Thursday, April 29, 2010

जन्म मराठी अस्मितेचा! (भाग 6)

मुलाखत- राधिका कुंटे.

"लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी..." या मराठी अभिमानगीताचे सूर उद्या ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये अभिमानानं गुंजणार आहेत... असंख्य रसिकांच्या मनात निनादणार आहेत. मराठीला डाऊन मार्केट म्हणणाऱ्यांना संगीतकार-गायक कौशल इनामदार यांनी हे सडेतोड उत्तर दिलंय. अर्थात मराठीच्या अभिमानाचा हा प्रवास इथं संपणार नाही. ही तर केवळ नांदी आहे, मराठीप्रेमाची, मराठी अस्मितेची, मराठीच्या अस्तित्वाची... मग काय देणार ना साथ?...

---
अभिमानगीताच्या निमित्तानं "मराठी अस्मिता" या संस्थेचा जन्म झाला, त्याविषयी सांगा. या गीताच्या सीडीचा प्रकाशन समारंभ अगदी उद्यावर येऊन ठेपलाय. त्यामुळं आत्ता या क्षणी तुमच्या मनात कोणत्या भावना उमटताहेत...

- मराठी अभिमानगीताच्या निमित्तानं "मराठी अस्मिता" या संस्थेचा जन्म झाला. या संस्थेच्या आधारस्तंभांपैकी तीनजण आहेत माझे मित्र- उन्मेष जोशी, महेश वर्दे आणि मंदार गोगटे ! या तिघांनी मला या गीताच्या कामात अत्यंत मोलाची साथ दिली. त्यांची आणि आणखीनही इतर मित्रमंडळींची साथ मिळाली तर "मराठी अस्मिता"तर्फे आणखी खूप मोठे आणि भव्य असे प्रकल्प करण्याचं माझ्या मनात आहे. उदाहरणार्थ- चांगलं साहित्य, चांगलं काव्य पुढच्या पिढीपर्यंत अधिक परिणामकारक रितीनं पोहचवू शकता येईल. मराठी भाषेविषयी तरुण मनांत असणारा न्यूनगंड पूर्णपणं मिटवायचाय. मराठी डाऊनमार्केट भाषा वाटू नये, म्हणून खूप प्रयत्न करावे लागणार आहेत, ते आम्ही करणार आहोत. मनात आहे की खूप भव्य असे प्रकल्प मराठीसाठी करावेत, की ज्यामुळं जागतिक पातळीवर आपल्या भाषेचा उल्लेख होऊ शकेल. रहमान ऑस्करच्या स्टेजवर जाऊन तमीळमध्ये बोलला होता. आपण दादासाहेब फाळके यांच्या नावाच्या निमित्तानं भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार द्यायला लागू, असं झालं पाहिजे. हॉलिवूडच्या कलावंतांना दादासाहेबांच्या नावानं पुरस्कार घेताना गौरव वाटायला हवा. याच भावी उपक्रमांपैकी एक म्हणून पुढल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर संगीताचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजण्याचं मनात आहे. यात मराठी कलाकारांसोबत काही आंतरराष्ट्रीय स्तरांवरचे कलाकारही असतील. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था नि व्यक्तींचाही सहभाग असेल. मराठी लोकांनी मराठी चित्रपट काढून ते बहुभाषिक करता येतील, असे अनेक प्रकल्प सध्या मनात आकारत आहेत.
हे सगळं मी बोलतोय तरी आत्ता या क्षणी माझ्या मनातली खळबळ तुम्हांला कशी काय समजणार? असं म्हणतात ना की खरं शौर्य हे मृत्यूला सामोरं जायला लागत नाही तर आयुष्याला सामोरं जायला खरं शौर्य लागतं... आत्ता मला अगदी त्याचा प्रत्यय येतोय. कारण जे कठीण काम होतं ना ते झालंय. सव्वा वर्षात इतक्‍या सगळ्या लोकांना एकत्र करून, जणू काही एक लाख सदुसष्ट वेळा आपली भूमिका विविध लोकांसमोर सातत्यानं मांडण्याचा सगळा कठीण काळ उलटलाय. आता सगळं उंबऱ्यावर आलंय... जे आता फक्त ओलांडायचंय... या सव्वा वर्षात वाटत नव्हती एवढी भीती आता वाटतेय... हे सारं कसं होईल, सत्तावीस तारखेनंतर हे गाणं किती पसरेल... कारण आत्तापर्यंत कसं सगळं माझ्या हातात होतं, सगळं मीच करत होतो. आता गाणं पसरायचंय म्हटल्यावर ते माझ्या हातात राहणार नाही. ते आता महाराष्ट्रात... कदाचित जगात जाईल... सध्या माझ्या मनात कलावंत म्हणून नेहमीच सगळ्यांना वाटणारी धाकधूक राहायला आलेय. की मी केलेलं काम सगळ्यांना आवडेल का? त्याला मराठीप्रेमींकडून कसा प्रतिसाद मिळेल? वगैरे. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की, ज्या दिवशी हे सगळं पूर्ण होईल, त्या दिवशी किती समाधान वाटेल. ते समाधान मला वाटत नाहीये. मला असं वाटतंय की ही आता सुरुवात आहे नि आणखीन बरंच काम राहिलेलं आहे. समजा आपण एखादा माहुलीचा डोंगर चढून गेलो की आपल्याला वाटतं की क्‍या बात हैं... आपण खूप काही मिळवलंय. पण आपण समोर बघतो तो आणखीन मोठा रायगड उभा असतो, तो सर केल्यावर दिसतं की यावरही आणखीन हिमालय आहेच... तसं माझं आत्ता होतंय की क्षेत्रफळ टप्प्यात आलंय, पण अजून बरंच अंतर पार करायचंय...
आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी झालं असेल की वैयक्तिक आयुष्यात काहीतरी अचिव्ह करायचंय म्हणून मी हे केलेलं नाही. असं करण्यातली मौज खूप असते तशीच नि तेवढी जबाबदारीही जास्त असते. वैयक्तिकरित्या एखादं काम करायचं झालं नि त्यात यश किंवा अपयश आलं तर ते सगळं आपल्याला सोसायचं असतं किंव एन्जॉय करायचं असतं. इथं असं नाही होणार. इथं माझ्यासोबत खूप लोक जोडले गेलेत आणि हे सगळं पुढं न्यायचं असेल तर मला अजून उत्साहाची नि प्रोत्साहानाची गरज आहे. मला आता कळंतय की समनाजातल्या खूप मोठ्या व्यक्ती इतकी विनयशील का असतात. मोठ्या अचिव्हर्सना वाटत असणार ही तर अगदीच छोटी गोष्ट आहे. सव्वा वर्ष हा काही आयुष्यभरातला स्पॅनच नाहीये. याहीपेक्षा खूप मोठी कामगिरी करणारे लोक असतात. ते इतके विनयशील असतात... हा मला एक जमिनीवर आणणारा अनुभव होता. कारण माझ्या लक्षात आलंय की करायला अजून खूप काही आहे. लोक एखाद्या ध्येयासाठी आयुष्य वेचतात... मग सव्वा वर्ष काय आहे? त्यामुळं मला या सगळ्याची भीती वाटतेय.
हे सगळं आता पुढं जायला पाहिजे. ते इथवरच थांबून उपयोग नाही, असंही वाटू लागलंय. त्यामुळं विचार करता करता मला सई परांजपे यांच्या एका चित्रपटातल्या पात्राच्या तोंडीचं एक वाक्‍य आठवतंय की- "कलाकार की बैचैन आत्मा..." हा "बैचैन आत्मा" का असतो, ते मला आता कळतंय. अजूनही कितीतरी करण्याजोग्या गोष्टी बाकी आहे, हे कळंतय. त्यामुळं पुढं काय करता येईल, याचा विचार सुरू झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांत पंधराव्या क्रमांकावर असणारी मराठी भाषा केवळ कोषांत गुरफटून चालणार नाही, तर तिचं सामर्थ्य सगळ्यांना कळायला हवं. मराठी लहान आणि तरुण मुलांना मराठीची महती कळायला हवी. आपल्या मातीत राहून आपल्याला जग जिंकता येतं, हा आत्मविश्‍वास तरुण पिढीच्या मनात निर्माण होऊन आपल्या भाषेविषयी प्रेम आणि आत्मीयता निर्माण व्हायला हवी. असं झालं तर मग आपलं नि आपल्या भाषेचं भविष्य उज्ज्वलच आहे. भाषा समृद्ध झाली की संस्कृती समृद्ध होते. संस्कृती समृद्ध झाली की आपलं आयुष्य समृद्ध होतं कारण आपण आणखीन श्रीमंत होऊन जातो, आयुष्यातली रुची वाढते. हे सगळं व्हायचं असेल तर भाषा समृद्ध व्हायला हवी.
सुरुवातीला जे मला म्हणायचे की एका गाण्यानं काय होणार, त्याचं चुकतच होतं. पण आता वाटतं की, एका अर्थानं ते बरोबरही आहे. एका गाण्यापलिकडं जाऊन काहीतरी केलं पाहिजे, असा उद्देश कदीाचित त्यामागं असू शकतो. हे असं वाटणंही आणि त्याची सुरुवात या गाण्यापासून होणं, ही मराठीच्या चांगल्या भविष्याची जणू नांदी आहे. आधी एका मैदानात होणारा कार्यक्रम आता एका स्टेडियममध्ये होतोय.... लोकांचा प्रतिसाद वाढतोय... इथंच भाषेच्या कक्षा रुंदावतायत असं वाटतं... हे हिमालयाच्या यात्रेचं पहिलं पाऊल आहे. अजून शेकडो मैलांचं अंतर कापायचंय... त्यात तुमचीही साथ हवेय, नव्हे ती असेलच यात्री खात्री आहे... कारण "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी..."

No comments:

Post a Comment