी इतक्‍या देशांमधून नाटकांसाठी, कार्यक्रमांसाठी फिरलो, पण इंग्रजीवाचून माझं कधीच अडलं नाही. जपानमध्ये मात्र इंग्रजी येऊनही माझं अडलं, कारण जपानमधील लोक जपानी भाषेतच बोलतात. माझी मुलगीही इंग्रजी शाळेत जाते; मात्र माध्यम म्हणून ती इंग्रजी भाषा शिकते, पण ती बोलते मराठीतूनच. मध्यंतरी मी तिच्या शाळेत गेलो असताना तिच्या शिक्षकांनी मला ती इंग्रजीत बोलत नाही, मराठीतच बोलते असे सांगितले. त्यावर मी त्यांना ती अभ्यासात हुशार आहे ना मग झालं, असं सांगितलं. शिवाय मराठी आहे त्यामुळे ती मराठीतच बोलेलं हे सांगायलाही विसरलो नाही. अर्थात, मी महाराष्ट्रात राहतो, मी मराठी आहे, तर मी मराठीतच बोलेन या जिद्दीने प्रत्येकाने जास्तीत जास्त मराठी बोलले पाहिजे. मराठीचा प्रसार केला पाहिजे.शेवटचा आणखी एक मुद्दा मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो, की केवळ भारत देशच नाही, तर संपूर्ण जग ज्यांना वंदनीय मानत त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचे गुरू गोपाळकृष्ण गोखले हेदेखील मराठीच होत हे सर्वांनी धान्यात ठेवावे. तसेच इतिहासाच्या तीनशे वर्षांच्या राजकारणात दिल्लीनं कधी महाराष्ट्राचं राज्य चालवलं नाही, तर महाराष्ट्रच बहुंताशवेळा दिल्लीचं राज्य चालवतं, हेही विसरून चालणार नाही. यावरूनच महाराष्ट्र व इथली भाषा प्रत्येकाने शिकली पाहिजे आणि ती बोललीही पाहिजे.-
(शब्दांकन ः माधवी यादव-पाटील)

आगरी माणसासारखीच त्याची भाषा


समीर पारखी
"गल्यान्‌ साखली सोन्याची ही पोरी कोनाची' या लोकप्रिय गाण्याशिवाय आजही महविद्यालयातील विद्यार्थ्यांची पिकनिक पूर्ण होत नाही. या गाण्याचे बोल जसे उच्चारासाठी सहज आणि सोपे वाटतात. हे गाणं आहे आगरी बोलीतलं. ही बोलीभाषा असली, तरी ती भारदस्त आणि कणखरही आहे. या भाषेवर कोळी आणि कोकणी भाषेचा काहीसा प्रभाव जाणवतो. 90च्या दशकापासून या समजातील बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आता या समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित आणि उच्चपदावर आढळतात. सध्या खेडेगावात आगरी भाषा बोलली जाते. पण शहरातील सुशिक्षित मंडळी आगरी भाषा अभावानेच बोलतात. ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातील मूळ समाज आगरी आहे.
आगरी शब्दातील मूळ शब्द आगर. आगर म्हणजे भात, भाजीपाला, फुले, मीठ तयार करण्याची जागा. या शब्दावरून आगर पिकविणारा तो आगरी. भातशेती हे या समाजाचे मुख्य उद्दीष्ट. समुद्र, खाडी किनारी हा समाज मोठ्या संख्येने आहे. आगरी लोकांना कुणबी, खारकी अशीही विशेषणे आहेत. आगरी समाजातील शेतकऱ्याला कुणबी या अर्थाने ओळखले जात असे. जुन्या पुस्तकांमध्ये आगरी समाजाचा उल्लेख कुणबी म्हणून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावरील मावळे हे आगरी, कोळी समाजातील होते. पुस्तकांमध्ये आरमारकरी, तराकेवाले असा आगरी समाजाविषयी उल्लेख आहे. अलिबाग, पालघर, डहाणू परिसरातील आगरी समाजाला खारपाटी म्हणूनही संबोधण्यात येते. समुद्र किनाऱ्यापासून दूर राहणाऱ्या समाजाला उथळी म्हटले जाते. आगरी समाजाच्या शुद्ध आगरी, दास आगरी व वरप आगरी अशा पोटजाती आहेत. केवळ मिठाची शेती करून उपजीविका करणारे ते मीठआगरी. पिढ्यान्‌ पिढ्या ढोल वाजविणारे ते ढोल आगरी. बागबगिचे, उद्यानांमध्ये काम करणारे ते जस आगरी म्हणून ओळखले जातात. दास आगरी समाज पालघर तालुक्‍यात आढळतो. उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता प्राप्त केलेला आगरी समाज समाजाविषयी अभिमान बाळगून आहे. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरानुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती ही भाषा बोलतात.
नव्या पिढीला आगरी भाषेविषयी औत्सुक्‍य वाटते. तसेच काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बुशकोट, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफ पॅन्ट, बुशकोट, टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. लग्न समारंभातील हळदीची आणि परंपरागत आगरी भाषेतील गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. कारण आगरी भाषेत लग्न समारंभाविषयीची माहिती या विशिष्ट गाण्यामधून कळायची. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकाला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने शद्ब उच्चार आणि बोलण्याची ढब बदलली आहे. पूर्वी कुटुंबातील महिलेला किंवा बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "दादुस' म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. "इच्या बना' ही शिवी-वजा विशेषणाचा सऱ्हार्स वापर केला जायचा. मात्र आता त्याच्यावर काहीसे र्निबंध आल्याचे जाणवते. किंवा हे वाक्‍य विस्मरणात गेले. आगरी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोली भाषेतून जाणवतो. तर आगरी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोली भाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोली भाषा काळानुरूप बदलत आहेत. नवा बदल या मंडळींच्या अंगवळणी पडत आहे. समाजातील काही तरुण मंडळींनी agrisamaj.com ही वेब साईट सुरू केली आहे. यामध्ये आगरी समाजाविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आगरी समाज ग्लोबल झाला आहे.

Thursday, April 29, 2010

कविराजांना दिसलेला महाराष्ट्र

- डॉ. सुधीर मनोहर मोंडकर

"महाराष्ट्र' हे नाव उच्चारताच, आमच्या मराठी भाषिक राज्याचा ऐतिहासिक, भौगोलिक नि सांस्कृतिक बाज नजरेसमोर उभा राहतो. पण हाच महाराष्ट्र येथील कविरायांना कसा दिसला? असा त्रिमिती बाज त्यांनी आपल्या काव्यातून रंगवलाय का? की काही वेगळ्या छटा त्यांनी दाखवल्या आहेत?श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या "महाराष्ट्र गीतात' येथील संपन्न भूमीचे दर्शन घडते. गगनभेदी पर्वत, विस्तृत जलायशय, भव्य प्रसाद, संपन्न शेती, चारित्र्यवान माणसांनी वसलेली घरे यांनी महाराष्ट्र बनलाय. विक्रम नि वैराग्य हे याच ठिकाणी नांदतात. जरीपटक्‍याच्या जोडीला भगवा डोलतोय. शक्ती-युक्ती, धर्म-राजकारण यांची विधायक युती झाल्याने महाराष्ट्राची कीर्ति त्रिखंडात पसरलीय. सदर महाराष्ट्र गीताच्या अपूर्व गेयतेमुळे मराठी रंगभूमीवर नांदीचे भाग्य या गीताला लाभले नि ज्याच्या-त्याच्या तोंडी ते घोळू लागले -

बहु असोत सुंदर संपन्न की महा।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा।।


कोल्हटकरांचेच पट्टशिष्य राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज हे आपल्या काव्यात महाराष्ट्र रंगवताना म्हणतात, हा देश दगडासारखा कणखर, फुलासारखा कोमल, करवंदीसारखा काटेरी आणि बकुळप्राजक्तांनी फुललेला आहे. बुद्धी व भक्ती यांच्या युतीने तो फुलला आहे. गोदा, कृष्णा, भीमेच्या जलाने महाराष्ट्राच्या पाषाणदेहाला स्नान घातले आहे. डोंगरदऱ्यात वसलेले शिवशाहीचे गडकोट त्याच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत, तर संतशाहीर त्याचे गुणगान आपल्या कवनाद्वारे करत आहेत. या काव्याचा प्रभाव एवढा की, 83 व्या मराठी संमेलनात अमिताभ बच्चनसारख्या अमराठी कलाकाराला ह्या गीताच्या पंक्ती सादर कराव्याशा वाटल्या -

मंगलदेशा। पवित्र देशा। महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।


"महाराष्ट्र लक्ष्मी' ही विनायकांची कविता. भक्तिभावाने महाराष्ट्राचे गुणगान करताना ते म्हणतात -

महाराष्ट्र लक्ष्मी माते जगी धन्य वाटे।
यशोगीत तिचे गाता मनी हर्ष दाटे।।


असा हा महाराष्ट्र परचक्राने ग्रासलेला, पारतंत्र्यात खितपत पडलेला, दुष्काळाने गांजलेला असला तरी संकटातही ताठ कण्याने मान उंच करून पाहतोय. आपल्या जीवनात महाराष्ट्राने जे दिव्य सोसलेय, त्यामुळे त्याचे भवितव्य उज्ज्वल असणार आहे.महाराष्ट्रात परस्परविरोधी भूभाग पाहावयास मिळतात. कोकणभूमी ही आंबा, सुपारी, साग, नारळ यांनी लगडली आहे, तर घाटावरचा भाग कळकीचे बेट, करवंदी-बाभळ-बोरी यांसारख्या वृक्षराईंनी बहरलेला आहे. अशा भूमीचे स्तवन करताना एक शाहीर म्हणतो -

हिरवे हिरवे सारे रान
कुठे नागवेली पान
कसा पिकला गं गहू हरभरा!
हा शाळू मक्‍याचा तुरा
महाराष्ट्र देश सुंदरा!


डॉ. सुधीर फडके विरचित व शाहीर अमर शेखांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सभांमध्ये आपल्या पहाडी आवाजात पुढील गीत सादर केले-

जनतेच्या सत्तेची ज्योत जागती।
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती।।


मराठी माणूस मग तो कोकणी, घाटावरचा, नागपूर-विदर्भाचा असो सारे महाराष्ट्रासाठी एक होतात. शेतकरी, कामगार हे सारे जाती-धर्माची बंधने तोडून अन्यायाविरुद्ध लढतात. हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशासाठीदेखील! या "अमर' गीताने साऱ्या महाराष्ट्राला जाग आणली नि संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यास उद्युक्त केले.जानेवारी 1956! संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ऐन रणधुमाळी. समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू झाली. आचार्य अत्रे प्रथम मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातत व नंतर ठाण्याच्या तुरुंगात. त्यांच्या डोक्‍यात त्या वेळी फक्त "संयुक्त महाराष्ट्र' भरला असल्याने दुसरे काही लिहू म्हटले तरी त्यांना लिहिता येईना. गडकऱ्यांच्या या पट्टशिष्याला "महाराष्ट्र गीताचे' अनुष्टुभ सुचले. चार महिन्यानंतर 5 एप्रिल 1956 ला ते तुरुंगातून सुटले, ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी करू अशा आत्मविश्‍वासपूर्ण निर्धाराने! "नवयुग'च्या कचेरीत आल्यावर पुढील महाराष्ट्र गीताने उभ्या महाराष्ट्राला वंदन करून आपल्या वृत्तपत्रीय कामकाजाचा त्यांनी श्रीगणेशा केला-

महाराष्ट्र तुझ्या पायी असो साष्टांग वंदन।
तुझ्यासाठी झिजो माझ्या देहाचे चंदन।।


या गीतात महाराष्ट्र म्हणजे संतांचे माहेर नि वीरांची कर्मभूमी. त्याला निर्मून सारी पृथ्वी धन्य झालीय. या भूमीतील काटेकुटे हे फुलांच्या बिछान्यागत, तर कणीकोंडा हा गोड मांड्यासारखा अत्र्यांना वाटतो. अत्र्यांची ही उत्कट महाराष्ट्रभक्ती म्हणजे न्यारी देशभक्तीच होती, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मत होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे भीष्माचार्य सेनापती बापट यांनी महाराष्ट्र नि भारत यांच्यातील अतूट संबंधाचे वर्णन करताना म्हटलेय -

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले।
मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले।
खरा वीर वैरी पराधीनतेचा।
महाराष्ट्र आधार या भारताचा।।


महाराष्ट्राने पारतंत्र्यास आपला खरा वैरी मानले. त्यामुळे देशमुक्तीसाठी टिळक, सावरकर, आंबेडकर यांनी आपल्यापरिने प्रयत्न केले. 1962 मध्ये चिनी आक्रमणानंतर तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले आणि संकटग्रस्त भारताला आधार दिला. "भारते जन्म दुर्लभम्‌। महाराष्ट्रे तु अतिदुर्लभ्‌।।' अशा महाराष्ट्रात आपण जन्मलो, म्हणजे किती भाग्यवान!

मराठी अभिमानाचे शिवधनुष्य - 1

"माझ्या मऱ्हाटीची बोलू कौतुके, अमृतातही पैजा जिंके" असं वर्णन करणारी मायमराठी आज कोणत्या स्थितीत आहे? एक मातृभाषा म्हणून ती कितीजणांच्या मौखिक सामर्थ्याचा स्वाभिमान ठरून कितीजण तिला अभिमामानं मिरवतात? कुणी तिला डाऊनमार्केट म्हटल्यानं काही "मराठी" टाळक्‍यांचं डोकं सणकलं नि साकारू लागलं मराठी अभिमानगीताचं स्वप्न... नवे सूर लेऊन नि नवा स्वरसाज चढवून हे गीत आपल्या भेटीस येत आहे 27 फेब्रुवारी या मराठी भाषा दिनी ! त्याचं काऊंट डाऊन सुरू झालेय आतापासून.... या गीताचे एक स्वर शिलेदार संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला हा संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे
--------------------
अभिमानगीताचा जन्म व्हायला नेमकी कोणती घटना कारणीभूत ठरली? कारण एवढं मोठं शिवधनुष्य पेलायला फक्त तात्कालिक कारण पुरेसं होतं, असं वाटत नाही. मराठी भाषेविषयी तुमच्या जाणिवेत-नेणिवेत काही ना काही घडामोडी नक्की घडत असणार. त्याविषयी सांगा.

- कोणतीही घटना घडण्यासाठी एक तात्कालिक कारण असतं आणि एक कारण असतं की जे सतत तुमच्यामध्ये झिरपत राहिलेलं असतं. ते शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी थोडंसं भूतकाळात डोकवावं लागेल. माझं शिक्षण झालं इंग्रजी माध्यमातून. माझा बराचसा मित्रपरिवार हा कॉस्मॉपोलिटिन आणि शिक्षणाची काही वर्ष पाचगणीत घालवली, जिथलं वातावरण पूर्णपणं कॉस्मॉपोलिटिन होतं. पण माझ्या घरात मराठी नि संस्कृतचं वातावरण पहिल्यापासून होतंच. आई-वडिल दोघंही चांगलं मराठी वाचणारे. सहावी-सातवीत असताना मी आईच्या मामांनी लिहिलेली म्हणजेच भा. द. खेर यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या "सेतुबंधन" आणि "कल्पवृक्ष" वाचल्या होत्या. तिथनं मराठी वाचनाची गोडी मला लागली. वाचनाची आवड होतीच. खूप इंग्रजी वाचन तर खूप होतं. पण कॉलेजमध्ये जाईपर्यंत माझ्यावर मराठीचा- मराठी संगीताचा असा कोणताच प्रभाव नव्हता, जितका माझ्यावर हिंदी संगीताचा होता.
भाषेचा काही प्रश्‍न आहे असं काही मला जाणवलं नव्हतं. माझा मराठी शब्दसंग्रह चांगला होता. पण पहिल्यांदा मराठीविषयक जाणिव कॉलेजमध्ये असताना निर्माण झाली. मी कॉलेजला असताना गोनीदांचं "कुणा एकाची भ्रमणगाथा" हे पुस्तक वाचलं होतं. माझ्या जाणत्या वयात वाचलेली ती पहिली कादंबरी. तेव्हा असं वाटलं की, "अरे, हे जे काय सांगताय ते आपल्या आयुष्याशी थेट निगडित आहे आणि आपण मराठी वाचलं पाहिजे. मराठी न वाचून आपलं फार नुकसान होतंय..." याच सुमारास माझी चेतन दातारशी ओळख झाली - नाटकाच्या निमित्ताने. तो रुपारेलची नाटकं बसवायचा. एक वर्ष असा योग आला की, मला एकांकिका लिहावी लागली. तिला बक्षीस मिळालं. दुसऱ्या दिवशी चेतननं मला एनसीपीएला बोलवून घेतलं. म्हणाला,"तुला सर्वोत्कृष्ट लेखनाचं बक्षीस मिळालंय. आता तुला असं वाटतंय का की आपण लेखक झालो?" मला तेव्हा कळलं होतं की काही प्रश्‍नांना उत्तरं द्यायची नसतात. गप्प बसून राहायचं असतं. तसं मी केलं. "तुला लिहायचं असेल तर परंपरा माहिती पाहिजे", असं म्हणत त्यानं शंभर नाटकांची यादी डिक्‍टेट केली. त्यात मराठी-हिंदी नाटकांपासून जागतिक रंगभूमीवरच्या नाटकांचा समावेश होता. त्यानं मला एनसीपीएच्या लायब्ररीची मेंबरशीप बक्षीस म्हणून दिली. आतापासून सुरुवात कर. त्या दिवशी मी पिंटरचं नाटक वाचलं नि त्याची कामाची वेळ संपली. दुसरं नाटक उद्या वाचायचं ठरवून आम्ही एनसीपीएपासून गिरगावपर्यंत चालत चालत गेलो. तेव्हा आम्ही पिंटरच्या नाटकावर तर बोललो, पण "किचकवध" का वाचलं पाहिजे, देवल किती चांगले नाटकककार होते, गडकरींच्या भाषेचं महत्तव काय, तेंडुलकरांनी काय बदल केले, राजीव नाईक काय लिहितो, असा पटच उभारला.
चेतनच्या सल्ल्यानुसार वाचन चालूच होतं. सोबतीला संगीतातले सगळे मित्र होतेच. धडपड चालू होतीच. पुढं माझ्या रचनांचा कार्यक्रम करायचं ठरलं नि माझ्या वडिलांनी त्याला "अमृताचा वसा" असं नाव सुचवलं. सुरेश भटांच्या कवितेतला हा शब्द होता. तेव्हा मी वडिलांना विचारलं की "वसा" म्हणजे काय? ते म्हणाले व्रत ! तेव्हा मला "वा काय नाव सुचलंय", असं बरं वाटलं हतं. पण जेव्हा मी कार्यक्रम केला तेव्हा एका अर्थाने मी माझ्या परंपरेची ओळख करून घेत होतो. कारण त्यात बालकवीपासून ग्रेसपर्यंत अनेक कवींच्या रचनानांना मी नव्यानं चाली लावल्या होत्या. म्हणजे मी आणि माझे मित्र परंपरा समजून घेत होतो. जे चेतननं नाटकाबद्दल सांगितलं होतं, तेच आम्ही एका परीनं कवितांबद्दल- भाषेबद्दल करत होतो. तेव्हापासून कवी, साहित्यिक, गीतकार यांच्याशी माझा संपर्क वाढू लागला. आपला आणि मातृभाषेचा संबंध सखोल हवा, ही जी माझ्या मनात भावना रुजली होती, ती भावना अधिकाधिक फोफावत गेली. रुजली नि वाढतच गेली...

कोण म्हणतो मराठी गाणी डाऊनमार्केट? (भाग 2)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे


तुमच्या मनात मराठी भाषेविषयीची भावना रुजली हे खरं. पण मग भवताली असं काय घडत होतं की ज्यानं तुम्ही अस्वस्थ झालात? अशा कोणत्या घटना घडल्या ज्यांनी मराठी भाषेच्या अस्तत्वावर ओरखडा उमटला?

- मराठी भाषा मनात रुजल्यावर तिच्याबाबत मी अधिक सजग होऊ लागलो. भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज येऊ लागला. उदाहरणच द्यायचं झालं तर दादरसारखं खूप मराठी माणसं असणारं ठिकाणसुद्धा बदलत होतं. म्हणजे फक्त भाषाच नाही, मराठी संस्कृतीचं एक वातावरण असतं तेही हळूहळू बदलू लागलं होतं. मुंबईचं लखनौ झालं तरी काही हरकत नाही पण ज्याची काहीच संस्कृती नाही, असं एक मोनोकल्चरल तयार होऊ लागलं होतं. त्यानं मी प अस्वस्थ होत होतो. नवीन मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला म्हणावी तेवढी गर्दी होत नाही. मराठी माणूस नॉस्टेलजियातच अधिक रमतो. नवीन रचना मराठी प्रेक्षकांना अजिबात आवडत नव्हत्या, असं नाही. पण कार्यक्रमाला एका ठराविक वयाचेच प्रेक्षक असत. दुसरीकडं केदार पंडित, सलील कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, अजय-अतुल, अवधूत गुप्ते, मिलिंद जोशी अशी नवीन रचनाकारांची पिढी तयार होत होती.
झ्या असं लक्षात आलं की माझ्याहून लहान असणाऱ्या मुलांना मराठी बोलण्याचा एक प्रकारचा गंड आहे. आख्ख्या पिढीचा मातृभाषेशी हवा तेवढा संपर्क नाही. साधं उदाहरण घ्या- महाराष्ट्रगीत आणि त्याची किमान माहिती आपल्यापैकी कितीजणांना असते? हे विचार डोक्‍यात येत होतेच. सोबत घडत होत्या अगदी छोट्या वाटणाऱ्या घटना... लग्नासाठी ब्लेझर खरेदीला मी हुतात्मा चौकात गेलो होतो. तिथल्या दुकानातल्या म्हताऱ्या सेल्समनला मराठी माहित असेल या हिशोबानं मी विचारलं की,"ब्लेझर्स कुठं मिळतील?" त्यांनी "ऑ?" केलं. मी पुन्हा विचारल्यावर त्यांनीं माझ्याकडं एक दृष्टिक्षेप टाकला नि दिशा दाखवली. मी वळलो नि त्यांनीं त्यांच्या असिस्टंटला सांगितलं - "नजर रखना!" मग माझ्या ते लक्षात आलं हे केवळ मराठी बोलण्यामुळं झालं. मी काही केवळ या एका घटनेवरून निष्कर्ष काढत नाही. पण मला हा अनुभव आला याचं काय करायचं? असा अपमान कुणाचाही होतो, पण तो का झाला याचा मला तर्क नको का लावायला? हळूहळू ही परिस्थिती मला सगळीकडं जाणवायला लागली. टॅक्‍सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, भाजीवाले... दैनंदिन व्यवहारात मी मराठी बोलतोय म्हणजे चुकीचं करतोय, असा फिल देऊ लागले. त्यात मराठीभाषिकही होते. भाषा टिकायची असेल तर टिकेल नाही तर मरेल, असं काही लोक म्हणतात. त्यांना ते परवडणार असेल मला नाही. कारण मी त्या भाषेत काम करतोय. कारण आपल्यामागं एक परंपरा उभी आहे- मराठीची. मला काहीतरी केलं पाहिजे, असं मला वाटलं, हे या गीतामागचं मूळ कारण.
पहिला मुंबई फेस्टिव्हल 2005मध्ये झाला. त्याच्या उद्‌घाटन सोहळ्यात मी संगीतबद्ध केलेली प्रार्थना 63 मुलांनी म्हटली. त्या पाच मिनिटांच्या प्रार्थनेखेरीज नाना पाटेकरांचं भाषण वगळता मराठीचं एकही अक्षर त्या स्टेजवरून उच्चारलं गेलं नाही. मुंबई कॉस्मोपॉलिटिन शहर असलं तरी तिथं बहुसंख्य मराठी नागरिक आहेत ना? नंतरच्या फस्ट्‌÷िहललाही सगळे मराठी कार्यक्रम नर्दुला टॅंक मैदानावर झाले होते नि इतर कार्यक्रम गेट वेला झाले होते. अगदी काळाघोडा फेस्टिव्हलमध्येही मराठीला स्थान नव्हतं. इंग्रजी वृत्तपत्रांत मराठी सांस्कृतिक जगत कुठं येतच नाही. हल्ली काही इंग्रजी वृत्तपत्रांत या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण 27 फ्रेब्रुवारीच्या मराठी दिवसाचा उल्लेखही फारसा येत नाही. मराठी माणसाच्या विश्‍वात घडणाऱ्या घडामोडींची फारशी दखलही घेतली जात नाही, ही खंतही मनात होतीच.
एका रेडिओ स्टेशनसाठी काम करताना मराठी बेदखल होतेय, हे जाणवून तिथल्या अधिकाऱ्याला विचारलं की, "तुम्ही मराठी गाणी का नाही लावत?" तो म्हणला, "हमारी पॉलिसी हेै." पॉलिसी म्हणजे मुद्दामून अवलंबलेलं धोरण. मी म्हटलं,"काय आहे तुमची पॉलिसी?" तो म्हणाला,"मराठी गाणी लावायची नाहीत." महाराष्ट्रात राहून मराठी गाणी लावायची नाहीत, अशी पॉलिसी आहे? भारतातल्या इतर कुठल्या शहरात अशी पॉलिसी आहे? कोईमतूर ,कोलकत्ता, बंगलोरध्ये त्या त्या भाषेतली गाणी न लावायला तुम्ही धजावाल का?, असं विचारलं. तो फक्त हसला. माझ्या मनात आलं हीदेखील एक प्रकारची हिंसाच नाहीेए का? इथं स्थानिकांना कुणी जुमानत नाही. ही पॉलिसी ठरवून झालेय. मराठी गाण्यांसाठी रिक्वेस्ट आली तरीही ते ती गाणी लावत नव्हते. मी म्हटलं,"मुंबई कॉस्मॉपॉलिटिन आहे, असं म्हणता तरी तुम्ही सर्रास पंजाबी गाणी लावता. मग मराठी लावणार नाही अशी पॉलिसी का?" तो म्हणाला, "आमच्या वरिष्ठांना वाटतं की मराठी गाणं लावलं तर एक डाऊनमार्केट फिल येईल..." हे सगळं घडत असताना मनात विचार आला की आपण काय करू शकतो? मी संगीतकार आहे, मी गाणं करीन. एक मराठी अभिमानगीत असेल, ज्यामुळं काहीही डाऊनमार्केट वाटणार नाही. हे गीत एवढं मोठं करायचं की कुणाची टाप नाही होणार त्याला डाऊनमार्केट म्हणण्याची ! इतर कुणी नाही तरी मराठी माणूस बोलणार नाही. कारण मराठी भाषा जागतिक भाषा आहे. भारत, इस्त्रायल, अमेरिका नि मॉरिशिअसमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी बोलली जाते. एवढंच कशाला नासाने अंतराळात पाठवलेल्या यानात 51 भाषांत रेकॉर्ड केलेल्या भाषेत मराठी भाषेतल्या संदेशाचा समावेश केला आहे. मग ही भाषा डाऊनमार्केट कशी होईल? मधल्या काळात एक प्रसंग घडला व्होडाफोनबाबत. व्होडाफोनची अशी पॉलिसी होती की आम्ही मराठी बोलणार नाही, अशी पॉलिसी होती. अजूनही त्यांच्या काही हेल्पलाइन्स तसेच अडेलतट्ट
ू आहेत. अरेरावी करतात की आम्ही मराठी बोलणार नाही. "अगर आप को अंग्रेजी आती हैं तो उस में बोलिए नहीं तो हिंदी में बात किजिए" असं म्हणायचे. ही कुठली भाषा? असा विचार व्यक्त केल्यावर अनेकजण अनेकपरीनं मला समजावायचा प्रयत्न करतात. भाषा ही माणसाशी निगडित आहेच. ती वेगळी कशी काढणार? "मूळ भाषिकत्व हाच भारताच्या अखंडतेचा मोठा गुण आहे," असं शशी थरूर अलीकडंच म्हणाले होते. व्होडाफोनबद्दल मी ब्लॉगवर लिहिल्यावर व्होडाफोनने आठ दिवसांत मराठीत बोलणं सुरू केलंदेखील !

साकारतंय एक अभिनवगीत... मराठी अभिमानगीत... (भाग 3)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद. मुलाखत- राधिका कुंटे

अभिमानगीत तयार करण्याचं ठरल्यावर कविवर्य सुरेश भटांचीच कविता निवडण्यामागचं नेमकं कारण काय?

- "मराठी अभिमान गीता"साठी मी काही कविता चाचपून बघितल्या होत्या."महाराष्ट्र गीत" त्यापैकी एक. असं लक्षात की "महाराष्ट्र गीता"चा आणि मराठी माणसाचा रोजचा संबंधच उरलेला नाहीये. कर्नाटकचं उदाहरण घ्या. कर्नाटकाची निर्मिती, कानडी भाषेच्या प्रवासाबद्दल खूप लेख, लघुपट, माहितीपट, चित्रपटही आहेत. पण आपल्याकडं "संयुक्त महाराष्ट्र चळवळी"च्या पार्श्‍वभूमीवर असणारी एखादी प्रेमकथाही आढळत नाही. मग तुम्हांला त्या इतिहासाची माहिती मिळणार कशी? तसंच "महाराष्ट्र गीता"बद्दल झालंय, असं मी एका कार्यक्रमात म्हटल्यावर एक बाई म्हणाल्या," ते आहे- गर्जा महाराष्ट्र माझा..." मी म्हटलं, "नाही. बहु असोत सुंदर संपन्न की महा..." बरं ते लिहिलंय श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी हेही माहित नसतं. इतकीही माहिती नाही, असं म्हटल्यावर मग त्याचा संगीतकार नि गायक कोण याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही...
प्रत्येक समाजामध्ये आणि काळामध्ये प्रतीकं ही फार महत्त्वाची कामं करतात. "महाराष्ट्र गीत" आलं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राप्रेमी आहात, असा त्याचा अर्थ होत नाही. पण महाराष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचं, मराठीचा अभिमान व्यक्त करायला हवा. "अभिमान" हा फक्त मिलिटन्टच नसतो. तर तो अत्यंत प्रेमळ असतो. हा अभिमान व्यक्त करण्यासाठी साधनं पाहिजेत. अशा वेळी काही प्रतीकं काम करतात. त्यात संगीत येतं. तसंच "महाराष्ट्र गीता"चं आहे. माझ्या लक्षात आलं की हे गीत कुणालाच फारसं माहित नाही. ते माहित करून घ्यावं, असंही दिसत नाही. या गाण्यात असं काय आहे की ते आपण म्हणतच नाही... खरं तर काही नाही. फार सुंदर कविता आहे ती. पण त्यातली मराठी भाषा आता वापरात नाहीये. "अटकेवरी जेथील तुरंगि जल पिणें" अटक हिंदुस्थानात राहिलं नाही. "तुरंगी" म्हणजे "घोडे" हे माहिती नसतं. पाण्याला आपण जल म्हणत नाही. त्यामुळं ही वापरात नसलेली भाषा आहे. ती पुन्हा आपण सामावून घेऊ शकतो. भाषेच्या संदर्भातच काही वेळा वेगवेगळी विधानं केली जातात. काहीजण म्हणतात मराठी शब्द कठीण असतात. मग आपण इंग्रजी शब्द कसे व्यवस्थित उच्चारतो? उदाहरणार्थ- आपण "डिस्ट्रिब्युशन" म्हणू शकतो. यात आहेत की दोन जोडाक्षरं. मग "वितरण" आपल्याला का बरं अवघड वाटावं? आता बोली भाषेतले शब्दही वापरात आले पाहिजेत. एका व्याख्यानात श्‍याम मनोहरांनी सांगितलं होतं, "हल्ली माझ्यापुढचा एक प्रश्‍न आहे, तो म्हणजे मराठी भाषेमध्ये गंमत येत नाही." त्यावर ते सध्या काम करतायत. हा प्रश्‍न त्यांनी लावून धरलाय. हे वाक्‍य माझ्या डोक्‍यात फिट्ट बसलं होतं. जेव्हा सुरेश भटांचं काव्य मी परत वाचलं, यानिमित्तानं... तेव्हा माझ्या डोक्‍यात चाल निर्माण झाली ती दोन ओळीची... "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी". ही चाल डोक्‍यात बरेच दिवस होती. काव्यनिवडीबाबतचा प्र
श्‍न निर्माण झाला नि हे काव्य पुढ्यात आलं तेव्हा वाटलं की हे करेक्‍ट आहे. एकदम बरोब्बर ! याचाच तर आपण शोध घेत होतो. हेच गाणं का नको घेऊ या? कारण अतिशय ओघवती नि सोपी मराठी भाषा आहे ही... "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. येथल्या नभामधून वर्षते मराठी. येथल्या पिकांमधून डोलते मराठी. येथल्या नद्यांमधून वाहते मराठी. येथल्या चराचरात राहते मराठी." तशा बऱ्याच कविता होत्या डोळ्यांसमोर. उदाहरणार्थ- "मराठी असे आमुची मायबोली.", "माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा" ही कुसुमाग्रजांची. तिचा समावेश या सीडीत करण्यात आलाय. शिवाय "कणखर देशा पवित्र देशा" ही वसंत बापट यांची कविता आणि इतरही अनेक कविता वाचल्या. पण यात भाषेबद्दल सांगणारी कविता नव्हती. तर महाराष्ट्राबद्दल सांगणारी होती. म्हणून मग कविवर्य सुरेश भटांचीच "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी," ही कविता निवडली...



कवितेची निवड झाली. चाल डोक्‍यात आली हे खरं पण फक्त तेवढ्यानं भागत नसतं. मग प्रश्‍न येतो तो पैशांचा. हा प्रश्‍न कसा काय सोडवलात?

- सगळा खर्च मलाच करायला खूप आवडलं असतं. माझ्यासाठी ती आनंदाची नि अभिमानाची गोष्ट होती. पण त्याचा एवढा सगळा व्याप पाहता मी एकट्यानं खर्च करणं अशक्‍य होतं. बरं विषय असा होता की कुठलाही प्रायोजक लगेच तयार झाला असता त्यासाठी. कारण राजकीय दृष्टायसुद्धा मराठीचा विषय ऐरणीवर होता. पण प्रायोजक घेतला तर हे गाणं कमर्शिअल प्रॉडक्‍ट झालं असतं. मनात हेतू होता माणसं जोडायचा नि तेही भाषेच्या निमित्तानं. त्यासाठीचं माध्यम होतं संगीत. समजा दोन हजार लोकांनी पाचशे रुपये दिले - तेही देणगी म्हणून नाही तर सहभाग म्हणून तर? मायकल जॅक्‍सनची सीडी 500 रुपयांना घेतो, तसं भारतात निर्माण झालेलं सगळ्यात भव्य गाणं घ्यावं विकत. माझ्याकडून कमिटमेंट अशी की ती सीडी मी घरपोच पोचती करार. ही कल्पना माझ्या डोक्‍यात आली, तेव्हा माझी एक मैत्रिण समोरच बसली होती. तिच्याशी बोलल्यावर तिनं पटकन हजार रुपये काढून दिले... माझ्या लक्षात आलं की या गोष्टीत ताकद आहे. लोकांनाही वाटतंय की असं काही व्हावसं वाटतंय... मग हे माझ्या कार्यक्रमांतून सांगायला लागलो. मित्रांना फोन केले. म्हणालो, "हे देणगीसाठी आवाहन नव्हे तर या चळवळीत सहभागी होण्याचं आमंत्रण आहे." मला उत्तम प्रतिसाद मिळाला. तरीही ठरवल्याप्रमाणं दोन हजार लोकांकडून पैसे जमवू शकलो नाही. जवळपास साडेतेराशे लोकांकड पैसे गोळा करू शकलो. अजूनही दीड-दोन लाख रुपये कमी आहेत. अर्थात आठ लाख रुपये जिथं जमले तिथं दोन लाख रुपये मला खर्च करायला काहीच वाटत नाही. या संदर्भातली एक आठवण आहे. "मौज" प्रकाशनाच्या कार्यक्रमात सुभाष देसाईं हे ऐकून म्हणाले,"आपण काहीतरी करू या." त्यांनी ते उद्धव ठाकरे यांना सांगितल्यावर लगेच तिसऱ्या दिवशी त्यांनी मला शिवसेना भवनात बोलावून घेतलं. ते म्हणाले, "तुमचा हा प्रकल्प छान आहे. तुमची आमच्याकडून काय अपेक्षा आहे?" मी म्हटलं, "सर, पाचशे रुपये द्या." त्यावर ते हसले. म्हणाले, "मी तुम्हांला अकरा लाख रुपये देतो." तेव्हा माझ्याकडं चाळीस हजार रुपये जमा झाले होते. 10 लाखाच्या बजेटपैकी 11 लाख माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती आणि क्षणभर मला तो मोह झालाही की यामुळं आपले सगळे प्रश्‍न सुटतील. तेही तसंच म्हणाले. त्यांचा हेतू चांगलाच होता. त्यांना प्रकल्प आवडला होता. ते म्हणाले,"तुम्ही कशाला वणवण दारोदार भटकताय? पैसेच हवेत ना तुम्हांला आम्ही देतो. तुम्ही एक मेला हे गाणं आम्हांला द्या." पण माझ्या मनात विचार आला की, "पैसे मिळतील, प्रश्‍न सुटतील. पण मनात जो हेतू आहे लोक जोडण्याचा, तो पूर्णत्वास जाणार नाही. ते शिवसेनेचं गाणं होईल." मी तसं उद्धव ठाकरे यांना सांगितलं. म्हटलं, "सर, तुम्ही पाचशे रुपये दिलेत आम्हांला तर हवेच आहेत." आता राजकारणी नकोत, असं म्हणायचे दिवस गेलेत. कुणालाही बाहेर ठेवायचं नाही. आता सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. म्हणूनच मनसे, शिवसेना, कॉंग्रेसचे - सगळ्यांचेच कार्यकर्ते पाचशे रुपये देतात. अशा प्रकारची ही सगळ्यांची मदत आणखी कुठं मिळणार? ही मंडळीही कुठं एकत्र दिसणार?, असं मला वाटतं. म्हणून मी उद्धवजींना म्हटलं की ,"यात पुढाकार सामान्य माणसाचाच राहावा. तुम्ही पुढाऱ्यांनी आमच्या मागं उभं रहावं. आमची उमेदही वाढेल." ते म्हणाले,"तुमचं म्हणणं मला पटतंय. शिवसेनेकरता हा प्रकल्प मागितला कारण हा चांगला प्रकल्प आहे. आम्हांला आवडलं असतं. पण तुम्ही म्हणाल तशी आम्ही तुम्हांला मदत करू." त्यामुळं मग शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती नि कार्यकर्त्यांपर्यंत
पोचायला त्यांनी मदत केली. अशीच मदत मनसेच्या रमेश प्रभूंनी केली. त्यांनी त्यांच्या परिसरातल्या लोकांना प्रकल्पाची माहिती सांगितली. या गाण्यामध्ये शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा हातभार लागला, जे कोणत्याही व्यासपीठावर शक्‍य झालं नसतं. असं होत होत पैशांचा प्रश्‍न सुटू लागला. ठरवलं होतं त्याच मार्गानं आम्ही जात होतो. पण वेळ लागला. आधी 1मे 2009 रोजी सीडीचं प्रकाशन करायचं होतं, पण तेव्हा अर्धेही पैसे जमले नव्हते. अनेक अडीअडचणी येत गेल्या. शिवाय सगळ्या गायकांपर्यंत पोचेपर्यंतही काही काळ गेला. गायक-वादकांना प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. मग आम्ही चार दिवस मुंबईचा मोठ्ठा स्टुडिओ- आजीवसन स्टुडिओ बुक केला. एखाद्या मतदान केंद्रासारखं चाललं होतं- गायकाला वेळ असेल, तेव्हा त्यानं यावं नि त्याची ओळ गाऊन जावी. तिथल्या फ्लोअर मॅनेजरनं माझा सहकारी मंदार गोगटेला विचारलं की, हा काय प्रकार आहे? एवढे मोठमोठे गायक येतायत नि तुम्हांलाच पैसे देतायत, हे कसं काय? मग त्यालाही सांगितलं. बऱ्याच गायकांनी पैसे तर घेतले नाही, उलट काहींनी पाचशे-पाचशे रुपये काढून दिले होते... 10 नोव्हेंबरला सुचलेल्या या प्रकल्पाला जवळपास सव्वा वर्ष होतंय. साकारतंय एक अभिनवगीत... मराठी अभिमानगीत...

श्रीमंत गाणं (भाग 4)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे


"मराठी अभिमान गीता"चं संगीत कसं आकारलं ?
- मराठी अभिमान गीता"च्या संगीताची प्रक्रिया अतिशय इंटरेस्टिंग होती. आर. डी. बर्मन म्हणायचा की, "चाल केली म्हणजे गाणं होत नाही. त्यावर काही संस्कार करावे लागतात." त्याचाच नेमका शब्द आहे "नर्चर करावं लागतं". तशी संधी या गाण्याच्याबाबतीत आपोआपच मिळाली. कारण वर्षभर एक गाणं करणं हा समृद्ध करणारा अनुभव होता. काय होतं की, तुम्ही ती चाल मनात रेंगाळू देता मनात. पहिल्या दोन ओळी केल्यानंतर खूप वेळ गेला. त्यामुळं चाल मनात रेंगाळत होती. बऱ्याचदा लोकांना वाटतं की हा काहीच करत नाहीये. दोन ओळी करून बसलाय आपला. तर ते तसं नसतं. आपण इतर काही गोष्टी करत असलो तरीही त्याचा विचार सतत आंतरमनात कुठंतरी चालू असतो आणि ते एका क्षणी सुचतं. सुचायला तो एकच क्षण असतो, पण त्याच्यावरचं जे सतत चालणारं काम असतं, ते वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये चालू असतं. तसंच या गाण्याबद्दल झालं, जे शब्दांत सांगणं कठीण आहे. "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी" याचा सूर कसा असावा, यावर विचार झाला. नंतर बऱ्याच लोकांनी गाणं ऐकल्यावर सांगितलं की आमचं रक्त सळसळत नाही हे गाणं ऐकून ! हे रक्त सळसळण्याचं गाणं नाहीच. ते आनंदाचं गाणं आहे. मराठी म्हटल्यावर फक्त शिवाजी नि तलवारच का आठवावी? मराठी ही सुंदर नि प्रेम व्यक्त करणारीही भाषा आहे. सुरुवातीला चाल ऐकल्यावर नि नंतर पूर्ण गाणं बसल्यावर ते ऐकणाऱ्या माझ्या मित्रांना हे पटलं. कारण मला ते मिलिटन्ट होऊ द्यायचं नव्हतं.
"रुपगंधा" या पुस्तकात ही कविता आहे. त्या पुस्तकात जी कविता आहे, त्यात सुरेश भटांनी नंतर चार ओळी वाढवल्या होत्या. त्या ओळी होत्या- "पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. आपुल्या घरीच हाल सोसते मराठी. हे असे कितीक खेळ पाहते मराठी. शेवटी मदांध तख्त फोडते मराठी." या रक्त सळसळणाऱ्या ओळी आहेत. पण "अभिमान गीतात" त्या असाव्यात की नाहीत, याबद्दल माझ्या मनात खूप द्वंद्व झालं. याला मी चाल केली. पण हे गाण्यात घ्यावं का, ते रत नव्हतं. "पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. आपुल्या घरीच हाल सोसते मराठी" या अीो आहेत, चिरंतन राहाव्यात का? अभिमन गीत का करावं, तर ते चिरंतन रहावं म्हणून. ही परिस्थिती सत्य आहेही. पण ती असावी नि रहावी, असं कुणालाच वाटणार नाही. त्यामुळं याबद्दल खूप विचार करून शेवटी मी ते गाळलं. याला दोन कारणं होती- "संयुक्त महाराष्ट्र चळवळी"च्या वेळी ही कविता लिहिली गेलेय. तेव्हा भटांनी या ओळी लिहिल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांनी त्या लिहिल्या. त्यामुळं एका अर्थाने जी मूळ कविता होती तीच ठेवणं मला श्रेयस वाटलं. दुसरं म्हणजे ही परिस्थिती काही चिरंतन नाहीये नि ती नसावीही, म्हणूनसुद्धा मी ध्वनिमुद्रणामध्ये या ओळी घेतल्या नाहीत. मी काही वेळा कार्यक्रमांतून त्या म्हणतो. तेव्हा टाळ्याही पडतात. पण टाळ्या पडू नयेत खरंतर. कारण ही अभिमान वाटावी अशी गोष्ट नाहीये... हा सगळा विचार करताना रात्रीची झोप उडाली होती की लिहिलेल्या ओळी गाळाव्यात का नाही?...
कवितेच्या ओळी गाळण्याबाबतची एक आठवण आहे. कुसुमाजांच्या "पृथ्वीचं प्रेमगीत"ला मी चाल केली होती. त्यातलं शेवटचं कडवं मी गाळलं. ते होतं- "अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्‌, मला ज्ञात मी एक धुलि:कण, अलंकारण्याला परी पाय तुझे. धुळीचेच आहे मला भूषण." पुढं मी कुसुमाग्रजांकडं गेलो असताना त्यांना "नवलाख तळपती"ची चाल ऐकवली. ते म्हणाले ,"वा छान. आणिक काय केलंयस तू माझ्या कवितांपैकी?" मी अगदी घाबरत म्हणालो, "पृथ्वीचं प्रेमगीत" केलंय." ते म्हणाले,"ऐकव." मी ते ऐकवलं. अत्यंत शांतपणं ते ऐकत होते. शेवटचं कडवं न घेता मी गायलो, तेव्हा ते उठले नि मला मिठी मारली. म्हणाले, "फार सुरेख चाल केलेस तू. फक्त एकच विचारू का, शेवटचं कडवं का गाळलंस?" या प्रश्‍नाची मला भीती वाटत होती, कारण आपण कवीसमोरच त्याच्या कवितेचं शेवटचं कडवं म्हटलं नव्हतं. मी म्हटलं, "मी सांगतो. माझं चुकत असेल तर मला सांगा. मला वाटतं की या ओळी तात्पर्यासारख्या येतात. संगीतात एखादी गोष्ट येते, तेव्हा तात्पर्य सांगायची गरज राहत नाही. म्हणून मी ते गाळलं. "गमे की तुझ्या रुद्र रुपात जावे, मिळोनी गळा घालुनिया गळा, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा", याच ओळीवर या गाण्याला सुंदर अंत मिळतो." यावर त्यांनी क्षणभर विचार केला नि म्हणाले, "तुम्ही तसंच ठेवा." तो माझ्या आयुष्यातला खूप काही शिकण्यासारखा अनुभव होता. आपल्या कलाकृतीकडं तटस्थ राहून बघायला या लोकांकडून शिकलं पाहिजे, असं वाटलं. तसाच विचार भटांच्या कवितेच्या ओळी गाळताना येत होता, की असं आपण करू शकतो का? विचारचक्र चालूच होतं. सुरेश भटांचे चिरंजिव चित्तरंजन भट त्यांच्याशी मी याविषयी बोलत होतो. ते म्हणाले, "तू हवं तसं कर." बऱ्याच लोकांशी मी यावर चर्चा केली. उलटसुलट मतं होती. शेवटचं कडवं म्हटल्यावर टाळ्या यायच्या. त्यामुळं जवळच्या मित्रांचं म्हणणं होतं, तू घे
च ते. शेवटी मी निर्णय घेतला की नाही घ्यायचं. तो एक फार कठीण निर्णय होता.
सुरुवातीला जवळपास 120 गायकांची यादी काढली होती. त्यातले 112 गायले. 24 ओळी असल्याने चांगल्या गायकांना तुम्ही पाच-सहाजण मिळून एक ओळ गा, असं सांगण्याची कठीण वेळ माझ्यावर येणार होती. सगळ्यांच्या सोलो ओळी नाही ठेवता येणार, पण या अभिमान गीतातला त्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असेल, असं वाटलं. हे असं वाटतं हे ज्येष्ठ गायकांना सांगणं तर फारच कठीण होतं. पण ते सांगितल्यावर सगळ्यांनी छान सहकार्य केलं. कुठल्या गायकानं कुठली ओळ गावी, याबद्दल खूप विचार झाला. गाणं आख्खं लिहून काढलं. कुठली ओळी किती वेळा येणार तेही लिहिलं. पुरुष-स्त्री, पुरुष-स्त्री, कोरसमध्ये अशी विभागणी केली. त्याच्या कमलेश भडकमकर, मिथिलेश पाटणकर, मंदार गोगटे नि मी अशा चारजणांत प्रती वाटल्या. गायकांची यादी देऊन प्रत्येकाला मतस्वातंत्र्य दिलं. मग त्यातल्या समान ओळी-गायक कोणत्या ते ठरवलं. त्यात काही वेगळेपणा असेल तर तसं का, अशी चर्चा करण्यात बरेच दिवस गेले. पहिली ओळ ठरली ती अमूकच गायकानं गावी- ती म्हणजे मुग्धा वैशंपायन या चिमुडीची ! मला सगळ्या गाण्याचा ग्राफ पहिल्यापासून दिसत होताच. सगळे एकत्र ओळ गातील, तेव्हा क्षणिक शांततेनंतर एका लहान मूलाचा आवाज यावा, तो मुग्धाचा असावा, असं वाटलं. सगळ्या गायकांना एकेक ओळ आहे. फक्त मुग्धा, आर्या, रोहित, प्रथमेश नि कार्तिकी यांना तीन ओळी आहेत. कारण शेवटी आपल्याला पुढं बघायचंय, मराठी टिकवणारे ते आहेत. त्यांच्या मनात आत्तापासून मराठीबद्दल आत्मीयता निर्माण झाली नि न्यूनगंड नसेल तर आपण जिंकलो ! यातून बऱ्याच गोष्टी सुचवल्या जातात, की आपण पुढं बघतोय. तरुण पिढी गातेय, त्याचा त्यांना अभिमान नि आनंद आहे. जुन्यामध्ये रेंगाळून उपयोग नाही, तर नवीन पाहिलं पाहिजे, हेही दिसतं, जे महत्त्वाचं आहे. काही ओळी लागोपाठ होत्या. उदाहरणार्थ- "आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुला
फुलात हासते मराठी." पकी पहिली ओळ जरा सिनिअर गायिकांनी गायली तर त्यातूनही बऱ्याच गोष्टी सुचवल्या जातात. एक आईपण येतं, कुटुंबाचं फिलिंग येतं. ही ओळ संगीत चितळे, अनुजा वर्तक, वर्षा भावे नि भाग्यश्री मुळे यांनी गायलेय. पुढची ओळ तरुण मुलींनी गावी, म्हणून अनघा ढोमसे, सायली ओक, आनंदी जोशी न मधुरा कुंभार यांना दिली. आवाजातून यातला फरक कळतो नि त्याची लगेच गंमत कळते. पहिली ओळ कुणाच्या आवाजात असावी? यावर विचार चालू होता. खरंतर पहिली ओळ लताबाईंनी गावी, असं माझ्या खूप मनात होतं. त्यांना विचारलं तेव्हा त्यांचं ऑपरेशन झालं होतं, नंतरही आम्ही प्रयत्न केले, पण तेव्हा नाही जमलं. पण मग कुणाचा आवाज? तर तो "मराठी " आवाज असावा. "मराठी" म्हटल्यावर कोण आठवतात, तर रवींद्र साठे ! मग त्यांनी ती पहिली ओळ गायली. असं ते एकेक एकेक ओळीचा विचार ठरत गेलं. मग "आमुच्या घराघरात वाढते मराठी"त माधव भागवत-सुचित्रा भागवत. "येथल्या कळीकळीत लाजते मराठी"यासाठी एक तरुण गायिकाच पाहिजे. "येथल्या तरुलतात साजते मराठी"साठी अगदी टिनएजर मुलीपेक्षा थोडी मोठी गायिका पाहिजे, असं ते सगळं ठरत गेलं. "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी"साठी फोकचा आवाज हवा. त्यात उमप बंधू,अशोक हांडे, अच्युत ठाकूर नि अजय-अतुल गायलेत. "येथल्या वनावनात गुंजते मराठी" या ओळीसाठी ज्याच्या आवाजात वजन नि गुंजन आहे, तो हवा. मग शंकर महादेवनचा आवाज वापरला. ते सगळं विचारपूर्वक घडत गेलं. मग आर. डी. बर्मन जे म्हणतो, की गाण्यावर संस्कार झाले पाहिजेत, तर एरवी ते फक्त संगीतकारांकडून होतात. इथं अनेक संगीतकारांचे अनेक गायकांचे संस्कार या गाण्यावर होत गेले. म्हणून ते अत्यंत श्रीमंत गाणं झालंय, ते केवळ सुरेश भटांचे शब्द आणि इतक्‍या सगळ्या लोकांच्या मनापासून असणाऱ्या इन्व्हॉलमेंटमुळं...

उत्फूर्त प्रतिसाद (लेख- 5.)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे



अभिमानगीत जडणघडण होताना, ते संगीतबद्ध करण्याच्या सुरेल प्रवासात कोणकोणते अनुभव आले?

- जनमानसानं "मराठी अभिमानगीता"ची कल्पना अतिशय उत्स्फूर्तपणं उचलून धरली. तिला दाद दिली. एक आठवण सांगतो... एका कार्यक्रमात एक आजीबाई आल्या माझ्याकडं आणि त्यांनी माझ्या हातावर पाचशे रुपये ठवले. अगदी प्रेमानं म्हणाल्या, "मी फार काही देऊ शकत नाही. पण हा माझा खारीचा वाटा." मी सांगितलं, "आज्जी, हा सेतू खारीच बांधायत सगळा आणि हा खारींनीच बांधलेला सेतू आहे. कारण माकडं खरोखर काही करत नाहीयेत आपल्याकडं." त्यावर त्या मिश्‍किलपणं हसल्या. त्यांनाही त्यातला विनोद कळला... मध्यंतरी माझे लाडके ज्येष्ठ संगीतकार खळेसाहेबांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता गेलो होतो. गप्पा मारताना ते म्हणाले, "माझी तब्येत तेवढी बरी नाही". मी म्हणालो, "कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आलो होतो. पण तुमची तब्येत..." ते म्हणाले, "अरे, सोड ते. यासाठी मी येणार. मी परका नाही." म्हणालो "मी ने-आणायची व्यवस्था करतो." ते म्हणाले "तसं नको, मी येईन", असं म्हणत त्यांनी पाचशे रुपये काढून दिले. मी म्हणलो, "आम्ही थांबवलंय आता पैसे घेणं." ते म्हणले,"माझे घ्यायचेच." एका कार्यक्रमात एक "स्पेशल" मुलगा कार्यक्रमाला आला होता. त्याला हे कळतं होतं की हे खूप काहीतरी भारावून जाण्यासारखं आहे. कारण मी आवाहन केलं नि गाणं गायलो. त्याला लोकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. त्यानं उत्साहात देणगीदारांचा पत्ता लिहायचा होता, ते कार्डं घेऊन अर्धवट भरलं. मग तो बहुधा पैसे मागायला त्याच्या आईवडिलांकडं गेला असावा. त्यांना कदाचित ते पटलं नसावं किंवा हे काय यानं काहीतरी भरून आणलं असं काही वाटलं असावं. त्यांनीं त्याला सांगितलं असावं की हे कार्डं तू परत कर... ते घेऊन तो आमच्याकडं आला नि ते परत केलं. आम्ही मात्र ते कार्डं ठेऊन दिलंय. कारण त्याची इच्छा हेच त्याचे पैसे आहेत. आता आम्ही त्याला सीडी पाठवून देणार आहोत. सीडीसाठी देणगी देणाऱ्या साडे
चौदाशे मान्यवरांत त्याचं नाव आहे... म्हणूनच आम्ही असं ठरवलं कुणी पाचशे दिले, कुणी हजार कुणी आणखीन... पण कुणी किती पैसे दिलेत ते लिहायचं नाही. कारण पाचशे रुपयांची किंमत कुणाच्या लेखी किती असेल ते आपण नाही ठरवू शकत. त्यामुळं आपणही काहीतरी या गाण्यासाठी करावं असं वाटणारे आणि ते करणारे कितीतरी लोक पुढं आले नि त्यांनी मदतीचा हात दिला.
सांगायला अतिशय आनंद होतो की, आपल्याकडचे मराठी गायक -"मराठी" म्हणजे जे मराठी गातात ते सगळे - त्या साऱ्यांना आपल्या भाषेची जाण आहे. कणव आहे. तिच्याविषयी खूप काही वाटतं त्यांना म्हणून सांगू? त्यामुळं मला एकही असा अनुभव आला नाही की, हे काय आहे? का करायचं? असा एकही अनुभव आला नाही. "मला काही बुवा हे मान्य नाही," असं म्हणणारं कुणीही भेटलं नाही. हा अगदी शंभर टक्के प्रतिसाद होता. काही अनुभव भारावून टाकणारे होते. उदाहरणार्थ- आरती अंकलीकर, सावनी शेंडे, बेला शेंडे, शौनक अभिषेकी ही मंडळी पुण्याहून आली होती- फक्त एक ओळ गाण्याकरता ! नुकत्याच आरतीताई होत्या. म्हणाल्या, "माझं शेपूट तू ठेवलंयस की नाही?... तू शेपटांचाच वाघ केलास." ही खूप छान मार्मिक कॉमेंट होती ती की, "शेपट्यांचा वाघ केलास..." इतर गायकांचेही खूप चांगले अनुभव आहे. स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्तेंनी पैसे गोळा करण्यापासून सगळं केलं. स्वप्नील पत्रकार परिषदेला आला होता आम्हांला पाठिंबा द्यायला की आम्ही तुझ्यामागं उभं आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे की, जो आज मराठीतला स्टार सिंगर आहे, तो आज अशा उपक्रमाला जाहीर पाठिंबा देतोय....
एक चांगल्या प्रस्थापित गायिका रेकॉडिंला आल्या होत्या. त्यांनी मला असं विचारलं की,"चांगलं आहेस. हे गाणं तू करतोयस. पण तुला असं वाटतं का खरंच की यानं काहीतरी होईल? मी गाईनही." त्याप्रमाणं त्या आल्या नि गायल्याही. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की शेवटचं तुम्ही कधी एक ओळ गाण्याकरता बाहेर गेला होतात?" कारण त्या प्रस्थापित मोठ्या गायिका आहेत. तर त्यांनी विचार केला आणि त्या हसल्या. मी त्यांना म्हटलं, " हे बघा, ही शक्ती आहे या गाण्याची! तुमच्यासारख्या मोठ्या गायिकासुद्धा एक ओळ गाण्याकरता येतात. का येतात? फक्त मी तुम्हांला बोलवलं म्हणून का? तर नाही. तुमचं मराठीवर प्रेम आहे. मराठीनं तुम्हाला ए ओळ गायला बोलवलंय. तुम्ही हा विचारच केला नाहीत की, मी प्रस्थापित गायिका आहे वगैरे. तुम्ही आलात. सगळ्यांमध्ये मिसळलात नि हीच या गाण्याची मोठी शक्ती आहे." गाण्याचं रेकॉर्डिंग आजीवसन स्टुडिओत झालं. तिथल्या मंदार आणि अवधूत वाडकर यांची नावं घेतलीच पाहिजेत. सुरेश वाडकर यांच्या या साऊंड इंजिनिअर पुतण्यांनी मला लाखमोलाची मदत केली. त्यांनी स्टुडिओचं वातावरण घरासारखं ठेवलं. त्यांनी हे काम जितकं माझं आहे, तितकंच आपलं म्हणून केलं. अवधूतनं तर पाचशे रुपयांच्या देणगीचं कार्ड रेकॉर्डिंग मशीनवरच सगळ्यांना दिसेल असं ठेवलं होतं की जे पाहून लोकांनीही पैसे द्यावेत. एकूण 112 गायकांपैकी अवधूत-मंदारनं मिळून जवळपास 100 आवाज रेकॉर्ड केले. तेसुद्धा एक कठीण काम होतं. एवढ्या गायकांचे वेगवेगळे आवाज एकाच गाण्यासाठी रेकॉर्ड करणं नि तेही वेगवेगळे रेकॉर्ड करणं ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाची वेळ वेगवेगळी होती, प्रत्येकाच्या आवाजाचा पोत वेगळा असतो, त्याप्रमाणं माइकिंग करावं लागतं, लेव्हल ठेवावी लागते. तांत्रिकदृष्ट्याही ते अत्यंत आव्हानात्मक काम होतं. ते एकदाही कोणतीही सबब न सांगता प्रायोरिटी देऊन ते पूर्ण केलं.
चेन्नईत रहमानचा स्टुडिओ बुक करण्यासाठी मला मुरुगन मोहन नावाचा तिकडचा एक कम्पोजर आहे, त्यानं मला तिकडं सगळं अरेंज करून दिलं. स्टुडिओ बुक करण्यापासून ते इल्लया राजाचे सगळे वादक बुक करण्यापर्यंत सगळंच. तोवर त्याला हे माहित नव्हतं की मी हे कशासाठी काय करतोय वगैरे. चेन्नईला गेल्यावर स्टुडिओत गाणं सुरू व्हायच्या आधी प्रभाकर या व्हायलोनिस्टनी माझी त्यांच्या टीमशी ओळख करून दिली. तेव्हा मुरुगनही सोबत आला. एकानं विचारलं हे फिल्मसाठी आहे गाणं? मी म्हटलं नाही. या गाण्याचं कारण असं असं आहे. तेवढ्यात मुरुगन आणि वादकानं उत्स्फूर्तपणं पाचशे रुपये काढून दिले. म्हणले, "हे आमच्या राज्यात कधीच झालं नसतं." अशी वागणूक त्यांच्या भाषेला मिळणंच शक्‍य नाही. ही एक मनोमनी साठवलेली आठवण तर आहेच, शिवाय हा एक प्रकारचा मानसिक बळ देणारा अनुभव आहे. मराठीसाठी, तिच्यासाठी चालेल्या या उपक्रमाला त्यांनी दिलेली ही दाद होती. भाषिक अस्मितेविषयी दक्षिणेच्या लोकांना खूप भान आहे. कमला हसनने एका मुलाखतीत मराठीत काम करायचंय असं म्हटलं होतं. तो म्हणाला होता,"मराठीत खूप टायलेंटेण्ड लोक आहेत. त्यांना स्वत:च्या भाषेविषयी तमिळ लोकांनाहून अर्धी जरी अस्मिता जागृत असती तर त्यांनी अख्खी इंडस्ट्री उभी केली असती..."
शंकर महादेवन या गाण्यात गायला तो तर फार मस्त किस्सा झाला. आमची खूप जुनी मैत्री आहे. तो कंम्पोजर होण्याधीपासून माझ्याकडं गातोय. म्हणून त्याला फोन केला की मी असं गाणं करोत, त्यात एक ओळ तुला गायचेय. तो काहीही आढेवेढे न घेता लगेच हो म्हणला. त्याच्या सोईनुसार मी यशराज स्टुडिओत रात्री आठ वाजता गेलो. मी तिथला बी स्टुडिओ बुक केला. तिथले साऊंड इंजिनिअर विजय दयाळ यांनी इन्स्ट्रुमेंटल व्हर्जनमध्ये गिटारची ओळ वाजवलेय. मी गेलो तर संकर निघालो होता, त्याच्या लक्षात राहिलं नव्हतं. आमचा फोन होईपर्यंत तो जुहूला पोहचला होता. राहतो वाशीला. स्टुडिओ अंधोरीत. क्षणभर वाटलं आज काही रेकॉर्डिंग होत नाही. पण तो म्हणला नाही, परत येतोय... आल्यावर विचारलं काय गायचंय? तू काय करतोयस? त्याला सगळी कहाणी सांगितली. तो म्हणला ऐकव... मी ऐकवलं नि त्याच्या डोळ्यातनं पाणीच आलं. तो मागं वळला म्हणला,"कौशल यू हॅव अचिव्ह इम्पॉसिबल!" मग गायला. इतकं अप्रतिम गायला तो... "येथल्या वनावनात गुंजते मराठी" ही ओळ गायला. बाहेर येऊन म्हणाला की, "हरिहरनला तू विचारलंस का?" म्हटलं आमची ओळख नाहीए."तो म्हणाला, मी बोलतो. त्यानं दुसऱ्या दिवशी लक्षात ठेऊन हरिहरनला फोन करून सगळं सांगितलं नि मला तसा एसएमएस केला. स्टुडिओतून जाताना तो म्हणला,"या गाण्यासाठी तू माझा विचार केलास,त्यासाठी आभार." एवढ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायक-संगीतकाराला हे वाटलं नि या गाण्यानं त्याला हेलावून टाकलं. हे मी इतर मित्रांबरोबर शेअर केलं पाहिजे, म्हणून हरिहरनचं नाव सुचवलं. त्याच्या घरी स्टुडिओतला सगळा जामानिमा घेऊन गेलो. त्याच्या जिममध्ये ते सेट केलं. त्याला सगळं सांगितल्यावर तो म्हणाला, "मी गाईनच. रेडिओ कंपनीचं तू सांगितलंस, पण फक्त मराठी नाही तर हिंदुस्थानी संगीताबद्दल त्यांना अनादर आहे. मी याबाबतीत अत्यंत रॅडिकल आहे." मग ते नुसतं गायल
ेत नाहीत तर स्वत:हून आलाप घेत ऍडिशन्सनही केल्या. "येथल्या चराचरात राहते मराठी" अशी ओळ होती. या ओळीनंतर मध्ये एक गॅप होती नि मग मुग्धाची ओळ सुरू होत होती. तिकडं त्यांनी फक्त "मराठी" अशी वरनं तान घेतली. की त्यातून "येथल्या चराचरात राहते मराठी" हा फिलच मिळतो. असे सगळ्या गायकांचे संस्कार या गाण्यावर होत गले.
रेकॉर्डिंगला सगळ्यात कमी वेळ लागला असेल तर तो मुलांना! अतिशय मनापासून ते गायलेत. गाण्यावर- भाषेवर त्यांचं प्रेम अत्यंत निखळ असतं. त्यामुळं मुग्धा, कार्तिकी, आर्या, प्रथमेश नि रोहित जे गायलेत ते इतकं सुरेल नि मनापासून गायलेत की अनेकांनी सांगितलं हे ऐकून अंगावर काटा येतो किंवा रडू येतं... कारण ते मनापासून बोललं गेलंय. ते रेकॉडिंग ठाण्यात रोहित प्रधानच्या स्टुडिओत केलं होतं. तोही एक मस्त अनुभव होता. सुरेश वाडकरांकडूनही खूप ऍक्‍टिव्ह पाठिंबा मिळाला. त्यांना थ्रोट इन्फेक्‍शन झाल्यानं तब्येत बर नव्हती. आम्ही त्यांना चला सांगायला गेलो की आवाज खराब आहे म्हणायचे. मग अमेरिकेला जायचं ठरलं. त्यांच्या सगळ्या व्यापातून त्यांना ही एक ओळ गायचं काय लक्षात राहिल? पण ते जायच्या दिवशी संध्याकाळी स्टुडिओत आवर्जून आले नि गाऊन गेले. इतकं सुंदर गायले... की क्‍या बात हैं ! असा सगळ्याच गायकांनी आपापल्या ओळींवर आपापला ठसा उमटवलाय. ज्यांची मातृभाषा मराठी नाही, ते गायकही अतिशय प्रेमानं गायले. हम्सिका अय्यरचंही मला कौतुक वाटतं. ती माझ्याबरोबर चेन्नईला आली होती. आज ती एवढी मोठी गायिका आहे... पण हे मी करतो म्हणून भाषेचा मला त्रास होऊ नये, याची काळजी घेतली. रिक्षापासून म्युढिशिअन्सना समजावण्यापर्यंत सगळीकडं ती तमिळमध्ये बोलायची. तिच्या आईवडिलांनीही खूप मदत केली. हे काही मी तिच्या मातृभाषेसाठी करतोय, असं नाही. पण हे मातृभाषेकरता करतोय, हाच इन्टिमेट महत्त्वाचा आहे... असे खूप चांगले अनुभव आले, किती किती म्हणून सांगू? आठवणींचं आभाळ अगदी भरून आलंय...

जन्म मराठी अस्मितेचा! (भाग 6)

मुलाखत- राधिका कुंटे.

"लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी..." या मराठी अभिमानगीताचे सूर उद्या ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये अभिमानानं गुंजणार आहेत... असंख्य रसिकांच्या मनात निनादणार आहेत. मराठीला डाऊन मार्केट म्हणणाऱ्यांना संगीतकार-गायक कौशल इनामदार यांनी हे सडेतोड उत्तर दिलंय. अर्थात मराठीच्या अभिमानाचा हा प्रवास इथं संपणार नाही. ही तर केवळ नांदी आहे, मराठीप्रेमाची, मराठी अस्मितेची, मराठीच्या अस्तित्वाची... मग काय देणार ना साथ?...

---
अभिमानगीताच्या निमित्तानं "मराठी अस्मिता" या संस्थेचा जन्म झाला, त्याविषयी सांगा. या गीताच्या सीडीचा प्रकाशन समारंभ अगदी उद्यावर येऊन ठेपलाय. त्यामुळं आत्ता या क्षणी तुमच्या मनात कोणत्या भावना उमटताहेत...

- मराठी अभिमानगीताच्या निमित्तानं "मराठी अस्मिता" या संस्थेचा जन्म झाला. या संस्थेच्या आधारस्तंभांपैकी तीनजण आहेत माझे मित्र- उन्मेष जोशी, महेश वर्दे आणि मंदार गोगटे ! या तिघांनी मला या गीताच्या कामात अत्यंत मोलाची साथ दिली. त्यांची आणि आणखीनही इतर मित्रमंडळींची साथ मिळाली तर "मराठी अस्मिता"तर्फे आणखी खूप मोठे आणि भव्य असे प्रकल्प करण्याचं माझ्या मनात आहे. उदाहरणार्थ- चांगलं साहित्य, चांगलं काव्य पुढच्या पिढीपर्यंत अधिक परिणामकारक रितीनं पोहचवू शकता येईल. मराठी भाषेविषयी तरुण मनांत असणारा न्यूनगंड पूर्णपणं मिटवायचाय. मराठी डाऊनमार्केट भाषा वाटू नये, म्हणून खूप प्रयत्न करावे लागणार आहेत, ते आम्ही करणार आहोत. मनात आहे की खूप भव्य असे प्रकल्प मराठीसाठी करावेत, की ज्यामुळं जागतिक पातळीवर आपल्या भाषेचा उल्लेख होऊ शकेल. रहमान ऑस्करच्या स्टेजवर जाऊन तमीळमध्ये बोलला होता. आपण दादासाहेब फाळके यांच्या नावाच्या निमित्तानं भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार द्यायला लागू, असं झालं पाहिजे. हॉलिवूडच्या कलावंतांना दादासाहेबांच्या नावानं पुरस्कार घेताना गौरव वाटायला हवा. याच भावी उपक्रमांपैकी एक म्हणून पुढल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर संगीताचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजण्याचं मनात आहे. यात मराठी कलाकारांसोबत काही आंतरराष्ट्रीय स्तरांवरचे कलाकारही असतील. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था नि व्यक्तींचाही सहभाग असेल. मराठी लोकांनी मराठी चित्रपट काढून ते बहुभाषिक करता येतील, असे अनेक प्रकल्प सध्या मनात आकारत आहेत.
हे सगळं मी बोलतोय तरी आत्ता या क्षणी माझ्या मनातली खळबळ तुम्हांला कशी काय समजणार? असं म्हणतात ना की खरं शौर्य हे मृत्यूला सामोरं जायला लागत नाही तर आयुष्याला सामोरं जायला खरं शौर्य लागतं... आत्ता मला अगदी त्याचा प्रत्यय येतोय. कारण जे कठीण काम होतं ना ते झालंय. सव्वा वर्षात इतक्‍या सगळ्या लोकांना एकत्र करून, जणू काही एक लाख सदुसष्ट वेळा आपली भूमिका विविध लोकांसमोर सातत्यानं मांडण्याचा सगळा कठीण काळ उलटलाय. आता सगळं उंबऱ्यावर आलंय... जे आता फक्त ओलांडायचंय... या सव्वा वर्षात वाटत नव्हती एवढी भीती आता वाटतेय... हे सारं कसं होईल, सत्तावीस तारखेनंतर हे गाणं किती पसरेल... कारण आत्तापर्यंत कसं सगळं माझ्या हातात होतं, सगळं मीच करत होतो. आता गाणं पसरायचंय म्हटल्यावर ते माझ्या हातात राहणार नाही. ते आता महाराष्ट्रात... कदाचित जगात जाईल... सध्या माझ्या मनात कलावंत म्हणून नेहमीच सगळ्यांना वाटणारी धाकधूक राहायला आलेय. की मी केलेलं काम सगळ्यांना आवडेल का? त्याला मराठीप्रेमींकडून कसा प्रतिसाद मिळेल? वगैरे. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की, ज्या दिवशी हे सगळं पूर्ण होईल, त्या दिवशी किती समाधान वाटेल. ते समाधान मला वाटत नाहीये. मला असं वाटतंय की ही आता सुरुवात आहे नि आणखीन बरंच काम राहिलेलं आहे. समजा आपण एखादा माहुलीचा डोंगर चढून गेलो की आपल्याला वाटतं की क्‍या बात हैं... आपण खूप काही मिळवलंय. पण आपण समोर बघतो तो आणखीन मोठा रायगड उभा असतो, तो सर केल्यावर दिसतं की यावरही आणखीन हिमालय आहेच... तसं माझं आत्ता होतंय की क्षेत्रफळ टप्प्यात आलंय, पण अजून बरंच अंतर पार करायचंय...
आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी झालं असेल की वैयक्तिक आयुष्यात काहीतरी अचिव्ह करायचंय म्हणून मी हे केलेलं नाही. असं करण्यातली मौज खूप असते तशीच नि तेवढी जबाबदारीही जास्त असते. वैयक्तिकरित्या एखादं काम करायचं झालं नि त्यात यश किंवा अपयश आलं तर ते सगळं आपल्याला सोसायचं असतं किंव एन्जॉय करायचं असतं. इथं असं नाही होणार. इथं माझ्यासोबत खूप लोक जोडले गेलेत आणि हे सगळं पुढं न्यायचं असेल तर मला अजून उत्साहाची नि प्रोत्साहानाची गरज आहे. मला आता कळंतय की समनाजातल्या खूप मोठ्या व्यक्ती इतकी विनयशील का असतात. मोठ्या अचिव्हर्सना वाटत असणार ही तर अगदीच छोटी गोष्ट आहे. सव्वा वर्ष हा काही आयुष्यभरातला स्पॅनच नाहीये. याहीपेक्षा खूप मोठी कामगिरी करणारे लोक असतात. ते इतके विनयशील असतात... हा मला एक जमिनीवर आणणारा अनुभव होता. कारण माझ्या लक्षात आलंय की करायला अजून खूप काही आहे. लोक एखाद्या ध्येयासाठी आयुष्य वेचतात... मग सव्वा वर्ष काय आहे? त्यामुळं मला या सगळ्याची भीती वाटतेय.
हे सगळं आता पुढं जायला पाहिजे. ते इथवरच थांबून उपयोग नाही, असंही वाटू लागलंय. त्यामुळं विचार करता करता मला सई परांजपे यांच्या एका चित्रपटातल्या पात्राच्या तोंडीचं एक वाक्‍य आठवतंय की- "कलाकार की बैचैन आत्मा..." हा "बैचैन आत्मा" का असतो, ते मला आता कळतंय. अजूनही कितीतरी करण्याजोग्या गोष्टी बाकी आहे, हे कळंतय. त्यामुळं पुढं काय करता येईल, याचा विचार सुरू झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांत पंधराव्या क्रमांकावर असणारी मराठी भाषा केवळ कोषांत गुरफटून चालणार नाही, तर तिचं सामर्थ्य सगळ्यांना कळायला हवं. मराठी लहान आणि तरुण मुलांना मराठीची महती कळायला हवी. आपल्या मातीत राहून आपल्याला जग जिंकता येतं, हा आत्मविश्‍वास तरुण पिढीच्या मनात निर्माण होऊन आपल्या भाषेविषयी प्रेम आणि आत्मीयता निर्माण व्हायला हवी. असं झालं तर मग आपलं नि आपल्या भाषेचं भविष्य उज्ज्वलच आहे. भाषा समृद्ध झाली की संस्कृती समृद्ध होते. संस्कृती समृद्ध झाली की आपलं आयुष्य समृद्ध होतं कारण आपण आणखीन श्रीमंत होऊन जातो, आयुष्यातली रुची वाढते. हे सगळं व्हायचं असेल तर भाषा समृद्ध व्हायला हवी.
सुरुवातीला जे मला म्हणायचे की एका गाण्यानं काय होणार, त्याचं चुकतच होतं. पण आता वाटतं की, एका अर्थानं ते बरोबरही आहे. एका गाण्यापलिकडं जाऊन काहीतरी केलं पाहिजे, असा उद्देश कदीाचित त्यामागं असू शकतो. हे असं वाटणंही आणि त्याची सुरुवात या गाण्यापासून होणं, ही मराठीच्या चांगल्या भविष्याची जणू नांदी आहे. आधी एका मैदानात होणारा कार्यक्रम आता एका स्टेडियममध्ये होतोय.... लोकांचा प्रतिसाद वाढतोय... इथंच भाषेच्या कक्षा रुंदावतायत असं वाटतं... हे हिमालयाच्या यात्रेचं पहिलं पाऊल आहे. अजून शेकडो मैलांचं अंतर कापायचंय... त्यात तुमचीही साथ हवेय, नव्हे ती असेलच यात्री खात्री आहे... कारण "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी..."

Wednesday, April 28, 2010

.... माय मानतो मराठी ! (भाग 7)

- राधिका कुंटे.

इन्ट्रो- "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी..." हे "मराठी अभिमानगीता"चे शब्द आता अनेक "मराठी"प्रेमी
घरांत गुंजत आहेत. कविवर्य सुरेश भटांच्या शब्दांतली ताकद आणि "संगीत" या माध्यमाचा प्रभाव यामुळं "मराठी"प्रेम सगळ्यांपर्यंत अतिशय प्रेमानं आणि एक प्रकारच्या "संगीतमय गांधिगिरी"नं पोहचलंय. सवरशिलेदार कौशल इनामदार यांच्या या "मराठी बाण्या"ला काय प्रतिसाद मिळाला ते वाचूया.
---
अभिमानगीताच्या सीडीच्या प्रकाशनानंतर "मराठीप्रेमीं"कडून तुम्हांला कसा प्रतिसाद मिळाला?

रसिकांकडून आणि "मराठीप्रेमीं"कडून "मराठी अभिमानगीता"ला चांगला प्रतिसाद मिळाला. उदंड प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं. पण इतका उदंड प्रतिसाद मिळेल, असं वटलं नव्हतं. "स्टार माझा"नं यु ट्युबवर हे गाणं अपलोड केलं असून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्‍या आहेत. खरंतर या गाण्यामुळं मला जो परिणाम अपेक्षित होता की- लोकांना "मराठी" असल्याचा अभिमान वाटावा, तो परिणाम दिसून येतोय. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरूनही या सीडीबद्दल विचारणा होतेय.
अपर्णा सुब्रमण्यम यांनी त्यांच्या ब्लॉगवर यु ट्युबची लिंक दिलेय आणि लिहिलंय की, "जे लोक महाराष्ट्रात राहतात पण त्यांची मातृभाषा वेगळी आहे, जशी माझी मातृभाषा तमीळ आहे, त्या लोकांचं त्यांच्या मातृभाषेवरचं प्रेम वाढणार आहे. माझंही तमीळवरचं प्रेम तीव्र झालंय. माझी आयडेंटिटी माझ्या लक्षात आलेय. त्याबद्दल मी या गीताचे आभार मानते." या गाण्याची लिंक तिनं अनेक दाक्षिणात्यांना फॉरवर्ड केलेय. चेन्नईतले संगीतकार टोनी जोसेफ यांनी मला इमेल केलाय की," हे काही फक्त मराठीचं गाणं नाहीये, तर ते अवघ्या भारताचं गाणं आहे." ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी सांगितलं की, "संगीतातली अशी मोठी कामगिरी जगात घडलेली नाही." पंडित सत्यशील देशपांडे आणि पंडित सुरेश तळवळकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली की, "या गाण्याचं सामाजिक मत्त्व एकीकडं आहेच, पण एक गाणं म्हणून ते त्यांना खूप आवडलं." संगीतातील या दिग्गजांची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी मोलाची नि आनंददायी ठरली.
लोकांकडून विशेषत: मला तरुणांकडून मराठी प्रेमाची जी अपेका होती, त्यांच्याही अतिशय बोलक्‍या प्रतिक्रिया येत आहेत. "हे खूप चांगलं नि मोठं काम केलंत" असं कौतुक तर अनेकांनी केलंय. शिवाय "आत्ताच्या राजकीय परिस्थितीत भाषेबद्दल एक कडवटपणा आल्यानं ती संघर्षाची ठरतेय. खरंतर लोक जोडणं हे भाषेचं काम आहे. ते या गाण्यानं केलंय..." अशी बोलकी प्रतिक्रियाही काहीजणांनी मला दिली.
या गाण्याच्या सीडीच्या प्रकाशनाच्या दिवशी साऱ्याच मान्यवरांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेत. ते मी नम्रपणं स्वीकारले. हा एवढा सगळा प्रवास केल्यावर आता असं वाटतं की श डोक्‍यात जात नाही, तर यशामुळं तुमच्यात एक विनम्रता आपोआप येते. यश कधीच एकट्याचं नसतं. त्यात अनेकजणांचा सहभाग असतो. म्हणूनच यश म्हणजे अनेक लोकांचं रसायन आहे, असं मला वाटतं नि आणखीनच विनम्र व्हायला होतं...
खरंतर हा सारा प्रतिसाद हेलावून टाकणारा होता. मला जो मराठीबाबतचा मुद्दा मांडायचा होता तो व्यवस्थित मांडला गेलाय. मराठी डाऊनमार्केट नाही उलट तिच्याआधारे एक विश्‍व उभं राहू शकतं, हेही लोकांना कळू लागलंय. भारत सगळ्यांचा, मुंबई सगळ्यांची तशीच मराठीही सगळ्यांची हा मुद्दा अतिशय चांगल्या तऱ्हेनं आणि प्रेमानं पोहचलाय. तो पोहचवण्याचं माध्यम होतं संगीत... म्हणूनच त्या संगीताचा मोठेपणा नि कविवर्य सुरेश भटांच्या शब्दांतली ताकद यामुळं हे माध्यम प्रभावी ठरलंय. ही एक प्रकारची "संगीतमय गांधिगिरी"च...

मराठी वृत्तवाहिन्यांचा जयजयकार!

हेमंत देसाई
आपले जीवन आज 24 x 7 वृत्तवाहिन्यांनी वेढून टाकले आहे. चित्रपटांचे, टीव्ही मालिकांचे एवढेच काय, राजकीय नेत्यांचे प्रमोशनही याच वाहिन्या प्रभावीपणे करतात. दुय्यमतिय्यम राजकीय कार्यकर्ते नेत्यांना आपण वाहिन्यांमध्ये चमकलो, तरच ज्येष्ठ नेते आपल्याकडे लक्ष देतील, असे वाटत असते. पाच वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांना वर्षाला 500 कोटी रुपयांच्या जाहिराती मिळत. आज हा आकडा 1500 कोटी रुपयांवर जाऊन पोचला आहे. एकूण वर्षाला 10 हजार कोटी रुपये कंपन्यामार्फत खर्चिले जातात. त्यातले 15 कोटी वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातीकरिता वेचले जातात. साक्षरता, सुखसमृद्धीबरोबरच जनतेच्या आकांक्षा वाढत असल्याने लोक अधिकाधिक प्रमाणात या वाहिन्यांकडे खेचले जाणार यात शंका नाही.देशात 10 तरी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या आहेत. स्थानिक व प्रादेशिक वाहिन्यांची तर गणतीच नको. हिंदीत आज तक, इंडिया टीव्ही, स्टार न्यूज, झी न्यूज, आयबीएन सेव्हन व एनडीटीव्ही इंडिया अशा प्राधान्यक्रमानुसार आघाडीवरच्या वाहिन्या आहेत. इंग्रजीत टाइम्स नाऊ, एनडीटीव्ही 25 x 7 व सीएनएन आयबीएन या अव्वल वाहिन्या आहेत. इंग्रजी बिझनेस वाहिन्यांत सीएनबीसी टीव्ही 18 अग्रेसर आहेत आणि त्यानंतर एनडीटीव्ही प्रॉफिट, ब्लूमबर्ग यूटीव्ही व ईटी नाऊ यांचा नंबर लागतो. हिंदीत सीएनबीसी आवाज पहिला व झी बिझनेस दुसरा. त्यांच्याशिवाय आहेच कोण?टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंट (टॅम)च्या प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार- प्रादेशिक वृत्तवाहिन्यांची भरधाव प्रगती सुरू आहे. त्यातही महाराष्ट्र, आंध्र, केरळ व प. बंगाल इथे ही प्रगती सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात तर लोक हिंदी / इंग्रजीमधील राष्ट्रीय बातम्या बघतात आणि स्थानिक बातम्या मराठीतून ऐकणे पसंत करतात. म्हणजे मराठी भाषा नष्ट होत चालली आहे, असा टाहो फोडण्याचे कारण नाही.मुंबईत परप्रांतीयांची संख्या लक्षणीय आहे. हिंदी चित्रपट व हिंदी मालिकांचे हे प्रमुख निर्मिती केंद्र आहे. त्यामुळे या महानगरात हिंदी प्रचलित आहे. मराठी लोक, खासकरून तरुण पोरं-पोरी बोलताना हिंदीचा खूप वापर करतात. तरीदेखील टॅम मीडिया रिसर्च प्रा. लि.च्या पाहणीनुसार ऑक्‍टोबर 2009 मध्ये मराठी वाहिन्यांच्या प्रेक्षकांमध्ये 25 टक्के वाढ झाली. 2007 मध्ये 13 टक्केच वाढ झाली होती. राष्ट्रीय पातळीवर मराठी प्रादेशिक दूरचित्रवाणीची प्रेक्षकसंख्या 2.7 टक्‍क्‍यांवरून दोन टक्‍क्‍यांवर गेली आहे.2009 मध्ये हिंदी एंटरटेन्मेंट, दक्षिणी भाषिक वाहिन्या, हिंदी चित्रपट, तसेच मुलांच्या वाहिन्यानंतर लोकप्रियतेत नंबर लागला तो मराठी वृत्तवाहिन्यांचा. त्यानंतर हिंदी वाहिन्यांचा नंबर लागतो. 2006 मध्ये मराठी वृत्तवाहिन्यांची प्रेक्षकसंख्या जवळपास काहीच नव्हती; पण आता वाहिन्या वाढल्या आहेत.2007 मध्ये मराठीतील पहिली 24 तासांची वृत्तवाहिनी "झी'ने सुरू केली. त्यांनतर "स्टार माझा' व मग "आयबीएन लोकमत' आली. "ईटीव्ही' व "साम'ने मनोरंजन व बातम्या देण्याचा प्रयोग केला. मराठी वृत्तवाहिन्यांनी निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. पूर्वी "सह्याद्री'ची मक्तेदारी होती. मग ई टीव्ही आला आणि त्यानंतर स्टार, तसेच आयबीएन लोकमत. लोकांना अधिकाधिक पर्याय हवे असतात.विशेष म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या स्तरातील नगरांमध्ये केबल व उपग्रह वाहिन्या असलेल्या घरांची संख्या दिवसेंदिवस फुगत चालली आहे. स्थानिक बातम्या पडद्यावरून पाहण्याची जनतेची भूक वाढत चालली आहे. प्रादेशिक बातम्या मराठीतून बघायला लोकांना आवडते.मध्यंतरी प्रसारमाध्यमातील काही भंपक लोक असे म्हणत होते, की म्हणे वाचक प्रेक्षकांना राजकारणात रस नाही. त्यामुळे आपण फक्त टेन्शन खल्लास करण्याच्या जमाडी जम्मत छाप बातम्या देऊ; पण हा युक्तिवाद पूर्णतः बोगस होता. राज्यात सहकारी कारखाने, बॅंका, दूध संघ, कृषी उत्पन्न बाजारपेठा यांचा ग्रामीण व निम्न ग्रामीण जीवनावर अजूनही पगडा आहे. ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, नगरपालिका यांचे महत्त्व कायम आहे. उलट जास्तीत जास्त जनतेस राजकीय व लोकशाही प्रक्रियेत सामील व्हायचे आहे. त्यामुळे त्यांना राजकीय घडामोडी व त्याबद्दलच्या बातम्यांत प्रचंड रस आहे. अण्णा, आबासाहेब, दादा, विलासराव, उद्धव, राज यांचे कार्यक्रम, त्यांची वक्तव्ये बघण्या-ऐकण्यात जनतेला रस आहे. त्यामुळेच लोक सर्व प्रकारच्या मराठी वृत्तवाहिन्या बघत आहेत. महाराष्ट्रात मराठी करमणूक, तसेच वृत्तवाहिन्यांनी म्हणूनच 21 टक्के ग्रॉस रेटिंग पॉइंटस्‌ मिळविले आहेत. मराठी लोक हिंदीपेक्षा मराठी वाहिन्या बघणे पसंत करतात, हे ऐकून फक्त राज ठाकरेंनाच नव्हे, तर तुम्हा-आम्हा सर्वांनाच आनंददायी वाटेल.भारतात किमान 18 भाषा आणि 1000 भर तरी बोली आहेत. त्यामुळे देशभर एकच एक वृत्तपत्र वाचले आणि एकच एक वाहिनी बघितली जाईल, हे संभवतच नाही. भारतात इंग्रजी जाणणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी हे प्रमाण अद्याप मर्यादित आहे. त्यामुळे इंग्रजीतली वृत्तपत्रे लहान शहरांतही पूर्वीपेक्षा जास्त खपतात; पण तरी ही संख्या तसा मर्यादित आहे. उलट राजस्थान पत्रिका, भास्करसारखी दैनिके तुफान खपत आहेत. ही वृत्तपत्रे एकापेक्षा अधिक ठिकाणाहून प्रसिद्ध होतात आणि त्यांनी एक प्रकारे सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचप्रमाणे बहुतेक राष्ट्रीय वाहिन्यांनी प्रादेशिक वाहिन्या चालू केल्या आहेत. स्टार नेटवर्कने बंगाली व मराठी वाहिन्या चालू केल्या. एनडी टीव्हीने चेन्नईत एनडी टीव्ही मेट्रोनेसन सुरू केली. सीएनएन आयबीएनने आयबीएन लोकमत सुरू केले. प्रादेशिक स्तरावरील कंपन्यांप्रमाणेच राष्ट्रीय वाहिन्यांच्या प्रादेशिक वाहिन्या यापुढचा टप्पा असेल तो प्रादेशिक भाषेतील लाईफस्टाईल, ट्रॅव्हल व बिझनेस चॅनेल्सचा, राष्ट्रीय वाहिन्यांनी भाषिक वाहिन्या चालू केल्यामुळे प्रादेशिक केंद्रांमधून होणारे राष्ट्रीय वाहिन्यांवरील कव्हरेजही वाढते. बातम्यांना अधिक खोली लाभते.मराठी करमणूक व वृत्तवाहिन्यांचा पसारा वाढला आहे. त्यामुळे या वाहिन्यांचा राष्ट्रीय वाहिन्यांवरील (म्हणजे मुख्यतः इंग्रजी, हिंदी) प्रभाव वाढू शकेल. केवळ दिल्ली व मुंबईतून उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा यवतमाळ-अकोला, बीड-परभणी, धुळे-जळगाव, सावंतवाडी-रत्नागिरी किंवा सातारा-सांगलीतील घडामोडी तेथे जाऊन तपशिलात कव्हर करणे महत्त्वाचे आहे. तिथल्या अन्याय-अत्याचाराच्या बातम्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचू शकतात.मराठी वृत्तवाहिन्यांच्या विस्तारण्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्राची सुख-दुःखे सर्वत्र पोचतात. आपले औदार्य व संकुचितपणा, इथली श्रीमंती व गरिबी, इथल्या आत्महत्या आणि बलात्कार, इथले आविष्कार स्वातंत्र्य व इथली सेन्सॉरशिप हे सारे देशवासीयांना मोठ्या प्रमाणात माहीत होऊ लागले आहे. वृत्तवाहिन्यांच्या यशामुळे मराठीपणाचा अभिमान वाटतोच; पण सामान्यजन व राजकीय-सामाजिक नेतृत्वात जबाबदारीची जाणीवही उत्पन्न व्हावी, ही अपेक्षा!-

जागतिक नकाशावर मराठीचं स्थान गौण ः वसंत आबाजी डहाके

संजय पाखोडे

आज जागतिक मराठी भाषा दिवस. आजच्या या जागतिकीकरणात मराठीचे स्थान काय, हा प्रश्‍न सर्वसामान्यांसह सर्वांनाच विचारावासा वाटतो. खरंच झपाट्यानं बदलत असलेल्या या जमान्यात जगाच्या पाठीवर मराठीचे स्थान आहे काय? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. महाराष्ट्रातील थोर विचारवंत आणि ज्येष्ठ समीक्षक वसंत आबाजी डहाके यांच्याशी आमचे प्रतिनिधी संजय पाखोडे यांनी मराठी भाषा या विषयावर केलेली ही खास बातचीत. वसंत आबाजी डहाके यांचे आतापर्यंत अनेक कविता संग्रह आणि समीक्षा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या चित्रलिपी या काव्यसंग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे.
----प्रश्‍न ः आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. अन्य भाषांच्या तुलनेत मराठी भाषेचं आज काय स्थान आहे?
वसंत आबाजी डहाके ः भारतीय भाषांमध्ये मराठी भाषेचं फार महत्त्वाचं स्थान आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांच्या या युगात आज किती तरी मराठी वाहिन्या प्रसारित होत आहेत. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. पूर्वी ज्या चित्रपटगृहांमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी चित्रपट लागायचे, त्या ठिकाणी आता मराठी चित्रपट लागतात. कलात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपट, मराठी मालिका यांना चांगले दिवस आले आहेत. थोडक्‍यात, मराठी भाषेचं महत्त्व आता पटायला लागलं आहे. ही भाषा महत्त्वाची आहे याची जाणीव लोकांना व्हायला लागली आहे. महाराष्ट्राविषयी विदेशी नागरिकांना कुतूहल निर्माण झालं आहे. गेल्या काही वर्षांत विदेशी संशोधक मराठीविषयी शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र आणि मराठी लोकसंस्कृती काय हे जाणून घेण्याची तळमळ विदेशी संशोधकांमध्ये आहे. त्यामुळे मराठी भाषेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे.
----प्रश्‍न ः मराठीविषयी सारखी चिंता असते, की काळाच्या ओघात ही भाषा नष्ट होईल काय? वाचनाचं प्रमाणसुद्धा कमी होत आहे.
वसंत आबाजी डहाके ः ही चिंता लोक उगाच करीत असतात. भाषिक वर्तमानपत्रांची संख्या जर आज बघितली, तर मराठी वर्तमानपत्रांचीच संख्या अधिक असल्याचं लक्षात येतं. महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांच्या जिल्हा आणि शहर आवृत्या बघितल्या, तर मराठीचा मोठा वाचकवर्ग आजही आहे. म्हणजे मराठी भाषा फक्त बोललीच जात नाही, तर मराठी भाषेचं वाचनाचं प्रमाणही सर्वाधिक आहे. आता मी सातारा, कोल्हापूर आणि गडहिंग्लज या भागात फिरलो. तेथील लोकांनी सांगितलं, की मराठी वाचनाची आवड आहे त्याहून अधिक वृद्धिंगत होत आहे. त्यांनी सांगितलं, की दोन दिवसांपूर्वी लागलेल्या एका पुस्तक प्रदर्शनातून दोन कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. याचा अर्थ स्पष्ट आहे, की मराठी भाषेत प्रकाशित होणारं साहित्य वाचकांच्या पसंतीला उतरलं आहे आणि वाचकांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा सर्व अनुभव बघितला, तर मराठी भाषा ही दुय्यम राहिलेली नाही. भारतीय भाषांमध्ये तिचं एक महत्त्वाचं स्थान निर्माण झालं आहे. दहा वर्षांपूर्वी विचारवंतांनी मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त केली होती; ती परिस्थिती आता बदललेली आहे.
-----प्रश्‍न ः मराठी विषयातून पारंगत अभ्यासक्रम (एम.ए.) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भवितव्य नाही, असा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजत आहे.
वसंत आबाजी डहाके ः मराठी विषयातून एम. ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डोळ्यापुढे शिक्षक किंवा प्राध्यापक व्हायचंय हा विचार न ठेवता त्यांच्या शिक्षणाला व्यावसायिकतेची जोड द्यावी. वृत्तपत्रीय शिक्षणाची जोड देऊन मराठीतून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांत साहित्यनिर्मिती अथवा जाहिरातीच्या माध्यमातून काही तरी नवं शिकावं, ज्याचा फायदा त्यांना निश्‍चितच मिळेल.
----प्रश्‍न ः आजच्या जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषेचं स्थान काय? इंग्रजीच्या तुलनेत मराठी भाषा स्पर्धेत टिकेल काय?
वसंत आबाजी डहाके ः इंग्रजी भाषेला आज जगात महत्त्वाचं स्थान आहे. ज्या देशांमध्ये इंग्रजी भाषा हद्दीबाहेर होती किंवा इंग्रजी भाषा बोलली जात नव्हती, अशा देशांमध्येसुद्धा इंग्रजी भाषेतूनच शिक्षण घेतलं जात आहे, ही वस्तुस्थिती आहे, कारण इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय ज्ञान-विज्ञानाची आणि व्यापाराची भाषा झाली आहे. मराठीला इंग्रजीसारखं जागतिक पातळीवर न्यायचं असेल, तर मराठीचे स्थान आपल्याला जगाच्या पाठीवर निर्माण करावं लागेल. जगातल्या बहुतेक भाषांमधली साहित्यनिर्मिती आणि वाङ्‌मय इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे भारतीय भाषांमधील वाङ्‌मयाचंदेखील इंग्रजीत भाषांतर होऊन ते साहित्य इंग्रजीत उपलब्ध आहे; मात्र जागतिक आणि भारतीय भाषांमधील वाङ्‌मय मराठीत पाहिजे त्या प्रमाणात आलं नाही. त्याचप्रमाणे मराठी भाषेतील वाङ्‌मय आणि साहित्यनिर्मितीचं भाषांतर जागतिक आणि भारतीय भाषांमध्ये झालेलं नाही, त्यामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपल्या वाङ्‌मयातील श्रेष्ठत्व जागतिक स्तरावर कळू शकत नाही; मात्र मराठी भाषेतील साहित्यनिर्मितीचं जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतर व्हायला पाहिजे. त्यामुळे जागतिक नकाशात मराठीचं स्थान गौण आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
----प्रश्‍न ः मराठी भाषेवरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू आहेत. मनसे किंवा शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्ष आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादीसारखे राष्ट्रीय पक्ष मराठीच्या अस्मितेवरून राज्यात भांडतायत.
वसंत आबाजी डहाके ः जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी मराठी भाषेला आपापल्या जाहीरनाम्यात महत्त्वाचं स्थान दिलं आहे. याचा अर्थ असा, की या सर्व राजकीय पक्षांना मराठीचं स्थान काय हे कळलं आहे. आतापर्यंत हा विषय अजेंड्यावर नव्हता; मात्र लोकांच्या दृष्टीनं हा विषय महत्त्वाचा झाला याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. प्रत्यक्षात हे सर्व राजकीय पक्ष मराठी भाषेकरिता काय करणार हे काहीच स्पष्ट झालेलं नाही. याबद्दल त्यांची ठोस भूमिकाही जाहीर नाही, पण मराठी भाषा महत्त्वाची आहे, याची राजकीय पक्षांना जाणीव झाली हे निश्‍चित आहे. राजकीय लोकांनी भाषेकरिता काही करावं ही अपेक्षा चूकच आहे, कारण भाषेकरिता जे काही करायचं असतं ते अभ्यासकच करतात, परंतु राजकीय लोकांनीही मराठीकडे लक्ष देणं हे एक चांगलं लक्षण आहे.

महाविद्यालयातील मराठी

ऋतुजा सावंत
आजची पिढी ऐकणारी आहे, पाहणारी आहे, पण वाचणारी नाही. त्यामुळे आधीच इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभाव यामुळे मराठी भाषेची सरमिसळ ही ओघाने होतेच. हिंदी आणि इंग्रजी मिश्रित मराठी महाविद्यालयीन विश्‍वात बोलले जाते. स्वच्छ आणि अस्खलित बोलणारा येथे अपवादानेच आढळतो. पण मराठमोळे सणही येथे तेवढ्याच उत्साहात साजरे केले जातात. म्हणजेच मराठी भाषेपेक्षा महाराष्ट्रीय संस्कृतीची आवड मुंबईतील महाविद्यालयांत दिसून येते.
---
सध्या होत असलेल्या मराठीच्या आंदोलनांमुळे मराठीची जागरूकता वाढली आहे. मोबाईलच्या स्क्रिनसेव्हरवर एखादी मराठी कविता ठेवण्यापासून प्रेमकवितांचे सुलेखन केलेले टी-शर्ट वापरण्याची फॅशन हे त्याचेच प्रतीक. तरुणांचे हे मराठी प्रेम यंदाच्या महोत्सवांदरम्यानही दिसून आले. साठ्ये, रुपारेल यांसारख्या महाविद्यालयांत महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला होता. एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या "पर्णिता' संस्थेतर्फेही महाराष्ट्र उत्सव रवींद्र नाट्य मंदिरात रंगला. तब्बल 86 महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या साऱ्यामागे राजकीय प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवतो. मराठीची आवड अनेकांना असली तरी आत्मियता असणारे थोडकेच आढळतात. भाषेसाठी महाविद्यालयातील मराठी वाङ्‌मय मंडळे प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि मराठीचा त्यांना खऱ्या अर्थाने अभिमान वाटावा याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. वक्तृत्व, प्रश्‍नमंजुषा, काव्यवाचन स्पर्धा अशा पारंपरिक स्पर्धांबरोबरच बदलत्या काळानुसार अनेक अभिनव कार्यक्रमही होतात. पण एकूणच आजूबाजूचा परिसर आणि शिकण्याचे, ऐकण्याचे साधन बहुतांशी अमराठी असल्याने मराठीच भाषा बोलण्याचा आग्रह अजूनही महाविद्यालयात होताना दिसत नाही. वाचन संस्कृतीही तितकीशी खोलवर रुजलेली नाही. अभ्यासाला नेमलेली पुस्तके आणि संदर्भाची पुस्तके सोडून अवांतर वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. संगणकाची स्क्रिन एका क्‍लिकसरशी माहितीचे विश्‍व साकारते. म्हणून वाचनालयात बसून तासनतास विविध पुस्तके संदर्भासाठी चाळण्यासही विद्यार्थी तयार नसतात. त्यामुळे चांगली भाषा कानावरही पडत नाही आणि वाचनातही येत नाही. म्हणूनच भाषेची सरमिसळ क्रमप्राप्त आहे. वाङ्‌मय मंडळाला मात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. केवळ मराठी विषय घेतलेलेच नव्हे तर इतर विषयांचे विद्यार्थीही या मंडळाशी संलग्न असतात. इंग्रजी वातावरणात स्वत:ला व्यक्त करण्याचे व्यासपीठ म्हणजे मराठी वाङ्‌मय मंडळ, अशी विद्यार्थ्यांची मानसिकता आहे. रुईया महाविद्यालयात चिपळूणकर व्याख्यानमाला, न. र. फाटक स्मृती व्याख्यानमाला, श्री. पु. भागवत व्याख्यानमाला अशा कार्यक्रमांची माहिती केवळ माहिती फलकावर वाचून विद्यार्थी कार्यक्रमांना गर्दी करतात. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि वाचकदृष्टी अधिक व्यापक व्हावी याकरिता डी. जी. रुपारेल महाविद्यालयात पुस्तक परीक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थी एखाद्या पुस्तकाचे परीक्षण करतात. त्यावर चर्चा होते. तसेच मराठीची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या अनेक कार्यशाळा येथे घेतल्या जातात. मराठी विषय घेऊन करिअरचे अनेक मार्ग त्यातून सुचविले जातात. या महाविद्यालयात साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाषेचे खेळ घेतले जातात. मात्र हे प्रयोग केवळ विषय घेतलेल्या 40 ते 50 विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित राहतात. खरंतर असे प्रयोग प्रथम वर्षापासून घेणे गरजेचे आहे. मात्र वेळेच्या मर्यादेमुळे ते शक्‍य होत नाही, अशी खंत काही मराठी प्राध्यापकांनी व्यक्त केली. के. जे. सोमेय्या महाविद्यालयात तर मराठी भाषा आणि वाङ्‌मय मंडळ आहे. भाषेशी संबंधित विविध उपक्रम येथे राबविले जातात. अनंत भावे, मंगेश पाडगावकर अशा दिग्गज साहित्यिकांनी मंडळाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. अनेक नवनवे प्रयोग या महाविद्यालयात केले जातात. उद्‌घाटन कार्यक्रमाला एखादी साहित्यविषयक संकल्पना घेऊन कार्यक्रम सादर करतात. विद्यार्थ्यांनी मराठीचा खराखुरा अभिमान बाळगावा यासाठी त्यांना मराठीच्या विविध विषयांवर माहिती गोळा करण्यास सांगितली जाते. या माहितीचे संपादन करून वर्षातून तीन वेळा "आशय' नावाचे हस्तलिखितही काढले जाते. हे हस्तलिखित संदर्भासाठी वाचनालयात असते. तसेच वर्षभरात 12 महाविद्यालयीन आणि 3 आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेतल्या जातात. काळाच्या काहीशी मागे गेलेली कथाकथन स्पर्धाही होते. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असला तरी ते उपक्रम खोलवर रुजताना दिसत नाहीत. त्याची कारणेही समर्पक आहेत. सरमिसळ मराठी भाषा उद्देशपूर्वक बोलली जात नाही. शिकण्याचे माध्यम इंग्रजी असल्याने ते शब्द आपल्या नकळत लक्षात राहतात आणि ओठांवर येतात. यात मराठीची मोडतोड करण्याचा अजिबात उद्देश नसतो. असे बोलण्यात गैर काहीच नाही, पण आपण बोलणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी शब्द माहीत असणे आवश्‍यक आहे, या मताचा एक तरुण वर्ग महाविद्यालयात आहे; तर अगदी शुद्ध आवर्जून मराठी बोलायला जमणारंच नाही. ते आजच्या जगात शक्‍यही नाही. तसं बोललं तर इतर जण टिंगलटवाळीही करतात. बदलत्या जगानुसार आपण पोशाखापासून राहणीमानापर्यंत सगळ्या गोष्टी बदलल्या, मग या साऱ्यात भाषेत बदल होणं स्वाभाविकच आहे, असे काही तरुणांचे म्हणणे आहे. महाविद्यालयीन तरुणांची मराठी भाषा बिघडण्यामागे आजूबाजूचे अमराठी वातावरण असले तरी मराठी अभ्यासक्रमातही बदल होणे गरजेचे आहे, असे काही प्राध्यापकांचे मत आहे. वर्षांनुवर्षे मराठीच्या अभ्यासक्रमाचे एकच स्वरूप आहे. कालानुरूप त्यात बदल केला तर विद्यार्थ्यांची मराठी भाषा सुधारण्यास नक्कीच मदत होईल. भाषिक कौशल्य वाढीस लागण्यासाठी अनुरूप अभ्यासक्रम तसेच बातमी, कार्यक्रमांचे स्क्रीप्ट लिहिण्याचे तंत्र अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, अशी मागणी काही प्राध्यापकांनी विद्यापीठाकडे केली होती. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अभ्यासात या गोष्टी आल्या की विद्यार्थी त्या आपोआपच आत्मसात करतात, असे प्राध्यापकांनी सांगितले. उद्याचा नागरिक म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते. तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यामुळे त्याने महाराष्ट्राची मायबोली उत्तम आणि अस्खलित बोलणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच स्तरांतून जोरादार प्रयत्न करायला हवेत. हा लढा सोपा नसला तरी अशक्‍य नाही. कारण मराठीची आवड या तरुणाईत आहे. आवडीचे रूपांतर आत्मियतेत करायचे आहे. मराठी भाषेसाठी विविध उपक्रम काही मूठभर विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता ते व्यापक प्रमाणावर राबविले पाहिजेत. विद्यापीठापासून प्रसारमाध्यमांपर्यंत साऱ्यांचाच सहभाग त्यासाठी महत्त्वाचा आहे.