Wednesday, April 28, 2010

मराठी वृत्तवाहिन्यांचा जयजयकार!

हेमंत देसाई
आपले जीवन आज 24 x 7 वृत्तवाहिन्यांनी वेढून टाकले आहे. चित्रपटांचे, टीव्ही मालिकांचे एवढेच काय, राजकीय नेत्यांचे प्रमोशनही याच वाहिन्या प्रभावीपणे करतात. दुय्यमतिय्यम राजकीय कार्यकर्ते नेत्यांना आपण वाहिन्यांमध्ये चमकलो, तरच ज्येष्ठ नेते आपल्याकडे लक्ष देतील, असे वाटत असते. पाच वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांना वर्षाला 500 कोटी रुपयांच्या जाहिराती मिळत. आज हा आकडा 1500 कोटी रुपयांवर जाऊन पोचला आहे. एकूण वर्षाला 10 हजार कोटी रुपये कंपन्यामार्फत खर्चिले जातात. त्यातले 15 कोटी वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातीकरिता वेचले जातात. साक्षरता, सुखसमृद्धीबरोबरच जनतेच्या आकांक्षा वाढत असल्याने लोक अधिकाधिक प्रमाणात या वाहिन्यांकडे खेचले जाणार यात शंका नाही.देशात 10 तरी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या आहेत. स्थानिक व प्रादेशिक वाहिन्यांची तर गणतीच नको. हिंदीत आज तक, इंडिया टीव्ही, स्टार न्यूज, झी न्यूज, आयबीएन सेव्हन व एनडीटीव्ही इंडिया अशा प्राधान्यक्रमानुसार आघाडीवरच्या वाहिन्या आहेत. इंग्रजीत टाइम्स नाऊ, एनडीटीव्ही 25 x 7 व सीएनएन आयबीएन या अव्वल वाहिन्या आहेत. इंग्रजी बिझनेस वाहिन्यांत सीएनबीसी टीव्ही 18 अग्रेसर आहेत आणि त्यानंतर एनडीटीव्ही प्रॉफिट, ब्लूमबर्ग यूटीव्ही व ईटी नाऊ यांचा नंबर लागतो. हिंदीत सीएनबीसी आवाज पहिला व झी बिझनेस दुसरा. त्यांच्याशिवाय आहेच कोण?टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंट (टॅम)च्या प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार- प्रादेशिक वृत्तवाहिन्यांची भरधाव प्रगती सुरू आहे. त्यातही महाराष्ट्र, आंध्र, केरळ व प. बंगाल इथे ही प्रगती सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात तर लोक हिंदी / इंग्रजीमधील राष्ट्रीय बातम्या बघतात आणि स्थानिक बातम्या मराठीतून ऐकणे पसंत करतात. म्हणजे मराठी भाषा नष्ट होत चालली आहे, असा टाहो फोडण्याचे कारण नाही.मुंबईत परप्रांतीयांची संख्या लक्षणीय आहे. हिंदी चित्रपट व हिंदी मालिकांचे हे प्रमुख निर्मिती केंद्र आहे. त्यामुळे या महानगरात हिंदी प्रचलित आहे. मराठी लोक, खासकरून तरुण पोरं-पोरी बोलताना हिंदीचा खूप वापर करतात. तरीदेखील टॅम मीडिया रिसर्च प्रा. लि.च्या पाहणीनुसार ऑक्‍टोबर 2009 मध्ये मराठी वाहिन्यांच्या प्रेक्षकांमध्ये 25 टक्के वाढ झाली. 2007 मध्ये 13 टक्केच वाढ झाली होती. राष्ट्रीय पातळीवर मराठी प्रादेशिक दूरचित्रवाणीची प्रेक्षकसंख्या 2.7 टक्‍क्‍यांवरून दोन टक्‍क्‍यांवर गेली आहे.2009 मध्ये हिंदी एंटरटेन्मेंट, दक्षिणी भाषिक वाहिन्या, हिंदी चित्रपट, तसेच मुलांच्या वाहिन्यानंतर लोकप्रियतेत नंबर लागला तो मराठी वृत्तवाहिन्यांचा. त्यानंतर हिंदी वाहिन्यांचा नंबर लागतो. 2006 मध्ये मराठी वृत्तवाहिन्यांची प्रेक्षकसंख्या जवळपास काहीच नव्हती; पण आता वाहिन्या वाढल्या आहेत.2007 मध्ये मराठीतील पहिली 24 तासांची वृत्तवाहिनी "झी'ने सुरू केली. त्यांनतर "स्टार माझा' व मग "आयबीएन लोकमत' आली. "ईटीव्ही' व "साम'ने मनोरंजन व बातम्या देण्याचा प्रयोग केला. मराठी वृत्तवाहिन्यांनी निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. पूर्वी "सह्याद्री'ची मक्तेदारी होती. मग ई टीव्ही आला आणि त्यानंतर स्टार, तसेच आयबीएन लोकमत. लोकांना अधिकाधिक पर्याय हवे असतात.विशेष म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या स्तरातील नगरांमध्ये केबल व उपग्रह वाहिन्या असलेल्या घरांची संख्या दिवसेंदिवस फुगत चालली आहे. स्थानिक बातम्या पडद्यावरून पाहण्याची जनतेची भूक वाढत चालली आहे. प्रादेशिक बातम्या मराठीतून बघायला लोकांना आवडते.मध्यंतरी प्रसारमाध्यमातील काही भंपक लोक असे म्हणत होते, की म्हणे वाचक प्रेक्षकांना राजकारणात रस नाही. त्यामुळे आपण फक्त टेन्शन खल्लास करण्याच्या जमाडी जम्मत छाप बातम्या देऊ; पण हा युक्तिवाद पूर्णतः बोगस होता. राज्यात सहकारी कारखाने, बॅंका, दूध संघ, कृषी उत्पन्न बाजारपेठा यांचा ग्रामीण व निम्न ग्रामीण जीवनावर अजूनही पगडा आहे. ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, नगरपालिका यांचे महत्त्व कायम आहे. उलट जास्तीत जास्त जनतेस राजकीय व लोकशाही प्रक्रियेत सामील व्हायचे आहे. त्यामुळे त्यांना राजकीय घडामोडी व त्याबद्दलच्या बातम्यांत प्रचंड रस आहे. अण्णा, आबासाहेब, दादा, विलासराव, उद्धव, राज यांचे कार्यक्रम, त्यांची वक्तव्ये बघण्या-ऐकण्यात जनतेला रस आहे. त्यामुळेच लोक सर्व प्रकारच्या मराठी वृत्तवाहिन्या बघत आहेत. महाराष्ट्रात मराठी करमणूक, तसेच वृत्तवाहिन्यांनी म्हणूनच 21 टक्के ग्रॉस रेटिंग पॉइंटस्‌ मिळविले आहेत. मराठी लोक हिंदीपेक्षा मराठी वाहिन्या बघणे पसंत करतात, हे ऐकून फक्त राज ठाकरेंनाच नव्हे, तर तुम्हा-आम्हा सर्वांनाच आनंददायी वाटेल.भारतात किमान 18 भाषा आणि 1000 भर तरी बोली आहेत. त्यामुळे देशभर एकच एक वृत्तपत्र वाचले आणि एकच एक वाहिनी बघितली जाईल, हे संभवतच नाही. भारतात इंग्रजी जाणणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी हे प्रमाण अद्याप मर्यादित आहे. त्यामुळे इंग्रजीतली वृत्तपत्रे लहान शहरांतही पूर्वीपेक्षा जास्त खपतात; पण तरी ही संख्या तसा मर्यादित आहे. उलट राजस्थान पत्रिका, भास्करसारखी दैनिके तुफान खपत आहेत. ही वृत्तपत्रे एकापेक्षा अधिक ठिकाणाहून प्रसिद्ध होतात आणि त्यांनी एक प्रकारे सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचप्रमाणे बहुतेक राष्ट्रीय वाहिन्यांनी प्रादेशिक वाहिन्या चालू केल्या आहेत. स्टार नेटवर्कने बंगाली व मराठी वाहिन्या चालू केल्या. एनडी टीव्हीने चेन्नईत एनडी टीव्ही मेट्रोनेसन सुरू केली. सीएनएन आयबीएनने आयबीएन लोकमत सुरू केले. प्रादेशिक स्तरावरील कंपन्यांप्रमाणेच राष्ट्रीय वाहिन्यांच्या प्रादेशिक वाहिन्या यापुढचा टप्पा असेल तो प्रादेशिक भाषेतील लाईफस्टाईल, ट्रॅव्हल व बिझनेस चॅनेल्सचा, राष्ट्रीय वाहिन्यांनी भाषिक वाहिन्या चालू केल्यामुळे प्रादेशिक केंद्रांमधून होणारे राष्ट्रीय वाहिन्यांवरील कव्हरेजही वाढते. बातम्यांना अधिक खोली लाभते.मराठी करमणूक व वृत्तवाहिन्यांचा पसारा वाढला आहे. त्यामुळे या वाहिन्यांचा राष्ट्रीय वाहिन्यांवरील (म्हणजे मुख्यतः इंग्रजी, हिंदी) प्रभाव वाढू शकेल. केवळ दिल्ली व मुंबईतून उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा यवतमाळ-अकोला, बीड-परभणी, धुळे-जळगाव, सावंतवाडी-रत्नागिरी किंवा सातारा-सांगलीतील घडामोडी तेथे जाऊन तपशिलात कव्हर करणे महत्त्वाचे आहे. तिथल्या अन्याय-अत्याचाराच्या बातम्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचू शकतात.मराठी वृत्तवाहिन्यांच्या विस्तारण्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्राची सुख-दुःखे सर्वत्र पोचतात. आपले औदार्य व संकुचितपणा, इथली श्रीमंती व गरिबी, इथल्या आत्महत्या आणि बलात्कार, इथले आविष्कार स्वातंत्र्य व इथली सेन्सॉरशिप हे सारे देशवासीयांना मोठ्या प्रमाणात माहीत होऊ लागले आहे. वृत्तवाहिन्यांच्या यशामुळे मराठीपणाचा अभिमान वाटतोच; पण सामान्यजन व राजकीय-सामाजिक नेतृत्वात जबाबदारीची जाणीवही उत्पन्न व्हावी, ही अपेक्षा!-

No comments:

Post a Comment