Monday, May 3, 2010

आगरातली आगर बोली

शंकर सखाराम
दर्यावरचा कोळी, आगरातला आगरकर-आगरी, माळातला माळी आणि रानातला आदिवासी अशा भौगोलिकदृष्ट्या कोकणातल्या आगरातील वसाहती. आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. (थोडक्‍यात, प्लांटेशन) असे आगर पिकविणारा तो आगरकर-आगरी. या आगरी समाजाची वस्ती रायगड (पूर्वीचा कुलाबा), ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोकण सोडून धुळे, जळगावपासून गुजरातपर्यंत ती तुरळक प्रमाणात आहे. या समाजाची बोली ती आगरी बोली, असे या बोलीचे नामकरण करता येईल, परंतु आगरी ही एक जात समजली जाते. तेव्हा अशी जातीची बोली- आगरी बोली म्हणणे संकुचितपणाचे आहे. शिवाय ही बोली हाच समाज बोलतो असे नाही, तर आगरातील बलुतेदार, आदिवासी यांच्याबरोबर दुकानदार-मारवाडीही प्रसंगपरत्वे ही बोली बोलतात. शिवाय कोळी, माळी हे समाज जवळ असल्याने त्या बोलींची मिश्रता या बोलीत आहे. तेव्हा सर्वसमावेशक दृष्ट्या या बोलीस आगरातील बोली- "आगर बोली' म्हणणे संयुक्तिक वाटते.ही आगर बोली समुद्राकाठची असल्याने हीत उच्चारस्पष्टता हवी तशी नाही. विरार-वसईकडे ही बरीचशी अनुनासिक आहे; तर अलिबागकडे तशी स्पष्ट आहे. ही बोली जवळजवळ प्रत्येक गावानुसार थोडीशी बदलते. मुंबईतील हा मूळ समाज ही बोली विसरला आहे; तर नवी मुंबईतील ही बोली कोळी समाजबोलीमिश्रीत अशी आहे. वसई-पालघरकडे ही बोली वाडवळ, भंडारी बोलीमिश्रीत अशी येते.आगरी समाजाचे पूर्वी 1) शुद्ध आगरी, 2) दस आगरी व 3) वरप आगरी असे पोटजातीत वर्गीकरण होत होते. शुद्ध आगरीत मीठ आगरी, जस आगरी व ढोल आगरी असे उपपोट प्रकार होते. आज मात्र असे प्रकार मानले जात नाहीत. खुद्द मुंबाआईच्या मुंबईत चौदा पाटील, बारा पाटील, आगळे आगरी असे स्तर मानले जात, तेही आता मानले जात नाहीत.आगर बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे "ळ'च्या ऐवजी "ल' व "ण'च्या ऐवजी "न' जसे सकाळ- सकाल, पळव-पलव, कोण-कोन, बाण-बान, वळण-वलन.या बोलीची रूपे व काही शब्द महानुभाव पंथीय व भागवतधर्मीय ग्रंथलेखनात दिसून येतात. विशेषतः लीळाचरित्र, दृष्टांतपाठ व ज्ञानेश्‍वरीत जास्त प्रमाणात दिसतात. आगरात लोकगीते व लोककथा यांचा भरणा जास्त आहे. ही लोकसंपदा म्हाताऱ्या आजीकडून- डोकऱ्यांकडून ऐकायला कर्णमधुर वाटते.गाय बा चऱ्हतं भीमा तीरी गो,भीमा तीऽऽरीगायला राखीत किस्न हरी गो,किस्न हऽऽरीकाय बा वर्नू गायची शेपू गोगायची शेऽऽपू,जशी नांगीन घेतं झेपू गो,नांगीन घेतं झेऽऽपूकाय बा वर्नू गायच्या मांड्या गो,गायच्या मांऽऽड्याजशा पालुखीच्या दांड्या गोपालुखीच्या दांऽऽड्याइथे तेराव्या शतकातील प्राकृत बोलीतील शेपू, नाकू, कानू अशी रूपे साकारलेली दिसतात.आगर बोलीत लोककथा अमाप आहेत. या लोककथा सांगताना अलिबागच्या आगरात नेहमी गोष्टीच्या ओनाम्याला येते ती तीन भावंडांची गोष्ट-अकामकची गोष्टयक व्हता अका, यक व्हात मका. आन्‌ त्या दोघांची यक बह्यनीस व्हती हिजू. त अका, मका आन हिजू गेली खारीन, झोलाला. अकला मिलला निवटा, मकला मिलला खरबा आन हिजूला मिलली कोलबी. तिघाजना आली घरा. अकनी निवटा टाकला चुलीन भुजत, मकनी खरबा आन हिजूनी कोलबी टाकली भुजत. न तिघाजना गेली नदीवर आंग धवाला. तिघाजना आंग धऊनशी आली, त हिजूची कोलबी करापली! मंग अकनी दिला डोचूक, मकनी दिला शेपूट आन हिजूचा जवान केला चालता. अशी तिघाजना जवली.(यक- एक, व्हता- होता, खारीन- खाडीत, झोलाला- मासे पकडायला, निवटा (खरबा, कोलबी)- मासळीचे प्रकार, चुलीन- चुलीत, भुजत- भाजत, आंग धवाला- आंघोळीला, करापली- करपली, डोचूक- डोके, जवान- जेवण, अधिक माहितीसाठी पाहा- "शब्दानुबंध'.कावला-चिरीची गोष्टयकदा कावला आन चिरीनी केली भागीन भातशेती. यलंवर पाऊस परला, आगोठ लागली. कावलनी धरला नांगर, चिरीनी केली भातपहिरनी. यलवर लावनी केली. चांगला पाऊस झाला. मस्त मशागत केली. जाम पीक आला. दोघाही मिलून लानी केली, भांदनी केली. मातर कावलनी यकटनीच मलनी काऱ्हली आन भाताच्या भरल्या बारीक गोनी, पलजीच्या भरल्या म्होट्या म्होट्या गोनी. आन चिरीला बोलला, "चिरबाय, तुल्हा या म्होट्या गोनी घे, मना बारक्‍या गोनी दे. "चिरीनी गोनी हालवून बघितल्या. ती कावलचा कावा समाजली. ती बोलली, "कावलंदादा, माझा बारका जीव मना बारक्‍या गोनी दे, तू म्होटा तुला म्होट्या गोनी घे.' पन कावला काय ऐकना. शेवटी परकरन गेला न्यायाधीसाकरं. त्यांनी केला न्याय आन चिरीला तिचा हिस्सा-वाटा मिलवून दिला. चिरी बोलली, "कावलंदादा, तुझी माझी आथा वाट यगली. तू तुझे वाटन जा, मी माझे वाटन.'दृष्टांतपाठात शोभाव्या अशा किती तरी आगर बोलीत लोककथा आहेत. अशी बोली ऐकताना या बोलीची काही वैशिष्ट्ये नोंदता येतील.1) "ळ' बद्दल "ल'- कंटाळा- कंटाला, नळ- नल, धूळ- धूल.2) "ण' बद्दल "न'- आठवण- आठवन, पण- पन, गोण- गोन.3) शब्दात प्रथम येणारा "ड' तसाच राहतो मात्र नंतरच्या "ड'चा "र' होतो. डबा- डबा, डसा, कडू- करू, वेडा- यरा, तडांग- तरांग.4) शब्दान्ती येणारा ओकार ऊकार होतो- गेलो- गेलू, आलो- आलू.5) ओकारान्त शब्द अकारान्त होऊन पुढे "स' येतो- घेतो- घेतस, मारतो- मारतस, करतस, जातस इ.6) शब्दान्ती "त' ऐवजी "व' येतो- घेतलात- घेतलाव, बघितलेत- बघितलाव, केलाव, तोरलाव इ.7) एकारान्त शब्द अनुस्वारान्त होतो- कुठे- कुठं, तिथे- तिथं, इथं.8) एकारान्त अनेक वचनात आकारान्त होते- झाडे- झारा, पोरे- पोरा, लाकडा, शेता.9) अनुस्वार स्पष्ट उच्चारला जात नाही- आंबा- आऽबा, चिंच- चिऽच, रंग- रऽग, हंडा- हाडा, पिंपळ- पिपल, खुंट- खूट.10) छ चा सर्रास स होतो- छत्री- सत्री, छोटा- सोटा, छोकरा- सोकरा, छगन- सगन, छडी- सरी.11) शब्दान्ती कटोर व्यंजन येऊन तत्पूर्वी व आला तर व चा अर्धा व होऊन त्यापुढे महाप्राण येऊन अन्तीच्या कठोर व्यंजनाचा र होतो- केवडा- कव्हरा, तेवढा- त्यव्हरा, जेवढा- जव्हरा.12) शब्दाच्या सुरुवातीच्या र चा कधी ल होतो- रडतोय- लरतय, रबर- लबर,13) जोड शब्दातील र वेगळा उच्चारला जातो- प्रकाश- परकास, मात्र- मातर, कात्री- कातर, श्रीमंत- शीरीमंत.14) श चा स होतो- शरद- सरद, शाप- सराप, शोध- सोद.15) सुरुवातीचा वि जाऊन त्याजागी इ. येतो- विमान- इमान, विमल- इमल, विषय- इषय, विरजण- इरजन.16) पण ऐवजी पन किंवा बी येते- मीपण- मीपन/बी, तू पण- तूपन/बी (सुद्धा ह्या अर्थाने- तू सुद्दा चल- तूपन/बी चल).17) ऊन, हून प्रत्ययाऐवजी शी येतो- गर्दीतून- गर्दीशी, गावातून- गावानशी, लांबून- लांबशी, गावाहून- गावशी.18) ला प्रत्यया ठिकाणी ल+महाप्राण येतो- तुला- तुल्हा, तिला- तिल्हा. मलाचे मना होते.19) त ऐवजी न येतो- फुलात- फुलान, रानात-रानान, मनात- मनान.20) नो (संबोधन) ऐवजी नू किंवा हू येतो- पोरांनो- पोरांनू/पोरांहू, गाववाल्यांनो- गाववाल्यानू/हू.21) "प्रमाणे' ऐवजी सारा/सारी येते- त्याप्रमाणे- त्या सारा/री मुलाप्रमाणे- मुलासारा, साखरेप्रमाणे- साकरंसारा.22) "होता', "नव्हता' ऐवजी "व्हता', "नता' येते.23) "आता'चे "आथा' होते- आथा कल्हा लरतस?24) "अ'चा सर्रास "आ' होतो- अंग-आऽग, अंतर- आंतर, असा- आसा.25) कशालाचे कन्हाला किंवा कल्हा होते- कन्हाला आलास?26) "वे' ऐवजी "य' येतो- वेडा- यरा, वेस- यस, वेगळा- यगला, वेद- यद, वेसण- यसन.27) "म' ऐवजी "म्ह' येतो- महादेव- म्हादेव, मोठा- म्होटा, मारुती- म्हारोती, महाराज- म्हाराज.28) "ढ' ऐवजी "ऱ्ह' येतो- गाढव- गाऱ्हव, पेढा- पेऱ्हा, कढी- कऱ्ही.29) सुरुवातीच्या "ओ' ऐवजी "व' येतो- ओटा- वटा, ओवा- ववा, ओकारी- वकारी, ओल- वल.30) "ए' ऐवजी "य' येतो- एक- यक, एकदा- यकदा, एवढा- यवऱ्हा.31) शेवटच्या ईऐवजी य येतो- सुई- सुय, रुखमाई- रुखमाय, आई- आय, घाई- घाय, जावई- जावय.32) सुरुवातीचा ऐ कार जाऊन मूळ अक्षरापुढे ई कार येतो- बैल- बईल, म्हैस- म्हईस, वैद्य- वईद, मैल- मईल, खैर- खईर, सैल- सईल.33) सुरुवातीचा औ कार जाऊन मुळाक्षरापुढे ऊ येतो- मौज- मऊज, गौर- गऊर, फौज- फऊज, हौद- हऊद, कौल- कऊल.अशी ही उत्तर कोकणची आगर बोली मराठी सारस्वतात पूर्वी लेखनात न आल्याने फारशी रुळली नाही, पण तशी ही समजण्यास कठीण मात्र नाही. माझ्या कथा, कादंबरी व ललित लेखनातून ही प्रथमच कलात्मकरीत्या मोठ्या प्रमाणात आली आहे. बरोबरच आदिवासी-कातकरी, कोळी, माळी, कोकणी मुसलमानी याही कोकणी बोली माझ्या अनेक पुस्तकांतून आल्या आहेत. जिज्ञासूंनी मुंबई विद्यापीठात अभ्यासास असणारी कादंबरी एसईझेड, घरपरसू, गावदरणी, कोसलन, आगरातली माणसं, बलुतेदार वगैरे पुस्तके पाहिली तर या बोलींचा परिचय होईल.

संगणकावर "सोप्पी मराठी' लिहिण्यासाठी!

मराठीचा संगणकातला वापर सोपा व्हावा यासाठी गेली काही वर्ष वेगवेगळ्या पातळ्यावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे "शोध मराठीचा'तर्फे नुकतीच एक सीडी प्रकाशित करण्यात आली. त्याबद्दल-
----
"शोध मराठीचा' टीम
---
"सोप्पी मराठी'च्या अंतरंगातील काही महत्त्वाच्या गोष्टी1. "हवेवर ओठांनी लिहिले तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे आणि संगणकीय फॉण्टने अर्थातून विहरावे' या "शोध मराठीचा' संशोधनाच्या सिद्धान्ताला अनुसरून निर्माण केलेला पहिला टप्पा म्हणजे "सोप्पी मराठी' होय.2. संगणकात चिरकालीन टिकणारा, मायक्रोसॉफ्ट आणि इतर कंपन्यांच्या विविध ऍप्लिकेशन्समध्ये चालणारा. 100 टक्के मराठी फॉण्ट "गांगल 1'चा वापर "सोप्पी मराठी' या उपक्रमात केलेला आहे. "गांगल 1' फॉण्ट आणि "सोप्पी मराठी' ही जोडगोळी मराठीच्या "आश्‍चर्यकारक सहजसुलभ संगणकीय वापरासाठी' अत्यावश्‍यक ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे. "मराठीच्या संगणकीय प्रमाणीकरणाचा सूत्रधार' म्हणजे "गांगल 1 फॉण्ट + सोप्पी मराठी' होय.3. आपण ध्वनीच्या उच्चारातून जे प्रदर्शित करतो, ते सर्व लेखनातून कागदावर गोंदविता येत नाही. पण "संगणकीय लेखनाचा' उपयोग; त्यानंतर त्यावर करता येणाऱ्या "ऍप्लिकेशन्सच्या ऍटेचमेंटस्‌'च्या संस्कारांसह विविधतेने करता येतो. "सोप्पी मराठी' हा त्यातील एक टप्पा आहे. हा प्रवास इथेच थांबणार नसून मराठीला करता येणाऱ्या "संगणकीय आंदोलनाची' ही सुरुवात आहे.4. स्वर-अक्षर "हवेवर ओठांनी लिहिताना' आपण निव्वळ स्वराचा उच्चार करतो. "अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः' असे स्वर मराठीत आहेत. या स्वरांसाठीची चिन्हे व्यंजनाला लावली, की व्यंजन-अक्षरे बनतात. "व्यंजनाला जोडता येणाऱ्या एका स्वराचे एक चिन्ह एकाच चावीतून संगणकात उमटावे' आणि "प्रत्येक व्यंजनाला योग्य ठिकाणी जोडले जावे', अशी सोय "सोप्पी मराठी'ने केली आहे.5. "इ, उ व ए' यांची दीर्घ रूपे संगणकात गोंदविण्यासाठी "इ'साठीचा रफार, "उ'साठीचा दीर्घ-उकार व "ए'साठीची मात्रा शोधावी लागते. "सोप्पी मराठी'ने या मानसिक त्रासातून मुक्तता देण्यासाठी "इ'चे चिन्ह दोनदा दाबले की "ई', "उ'चे चिन्ह दोनदा दाबले की "ऊ' व "ए'चे चिन्ह दोनदा दाबले की "ऐ' साकारेल, असे घडविले आहे. उच्चारासाठी जिभेचा वापर मेंदूने दिलेल्या आज्ञेनुसार सहजतेने होतो. "की-बोर्डवरील चाव्या आणि आपली मराठी-बोटे' यातील सहजता "मराठीच्या संगणकीय मानसिकतेतून' जाणून "शोध मराठीचा' संशोधनाने "सोप्पी मराठी' घडविली आहे. मराठी भाषेच्या "ध्वनी-वृत्ती'ला तिच्या "कागदी-वृत्ती'पर्यंत देवनागरी लिपी पोचविते. देवनागरी लिपीमुळे मराठीला एक विवक्षित "कागदी-वृत्ती' मिळते. त्यातून निर्माण होणाऱ्या मराठीच्या "संगणकीय-वृत्ती'नुसार तिच्या टायपिंगला आश्‍चर्यकारक सहजसुलभता देण्याचे काम "सोप्पी मराठी' करीत आहे.6. व्यंजनानंतर "र' हे व्यंजन आले, तर ते मराठीत "प्र', "क्र', "ड्र' असे भिन्नपणे लिहिले जाते. त्यासाठी संबंधित चिन्ह व्यंजनाला कसे व कोठे जोडायचे यासाठी टायपिंग करणाऱ्या बोटांना' विचार करावा लागतो. हे सोपे व्हावे यासाठी तशी सोय मूलभूत फॉण्टमध्येच दिली जात असे. "टायपिंग करणाऱ्या बोटांचा विचार' मूलभूत फॉण्टने केल्याने मराठीच्या संगणकीय वापरासाठीची एकूण चिन्हे 94 पेक्षा जास्त भरतात. संगणकाच्या अंतर्गत प्रस्थापित व्यवस्थेचा उपयोग करून घेण्याच्या क्षमतेवर असंख्य मर्यादा येतात. "आजचा संगणक आणि त्यातील विविध रचना', इंग्रजी भाषेच्या ठेवणीला अनुसरून घडविल्या गेल्या आहेत. मराठीने याच पद्धतींचा वापर करण्यावाचून आज तरी दुसरा मार्ग उपलब्ध नाही. मराठी फॉण्टची व्याख्याच "शोध मराठीचा' संशोधनाने बदलली आहे. 100 टक्के मराठी चिन्हे उपलब्ध करणे, "तो चिरकालीन चालण्याची व्यवस्था निर्माण करणे', "संगणकाच्या विविध पद्धतींतून ती व्यवस्थित चालणे अशा असंख्य गोष्टी म्हणजे "मूलभूत फॉण्ट' होय. अशा मराठी "मूलभूत फॉण्ट'च्या "टायपिंग करणाऱ्या बोटांना' सहजसुलभता प्रदान करणे हा त्यानंतर साध्य करता येणारा भाग ठरतो. "टायपिंग करणाऱ्या बोटांना' मराठीचा "गद्य, पद्य व संगीत' यातून साकारणाऱ्या अगणित अर्थ-निर्मितीपर्यंत पोचता यावे, यासाठीची सूत्रे "सोप्पी मराठी'सारख्या तंत्रातून मार्गस्थ करता येतात.7. "सोप्पी मराठी'ने "मराठी टायपिंग सोपे केले' आहे. त्याला "अपडेट'ची जोड द्यायचा विचार आहे.8. "सोप्पी मराठी'मुळे आनंदाने मराठी लिहिणारा समाज निर्माण होईल. मराठी सोपे, सहजसुलभ व आनंददायी ठरेल. मराठी भाषेच्या प्रगतीचा हा महत्त्वाचा टप्पा ठरतो, असे आम्हाला वाटते.-

कविराजांना दिसलेला महाराष्ट्र

डॉ. सुधीर मोंडकर
"महाराष्ट्र' हे नाव उच्चारताच, आमच्या मराठी भाषिक राज्याचा ऐतिहासिक, भौगोलिक नि सांस्कृतिक बाज नजरेसमोर उभा राहतो. पण हाच महाराष्ट्र येथील कविरायांना कसा दिसला? असा त्रिमिती बाज त्यांनी आपल्या काव्यातून रंगवलाय का? की काही वेगळ्या छटा त्यांनी दाखवल्या आहेत?श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या "महाराष्ट्र गीतात' येथील संपन्न भूमीचे दर्शन घडते. गगनभेदी पर्वत, विस्तृत जलायशय, भव्य प्रसाद, संपन्न शेती, चारित्र्यवान माणसांनी वसलेली घरे यांनी महाराष्ट्र बनलाय. विक्रम नि वैराग्य हे याच ठिकाणी नांदतात. जरीपटक्‍याच्या जोडीला भगवा डोलतोय. शक्ती-युक्ती, धर्म-राजकारण यांची विधायक युती झाल्याने महाराष्ट्राची कीर्ति त्रिखंडात पसरलीय. सदर महाराष्ट्र गीताच्या अपूर्व गेयतेमुळे मराठी रंगभूमीवर नांदीचे भाग्य या गीताला लाभले नि ज्याच्या-त्याच्या तोंडी ते घोळू लागले -बहु असोत सुंदर संपन्न की महा।प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा।।कोल्हटकरांचेच पट्टशिष्य राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज हे आपल्या काव्यात महाराष्ट्र रंगवताना म्हणतात, हा देश दगडासारखा कणखर, फुलासारखा कोमल, करवंदीसारखा काटेरी आणि बकुळप्राजक्तांनी फुललेला आहे. बुद्धी व भक्ती यांच्या युतीने तो फुलला आहे. गोदा, कृष्णा, भीमेच्या जलाने महाराष्ट्राच्या पाषाणदेहाला स्नान घातले आहे. डोंगरदऱ्यात वसलेले शिवशाहीचे गडकोट त्याच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत, तर संतशाहीर त्याचे गुणगान आपल्या कवनाद्वारे करत आहेत. या काव्याचा प्रभाव एवढा की, 83 व्या मराठी संमेलनात अमिताभ बच्चनसारख्या अमराठी कलाकाराला ह्या गीताच्या पंक्ती सादर कराव्याशा वाटल्या -मंगलदेशा। पवित्र देशा। महाराष्ट्र देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।"महाराष्ट्र लक्ष्मी' ही विनायकांची कविता. भक्तिभावाने महाराष्ट्राचे गुणगान करताना ते म्हणतात -महाराष्ट्र लक्ष्मी माते जगी धन्य वाटे।यशोगीत तिचे गाता मनी हर्ष दाटे।।असा हा महाराष्ट्र परचक्राने ग्रासलेला, पारतंत्र्यात खितपत पडलेला, दुष्काळाने गांजलेला असला तरी संकटातही ताठ कण्याने मान उंच करून पाहतोय. आपल्या जीवनात महाराष्ट्राने जे दिव्य सोसलेय, त्यामुळे त्याचे भवितव्य उज्ज्वल असणार आहे.महाराष्ट्रात परस्परविरोधी भूभाग पाहावयास मिळतात. कोकणभूमी ही आंबा, सुपारी, साग, नारळ यांनी लगडली आहे, तर घाटावरचा भाग कळकीचे बेट, करवंदी-बाभळ-बोरी यांसारख्या वृक्षराईंनी बहरलेला आहे. अशा भूमीचे स्तवन करताना एक शाहीर म्हणतो -हिरवे हिरवे सारे रानकुठे नागवेली पानकसा पिकला गं गहू हरभरा!हा शाळू मक्‍याचा तुरामहाराष्ट्र देश सुंदरा!डॉ. सुधीर फडके विरचित व शाहीर अमर शेखांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सभांमध्ये आपल्या पहाडी आवाजात पुढील गीत सादर केले-जनतेच्या सत्तेची ज्योत जागती।गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती।।मराठी माणूस मग तो कोकणी, घाटावरचा, नागपूर-विदर्भाचा असो सारे महाराष्ट्रासाठी एक होतात. शेतकरी, कामगार हे सारे जाती-धर्माची बंधने तोडून अन्यायाविरुद्ध लढतात. हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशासाठीदेखील! या "अमर' गीताने साऱ्या महाराष्ट्राला जाग आणली नि संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यास उद्युक्त केले.जानेवारी 1956! संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ऐन रणधुमाळी. समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू झाली. आचार्य अत्रे प्रथम मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातत व नंतर ठाण्याच्या तुरुंगात. त्यांच्या डोक्‍यात त्या वेळी फक्त "संयुक्त महाराष्ट्र' भरला असल्याने दुसरे काही लिहू म्हटले तरी त्यांना लिहिता येईना. गडकऱ्यांच्या या पट्टशिष्याला "महाराष्ट्र गीताचे' अनुष्टुभ सुचले. चार महिन्यानंतर 5 एप्रिल 1956 ला ते तुरुंगातून सुटले, ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी करू अशा आत्मविश्‍वासपूर्ण निर्धाराने! "नवयुग'च्या कचेरीत आल्यावर पुढील महाराष्ट्र गीताने उभ्या महाराष्ट्राला वंदन करून आपल्या वृत्तपत्रीय कामकाजाचा त्यांनी श्रीगणेशा केला-महाराष्ट्र तुझ्या पायी असो साष्टांग वंदन।तुझ्यासाठी झिजो माझ्या देहाचे चंदन।।या गीतात महाराष्ट्र म्हणजे संतांचे माहेर नि वीरांची कर्मभूमी. त्याला निर्मून सारी पृथ्वी धन्य झालीय. या भूमीतील काटेकुटे हे फुलांच्या बिछान्यागत, तर कणीकोंडा हा गोड मांड्यासारखा अत्र्यांना वाटतो. अत्र्यांची ही उत्कट महाराष्ट्रभक्ती म्हणजे न्यारी देशभक्तीच होती, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मत होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे भीष्माचार्य सेनापती बापट यांनी महाराष्ट्र नि भारत यांच्यातील अतूट संबंधाचे वर्णन करताना म्हटलेय -महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले।खरा वीर वैरी पराधीनतेचा। महाराष्ट्र आधार या भारताचा।।महाराष्ट्राने पारतंत्र्यास आपला खरा वैरी मानले. त्यामुळे देशमुक्तीसाठी टिळक, सावरकर, आंबेडकर यांनी आपल्यापरिने प्रयत्न केले. 1962 मध्ये चिनी आक्रमणानंतर तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले आणि संकटग्रस्त भारताला आधार दिला. "भारते जन्म दुर्लभम्‌। महाराष्ट्रे तु अतिदुर्लभ्‌।।' अशा महाराष्ट्रात आपण जन्मलो, म्हणजे किती भाग्यवान!

मायबोली आणि तिच्या भगिनी

रामदास भटकळ
मायबोली किंवा मातृभाषा हा विषय वाटतो तितका सोपा नाही. माझी मातृभाषा कोंकणी, तर माझ्या नातीची बंगाली. माझ्या शालेय शिक्षणात माध्यम इंग्रजी, तर पर्यायी भाषा मराठी. माझ्या वडिलांची कानडी. माझी मुले, नातवंडे मराठीतच वाढलेली; पण स्वेच्छेने इंग्रजीकडे वळलेली. कर्नाटकातले कुटुंब महाराष्ट्रात राहिले, तर एक मातृभाषा, बेंगळूरुला दुसरे, तर दिल्ली, दुबई, लंडन, मेलबर्नला वेगवेगळे हा गुंता कसा सोडविणार.आपल्याला आई एकच, तशी मायबोली एकच, असे मानले तरी आपल्या आईला बहिणी असू शकतात आणि या मावशाच आपल्या बहिणीला आधार देतात हे जाणले पाहिजे. ज्या माध्यमातून आपण आपल्या परिसरातील आणि परिवारातील मंडळींशी संपर्क साधू शकतो याच नव्हे, तर त्या-त्या भाषेसंबंधी प्रेम आणि जागरुकता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मी घरात कोंकणी बोलतो, मित्रमंडळीत मराठी, कार्यालयात इंग्रजी, बाजारातील व्यवहारात हिंदी, क्वचित आंतरराष्ट्रीय व्यवहारात किडूकमिडूक जर्मन. या सर्व भाषांविषयी मला प्रेम आहे. मी बहुभाषिक आहे, याचा मला अभिमान आहे; किंबहुना आपण सर्वच भारतीय बहुभाषिक आहोत अशी माझी समजूत आहे.प्रत्येक भाषा ही अनेक भाषांपैकी एक आहे आणि भाषा-व्यवहाराच्या आवश्‍यकतेनुसार त्या त्या भाषेला महत्त्व आहे याची जाण बाळगली पाहिजे. स्वतःच्या गुजरातीबद्दल अखेरपर्यंत अभिमान बाळगणाऱ्या महात्मा गांधींनी निरनिराळ्या लिपींतील आठ भाषा शिकून घेतल्या आणि त्यांचा योग्य तो उपयोग केला. आपल्याला भाषांच्या जडणघडणीचे काम करताना "शुद्धीकरणा'ची कास न धरता "वृद्धीकरणा'ची ईर्षा बाळगली पाहिजे. मी स्वतः मराठी भाषेसाठी काय केले? मी प्रकाशक. इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन हा माझ्या पोटापाण्याचा व्यवसाय; परंतु वयाच्या सतराव्या वर्षांपासून तो आता पंचाहत्तरीपर्यंत हौसेपोटी आणि वाङ्‌मयासंबंधीच्या प्रेमाने हजाराहून अधिक मराठी पुस्तके प्रसिद्ध केली. मामा वरेरकर-काका-कालेलकर यांच्या पिढीपासून आजच्या मनस्विनी लता रवींद्र, राही अनिल बर्वेपर्यंत शंभराहून अधिक लेखकांची पुस्तके प्रसिद्ध करण्याची संधी मिळाली. इब्सेन-ओनिल, मोलिअर-आनुई, टागोर-गिरीश कर्नाड अशा अनेकांची पुस्तके मराठीत आणली. विभावरी शिरूरकर, गं. त्र्य. देशपांडे, ऊर्मिला पवार अशा निरनिराळ्या प्रकारच्या लेखकांची मराठी पुस्तके हिंदी-इंग्रजीत प्रसिद्ध केली. माझे बंधू सदानंद भटकळ यांनी वाङ्‌मयकोष तयार केला. आता आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे काम हाती घेताना फक्त मराठी नव्हे, तर एकूणच आपल्या भाषा कशा समृद्ध होतील याचे भान ठेवले आहे.

नाते संस्कृत-मराठीचे

"सं स्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासून झाली?'' संत एकनाथांनी एकेकाळी हा प्रश्‍न उपस्थित केला; त्याला वेगळे संदर्भ होते. मराठीसारख्या प्राकृत भाषेला योग्य तो सन्मान दिला जात नव्हता आणि मूठभर विद्वानांना अवगत असणाऱ्या संस्कृतलाच फक्त महत्त्व होते. मराठीच्या रास्त स्थानाचा आग्रह धरतानाही एकनाथांनी किंवा त्यापूर्वी मराठीतून गीतेचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या ज्ञानेश्‍वरांनी संस्कृतला झिडकारले मात्र नव्हते. उलट या दोघांच्याही रचनांमधून संस्कृत भाषेतील शब्दकळेचे मनोज्ञ दर्शन होताना दिसते. मराठी भाषेचे संस्कृतशी असलेले नाते तोडून टाकण्याची भाषा अलीकडे होत असते त्यासंदर्भात हे आठवले.केवळ मराठीच नव्हे; तर बहुतेक भारतीय भाषांचे मूळ हे संस्कृतात असल्याने या सर्व भाषांवर संस्कृतची छाप या ना त्या स्वरूपात दिसते. मग ते शब्द असोत, भाषेची रचना वा व्याकरण असो की लिपी असो, हिंदी आणि मराठी भाषांनी तर संस्कृतची देवनागरी लिपी थेटच स्वीकारली आहे. अर्थात फक्त एवढ्यापुरतेच संस्कृत-मराठीचे नाते मर्यादित नाही. वाङ्‌मयीन परंपरा, काव्यवृत्ते, समास, सांस्कृतिक भोवताल अशा अनेक गोष्टी संस्कृतमधून मराठीत आल्या आहेत. संस्कृत ही उच्चवर्णीयांची, ब्राह्मणांची आणि हिंदूधर्मीयांची भाषा आहे, म्हणून त्या भाषेची परंपरा जाणीवपूर्वक सोडून दिली पाहिजे, तिचा त्याग केला पाहि,जे अशी भूमिका काही जण घेत असतात किंवा मध्यंतरीच्या शैक्षणिक धोरणांमुळे अथवा हेळसांडीमुळे संस्कृतचे अस्तित्व मराठीच्या क्षेत्रातून काहीसे पुसट होत गेल्याने, संस्कृत भाषा हे मराठीसाठी एक ओझेच बनून गेले. या भाषेचे जोखड फेकून द्या, कशाला हवा संस्कृत-मराठीचा संबंध, अशा तऱ्हेची भूमिका डोके वर काढू लागली. ती सोईचीही होतीच. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जेव्हा मराठीचे नवे लेखननियम तयार करण्यात आले, तेव्हा मराठी साहित्य महामंडळाने लेखन थोडे सुलभ करण्याचा प्रयत्न केला. मात्र संस्कृतला पूर्ण झिडकारण्यात आले नाही. कारण या भाषांमधले नाते सहजासहजी पुसून टाकण्याइतके तकलादू नाही.संस्कृतशी मराठीचे असलेले नाते खूप जुने आहे. या नात्याचे ओझे मानण्याचे कारण नाही. उलट संस्कृतला झिडकारून आपण मराठीचेही नुकसान करीत असतो. बरेचसे नुकसान झालेच आहे. संस्कृत भाषा हीच चोरांची भाषा आहे, अशी भावना बाळगली जाते. एके काळी संस्कृत ही उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती; म्हणून तिच्याकडे पाठच फिरवावी ही भूमिका योग्य नव्हे. तसेच संस्कृत ही केवळ धार्मिक भाषा नाही. या भाषेत तत्त्वज्ञानापासून विज्ञानापर्यंत आणि खेळांपासून भाषेच्या गमतीजमतींपर्यंत अनेक रोचक गोष्टी आहेत. आयुर्वेदासारखे आरोग्याला उपयोगी शास्त्र या भाषेत आहे. संस्कृत व्याकरण हे जर समजून घेतले तर बुद्धीला उत्तम खाद्य मिळते. भाषिक रचना समजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. केवळ यासाठीच नाही तर मराठीच्या पोषणासाठीही संस्कृत आवश्‍यक ठरते. मराठी शब्दांची व्युत्पत्ती, व्याकरण आणि भाषिक परंपरा संस्कृतचे थोडेफार ज्ञान असेल तर चांगल्या प्रकारे समजू शकतात. मराठीतील जुने साहित्य अभ्यासण्यासाठीही संस्कृत उपयोगी ठरते. संस्कृतकडे दुर्लक्ष म्हणजे मराठीचीही एक प्रकारे उपेक्षाच होय. संस्कृत एकेकाळी उच्चवर्णीयांची भाषा असेलही; पण आधुनिक शिक्षणाने ही भाषा सर्वांना खुली केली आणि दलित वर्गातही संस्कृत भाषेचे विद्वान निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अशांपैकी एक होते. उगाच जातीचा आणि भावनिक मुद्दा पुढे करून संस्कृतला विरोध करणे अत्यंत अयोग्य आहे.संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठीत जसेच्या तसे वापरले जातात. इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये ते वापरले जातात. प्रमाण मराठीचे नियम तयार करताना संस्कृत शब्दांचे स्थान विशेष लक्षात घेतले आहे. भाषेचे पोषण आणि विकास होण्यासाठी प्रमाणीकरण आवश्‍यकच असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि मराठीचे प्रमाणीकरण करताना संस्कृतचा आधार घेणे अपरिहार्य ठरते. भाषेच्या सर्व परंपरा सोडून देऊन भाषेचा विकास करता येत नसतो. संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठीत जसेच्या तसे आहेत तरीही असे कैक शब्द आपण मराठीत वेगळ्या प्रकारे लिहितो, म्हणजे तसे अधिकृतपणे स्वीकारण्यात आले आहेत. अशा तऱ्हेचे काही शब्द बघू. ऱ्हस्व, आल्हाद, आव्हान, चिन्ह, वन्हि, जान्हवी, प्रल्हाद, मध्यान्ह हे शब्द मराठीत याच पद्धतीने लिहिले जातात आणि हे सारे मूळ संस्कृत शब्दच आहेत. पण संस्कृतमध्ये ते पुढीलप्रमाणे लिहिले जातात - हृस्व, आह्लाद, आह्वान, चि, व,ि जावी, प्रह्लाद, मध्या. म्हणजे या आणि अशा तऱ्हेच्या इतर अनेक शब्दांबाबत आपण मराठीत त्यांचे स्पेलिंगच बदलून टाकले आहे. हिंदी भाषेत मात्र हे शब्द संस्कृतप्रमाणेच लिहिले जातात. ब्राह्मण हा शब्द तेवढा मराठीत मूळ पद्धतीने लिहिला जातो. खरे तर हाही अपवाद करण्याचे कारण नाही. असो. लिखित भाषेप्रमाणे अर्थाच्या दृष्टीनेही मराठीत काही संस्कृत शब्दांचे अर्थ बरोबर उलटे आहेत; तर काही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. इतरही भारतीय भाषांमध्ये हा प्रकार आढळतो. संस्कृतमध्ये परोक्ष आणि अपरोक्ष असे दोन शब्द आहेत, ज्यांचा अर्थ अनुक्रमे आहे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. पण मराठीत या शब्दांचा प्रयोग बरोबर उलटअर्थी केला जातो. संहार या शब्दाचा, विध्वंस अशा अर्थासोबतच गोळा करणे असाही एक अर्थ संस्कृतात होतो; तर मराठीत विनाश अशा अर्थानेच फक्त तो वापरला जातो. कटू हा शब्द संस्कृतात कडू आणि तिखट असे दोनही अर्थ (या शब्दाचे इतरही अनेक अर्थ आहेत) घेऊन येतो. मराठीत मात्र कटू म्हणजे कडू आणि तिक्त म्हणजे तिखट; तर संस्कृतात तिक्त म्हणजे कडू. मराठीत कटू वचनांनी घायाळ करणे किंवा कटू बोलणे, एखाद्याला झोंबणे असे शब्दप्रयोग केले जातात; तेव्हा मात्र संस्कृतमधील कटू या शब्दाचा तिखट हा अर्थच अभिप्रेत असतो! इतरही भाषांमध्ये अशी उदाहरणे दिसतातच. सत्कार शब्दाचा मराठीतील अर्थ आहे सन्मान; तर बंगालीत सत्कार म्हणजे अंत्यक्रिया. मल्याळीत कल्पना म्हणजे आज्ञा, अपेक्षा म्हणजे विनंती, प्रसंग म्हणजे व्याख्यान, वासना म्हणजे फुलाचा सुगंध. सर्वच भाषांमध्ये संस्कृत शब्दांचे प्रचलित अर्थ असे वेगवेगळे आहेत. शोधले तर अशा खूप गोष्टी सापडतील. भाषेच्या अशा गमतीजमती असतातच. त्यांची माहिती होण्यासाठीही संस्कृतशी थोडी जवळीक हवी.आपण अनेकदा इंग्रजी भाषेतील वचने सहजगत्या वापरतो. वास्तविक संस्कृतमधील सुभाषितांना तोड नाही, त्यातली मार्मिकता आणि अल्पाक्षरी सौंदर्य मराठीजनांना खरे तर परके नाही. संस्कृतची धार्मिकतेशी घातलेली सांगडही या भाषेला मर्यादित करून टाकते. संस्कृतमध्ये विविध विषयांवरील लिखाण असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. संस्कृत साहित्यविश्व तर अफाट आहेच. मराठीलाही त्याचा वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करण्याऐवजी त्याची उपेक्षा केली जाते, हे खेदजनक आहे.प्रमाण मराठीसाठी संस्कृतचा आधार पूर्णपणे सोडून देणे योग्य ठरणार नाही. कोणत्याही शब्दाचा विचार हा स्वतंत्रपणे होऊ शकत नाही, कारण प्रत्येक शब्दामागे काही परंपरा, एखादा धागा असतो. भाषेच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर तिचा वापर करणाऱ्या सर्वांनाच ही जाणीव असली पाहिजे. संस्कृत भाषेसाठी आणि तिच्या मराठीशी असलेल्या संबंधांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे. अलीकडे उत्तरांचलमध्ये असे प्रयत्न होताना दिसते. तिथे संस्कृतला द्वितीय अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. तिथे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. संस्कृतला एवढे प्रोत्साहन देण्यामागची त्याची काही विशिष्ट कारणे असतीलही; पण त्यामुळे तिथे संस्कृतकडे अधिकाधिक विद्यार्थी आकर्षित होत असून दलित वर्गातील मुलामुलींचा त्यात मोठा समावेश आहे. संस्कृत व्याकरण, त्या भाषेतील शब्दांचा वापर या गोष्टी नव्या पिढीत या भाषेबद्दल रुची निर्माण करणाऱ्या आहेत. आजच्या पिढीतील निरीश्वरवादी लोकांना किंवा तरुणांना संस्कृतमधील धर्मग्रंथांशी काहीच देणेघेणे नाही. पण एक भाषा म्हणून तिच्यात ते अतीव रस घेतात, असा तिथला अनुभव आहे. संस्कृतमुळे प्रादेशिक भाषांची समजही वाढते, हा फायदा आहेच. एक भाषा म्हणून मराठी अधिक सशक्त व्हावी म्हणून संस्कृतशी असलेली तिची नाळ तुटता कामा नये.
नंदिनी आत्मसिद्ध
nandini atmasidh@rediff.com

मराठी बोलण्याची सवय जिभेला लावण्याची गरज

जगदीश खेबुडकर
मराठी ही आपली मातृभाषा आहे. आईची भाषा म्हणूनच तिच्याकडे पाहिले पाहिजे. त्यामुळे ज्याप्रमाणे आईला विसरू नये, त्याप्रमाणे आईचा दर्जा असणाऱ्या आपल्या भाषेलाही विसरू नये. आपल्या भाषेचा नम्र आदर असला पाहिजे. "मराठी बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके...' असे खुद्द ज्ञानेश्‍वरांनीच आपल्याला सांगितले आहे. त्यांचा वारसा आपण चालविला पाहिजे. मला स्वतःला मराठीविषयी प्रचंड अभिमान आहे. मी मराठी शिक्षक म्हणून 35 वर्षे विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्याचे काम केले आहे. त्यामुळे मला मराठी भाषेची, मराठी काव्याची विशेष आवड आहे. वेद वाङ्‌मयातील तत्त्वज्ञान सांगणारी सर्व मराठी भाषांतरे मी खरेदी केलेली आहेत. माझे स्वतःचे मराठी वाङ्‌मयाचे छोटे वाचनालय आहे. आज मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे. त्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले पाश्‍चिमात्यांचे संस्कार आपण आजही सोडलेले नाहीत. ते तसेच आपण चालवीत आहोत. पुढे जाण्यासाठी आयुष्यात मोठे होण्यासाठी इंग्रजी आवश्‍यक आहे, असे उगाचच भासविले जात आहे. त्यामुळे पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालत आहेत. या विचारप्रणालीमुळे मराठी भाषा गौण मानली जात आहे आणि इथेच मराठी माणूस चुकत आहे. इतर भाषा शिकण्यास माझा कोणताही आक्षेप नाही. प्रगती व गरजेसाठी इतर भाषाही शिका; मात्र त्या सहभाषा म्हणून शिका. मराठी भाषा झाडाचे खोड आणि त्यांच्या फांद्या म्हणजे इतर भाषा हा दृष्टिकोन ठेवा. मराठी भाषा अत्यंत प्रगल्भ, समृद्ध आहे. त्यामुळे तिची उच्चार पद्धतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे; मात्र आजकाल चुकीचे उच्चार केले जात आहेत. शासनानेही अनुच्चारित अनुस्वार लिहायची गरज नसल्याचा निर्वाळा दिला आहे; मात्र त्यामुळे शब्दांच्या उच्चारावर परिणाम होत आहे. शासनाने विचार करून असे निर्णय घेणे गरजेचे आहे. मराठी ही समृद्ध भाषा असल्यामुळे तिची शुद्धता अबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे. मराठी बोलीभाषेतील काही बदल ठीक आहेत; मात्र मराठीचा मूळ स्वभाव तसाच राहिला पाहिजे. अलीकडे मराठीवर हिंदी, इंग्रजी भाषांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे एका 10 शब्दांच्या वाक्‍यात एखाददुसरा शब्द मराठी व सरसकट हिंदी, इंग्रजी घुसडण्याचे प्रमाण अधिक आहे. हे चुकीचे आहे. मराठी भाषा खरेच इतकी दुबळी नाही; मात्र आपणच तिच्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. मराठी जपण्यासाठी, वाढविण्यासाठी मराठी माणसांनी क्रियाशील राहणे गरजेचे आहे. मराठी ही समृद्ध भाषा आहे. मराठी शब्दांना अनके पर्यायी शब्द आहेत. त्यांची माहिती घेऊन त्यांचा वापर वाढविला पाहिजे. मराठीचा खोलवर अभ्यास झाला पाहिजे. मराठी बोलण्याची सवय जिभेला लावली पाहिजे. वेगळे काम, वेगळा उपक्रम म्हणून मराठीचा अभ्यास झाला पाहिजे. वेगळे कार्य म्हणून ते हाती घेतले पाहिजे. आद्य कर्तव्य म्हणून मराठीच्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रथम घरात, कुटुंबात मराठी रुजले पाहिजे. मी अनेक मराठी माणसांना अस्खलित मराठी बोलताना पाहिले आहे. जर इतर भाषक माणसे मराठीत बोलतात, तर आपण मराठी माणसे मराठीत का बोलत नाही? याचा विचार केला पाहिजे. मराठी बोलण्याने कोणतेही नुकसान होत नाही. मग मराठी बोलणे आपण का टाळतोय? मराठीकडे का दुर्लक्ष करतोय? याउलट बोलीभाषेत, व्यवहारात मराठीचा वापर वाढविला पाहिजे. मराठी बोलण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. तसेच इतरांनीही मराठीतच बोलावे, असा अट्टहास ठेवला पाहिजे. इतरांना मराठीत बोलण्यास भाग पाडले पाहिजे. सरसकट मराठीचा वापर वाढविल्यास मराठी रुजेल.
(शब्दांकन ः माधवी यादव-पाटील)

आमची घोषवाक्‍यंही मराठीतच!

रवींद्र प्रभुदेसाई,
व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्‍टस्‌ प्रायव्हेट

मराठी टिकविण्याची चर्चा करताना त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. मराठी माणूस जागतिक पातळीवर पोचला, तर त्याची भाषाही मोठी होईल; पण तुम्ही कुठेही गेलात तरी स्वभाषेचा अभिमान बाळगणं, तिच्या वृद्धीसाठी प्रयत्न करणं ही त्यासाठीची पूर्वअट आहे.

मराठी भाषा वैश्‍विक आहे; ती आपल्याला विश्‍वकल्याणाची, आनंदी राहण्याची प्रेरणा देते. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकवते. मराठी संस्कृती मराठी माणसावर सात्त्विकतेचा संस्कार करते. त्यामुळेच अत्युच्च प्रेरणा देणारी ही मराठी भाषा व संस्कृती जगभर पोचवली पाहिजे. त्यासाठी मराठी माणसांनी आत्मविश्‍वासाने आपल्या गुणांच्या, कर्तृत्वाच्या जोरावर आर्थिक सत्ता आपल्या हाती घेतली पाहिजे. मराठी भाषेची, मराठी माणसांची वेगळी अशी ठळक वैशिष्ट्ये आहेत. मराठी माणूस सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहे. शिवजी महाराजांसारखा राजा, ज्ञानेश्‍वरांसारखे महाकवी याच संस्कृतीतील आहेत. मराठी भाषा, मराठी साहित्य खूप समृद्ध आहे. इटलीतील एका भाषाशास्त्रज्ञाने मराठी व इतर भाषांच्या अभ्यासातून मराठी भाषेची शास्त्रीय माहिती सांगितली आहे. त्यानुसार मराठी शब्द, मराठीतील वर्णमाला प्रत्यक्ष उच्चारांतून घडते. या उच्चारांमुळे मराठी भाषा बोलल्यामुळे आरोग्यही सुधारते. याला शास्त्रीय आधारही आहे. हेच मराठी भाषेचे वेगळेपण आहे. मराठी ही जगातील एकमेव अशी भाषा आहे. संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे. त्यामुळे या भाषेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तिचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. पंचमहाभुतांची शक्ती येण्याचे सामर्थ्य मराठी भाषेमध्ये आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अभ्यास करून तिच्या मुळापर्यंत गेले पाहिजे.यासाठी चांगले मराठी साहित्य, काव्य, संत वाङ्‌मय आठवड्यातून एकदा तरी वाचले पाहिजे. आपल्या पूर्वजांची चरित्रे वाचली पाहिजेत. चांगले संदर्भ ग्रंथ आपल्या घरामध्ये असले पाहिजेत. मराठी भाषेविषयी संशोधने झाली पाहिजेत. नवनवीन मराठी शब्द आणले पाहिजेत. यासाठी मराठी कवी संमेलने, कथा संमेलने भरविली पाहिजेत. मराठी संगीत, नाटकांमधून मराठी समृद्ध होते. त्यामुळे अशी नाटके आली पाहिजेत. विविध विषय हाताळणारे मराठी चित्रपट निर्माण झाले पाहिजेत. हे सर्व करीत असताना इतर भाषांचाही स्वीकार करणे गरजेचे आहे. संकुचित दृष्टिकोन न ठेवता इतर भाषांमधील तत्त्वज्ञान, उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी हिंदी, इंग्रजी यासारख्या भाषांमध्येही पारंगत असले पाहिजे. हिंदू संस्कृती, मराठी चिरकाल टिकविण्यासाठी इतरांचे अंधानुकरण टाळले पाहिजे. मराठी भाषा सर्वोच्च स्थानावर पोचवली पाहिजे. यासाठी मराठी माणसाने आपले कर्तृत्व सिद्ध करून स्वतः सर्वोच्च स्थानावर पोचले पाहिजे. मराठी माणून आपल्या गुणांच्या जोरावर यशस्वी झाल्यास इतर भाषक आपोआपच आपल्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आपल्या भाषेचा अभ्यास करतील. मी स्वतः माझ्या उद्योगाच्या माध्यमातून मराठी भाषा जगभर पोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माझ्या पितांबरी या उत्पादनाच्या स्लोगन्सदेखील मी मराठीतूनच बनविल्या आहेत. त्यासाठी मराठीमधूनच जाहिराती तयार केल्या आहेत. मराठी उत्पादन आंतरराष्ट्रीय दर्जावर पोचविण्यासाठी नवनवीन प्रयोग मी राबवीत आहे. माझा बहुतेक सर्व कर्मचारीवर्ग महाराष्ट्रीय आहे. आम्ही हिंदू, मराठी सणांच्याच सुट्या घेतो. दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त मराठीचा वापर करतो. बाहेरच्या राज्यांतील अपवाद वगळता आमचे कामाविषयीचे सर्व पत्रव्यवहार मराठीतूनच केले जातात. म्हणूनच मला असं वाटतं, की मराठी माणसाकडे नेतृत्वक्षमता आल्यास मराठीचा प्रसार वाढेल. त्यासाठी अहंकार, स्वार्थ यासारखे अवगुण बाजूला ठेवून तुकाराम, रामदास, ज्ञानेश्‍वर यासारख्या संतसाहित्यातून प्रेरणा घेत आपल्यातील चांगलं इतरांपर्यंत पोचवलं पाहिजे. आपल्या प्रत्येक कार्याच्या सिद्धीसाठी त्या त्या देवतांचं स्मरण करीत भक्ती व श्रद्धेने मराठी बाणा सर्वदूर नेला पाहिजे. -
शब्दांकन माधवी यादव-पाटील

मराठी भाषेला मरण नाही...

अजित कडकडे
"अलीकडे पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करणे ही एक प्रथा झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे राहण्याच्या नादात त्यांचीच भाषा बोलणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जाते. प्रत्येक जण या प्रथेत वाहवत चालल्याने भाषेची भेसळ होत आहे. भाषेची ही भेसळ प्रथम थांबविली पाहिजे. मराठी माणसांनी आपल्या प्रांतावर, मराठी माणसांवर व मराठी भाषेवर प्रेम केले पाहिजे. आपली आपल्या मातीवरची, आपल्या लोकांवरची, भाषेवरची निष्ठा डळमळल्यास प्रगती होणे अशक्‍य आहे.''
----------------
मुंबई ही मराठी माणसांचीच आहे, याबद्दल कुणाचेही दुमत नसावे. बाहेरून येणारे लोक नंतर येथे आले आहेत, हे त्यांनी विसरू नये. त्यामुळे मुंबईवर प्रथम मराठी माणसांचा हक्क आहे. आता इथल्या मराठमोळ्या भाषेचा विचार केल्यास ती मूळातच समृद्ध भाषा आहे. अगदी परदेशातही तिने आपला झेंडा फडकवला आहे. थोडक्‍यात, तुम्ही जगात कुठेही गेलात तरी मराठी भाषेला मरण नाही. त्यामुळे तिला कुणाकडूनही अपाय होऊच शकणार नाही. मात्र हे जरी सत्य असले तरी मराठी भाषिकांनी तिचा अभिमान बाळगलाच पाहिजे. त्यांनी मनापासून मराठी भाषेवर निष्ठा ठेवली पाहिजे. माझी जन्मभूमी गोवा आहे. मात्र मी गायनासाठी मुंबईत आलो आणि इथलाच एक भाग बनून गेलो. मी माझे गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून मराठीतूनच गायनाचे धडे गिरवले. मराठी गीते, मराठी संगीत शिकताना मला तिची गोडी लक्षात आली. त्यामुळे माझे मराठी भाषेवर अत्यंत प्रेम आहे. या भाषेविषयी मला प्रचंड अभिमान आहे. मुंबई ही महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या माणसांना प्रत्येक गोष्टीत पहिले स्थान दिले गेले पाहिजे. मराठी माणसांना डावलून इतर लोकांना नोकऱ्या देणे अयोग्य आहे. मराठी माणसांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मराठी माणूस मागे पडत आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राबाहेरील प्रांतांत ज्याप्रमाणे स्थानिकांना प्राधान्य दिले जाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रानेही ही भूमिका घेतली पाहिजे. अलीकडे पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करणे ही एक प्रथा झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे राहण्याच्या नादात त्यांचीच भाषा बोलणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जाते. प्रत्येक जण या प्रथेत वाहवत चालल्याने भाषेची भेसळ होत आहे. भाषेची ही भेसळ प्रथम थांबविली पाहिजे. मराठी माणसांनी आपल्या प्रांतावर, मराठी माणसांवर व मराठी भाषेवर प्रेम केले पाहिजे. आपली आपल्या मातीवरची आपल्या लोकांवरची, भाषेवरची निष्ठा डळमळल्यास प्रगती होणे अशक्‍य आहे. त्यामुळे आपल्या भाषेवर निष्ठा ठेवली पाहिजे. मराठी संगीत, संगीत नाटके, गायन आदी कलांच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी संगीत नाटकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. सध्या आपल्या रोजच्या बोलण्यात सर्रास इंग्रजी, हिंदी शब्द मोठ्या प्रमाणात येतात. हे टाळण्यासाठी बोलीभाषेत जाणीवपूर्वक मराठी शब्दांचा वापर केला पाहिजे. भाषी कधीच कमी पडत नाही तर आपणच नकळच तिच्याकडे दुर्लक्ष करून तिचा अवमान करीत असतो. याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अर्थात जिथे गरज आहे तिथे इतर भाषांचा वापरही तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र हे करताना विनाकारण मोठेपणासाठी इतर भाषांच टेंभा मिरविणे अयोग्य आहे, हेही विसरून चालणार नाही.
शब्दांकन ः (माधवी यादव-पाटील).

वेळ पडल्यास मराठीची सक्ती करा...

अभिनेते संजय मोने
मराठीला कुणी गृहितच धरत नाही, त्यामुळे मराठी भाषेवरून जे राजकारण चालू आहे त्यात काही वाईट आहे असं मला तरी वाटत नाही. हां आता ते योग्य की अयोग्य ही नंतरची गोष्ट आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि कोणी तरी तिच्यासाठी लढतंय हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. राज ठाकरे मराठी भाषेचं राजकारण करतायत असं बोललं जातं; मात्र त्यात शंभर टक्के राजकारण असेल का? राज ठाकरेंना मिळणारा पाठिंबा पाहता ते मराठीचं राजकारण करीत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यामुळे उगाचंच काही तरी आरोप करून त्याला मोडता घालण्यात काहीच अर्थ नाही. आता त्यांचा मार्ग कसा आहे हे काळ ठरवेल. मुळात राजकारणी लोक निष्क्रिय असतात हा सर्वसामान्य समज आधी बदलला पाहिजे. मला तरी असं वाटतं, की प्रत्येक राजकीय व्यक्तीला काही तरी तळमळ असते, त्यामुळेच तो एखाद्या मुद्द्यासाठी लढा उभारतो; त्यामुळे जे लोक काही करीत नाहीत ते लोकच एखाद्या मुद्द्यावरून राजकारण केलं जातंय असा बोभाटा करतात.मराठीचा वापर वाढलाच पाहिजे. त्यासाठी सक्ती करावी लागली तरी चालेल. सामाजिक स्वच्छतेइतकीच सांस्कृतिक स्वच्छता गरजेची आहे. अर्धवट इंग्रजी, अर्धवट हिंदीत कुणी नम्रतेत बोलत असेल तर त्यापेक्षा मराठीत बोलणारा शुद्ध माणूस मला जास्त आवडेल. भाषावार प्रांतरचना जर आपण केली आहे, तर त्या त्या प्रांतात तीच भाषा बोलली गेली पाहिजे. मला सांगा, नागालॅंडमध्ये तेलगू बोलली तर चालेल का? एखाद्या प्रांतात बाहेरून आलेले लोक जास्त आहेत म्हणून ती भाषा बोलण्यात काय अर्थ आहे? या सगळ्याच्या मुळाशी गेल्यास सध्या मराठी आणि हिंदी हा एवढाच वाद शेवटी उरणार आहे; तर मग राजकारणानेच हा प्रश्‍न सुटू शकेल, सामोपचाराने किंवा समाजकारणाने नाही.मी स्वतः जास्तीत जास्त मराठीत बोलतो. शिवाय बाहेरच्या प्रांतात गेल्यावर मी त्या त्या प्रांतातील भाषा बोलतो. त्यामुळे इतर प्रांतातील लोकांनी महाराष्ट्रात येऊन त्यांची भाषा रेटण्याचा प्रश्‍नच येत नाही. जे काम कुणीही करू शकतं त्या कामासाठी इतर प्रांतातील लोक आणल्यास वाद होणारच. मजूरसुद्धा तुम्ही जर बाहेरून आणले तर दुसरे काय होणार? शिवाय महाराष्ट्रीय नोकरीसाठी खळखळ करतात ही ओरड वेगळीच. आपण जर बाहेरच्या माणसाशी बोललो तर तो आवर्जून सांगतो की महाराष्ट्रात आम्हाला जास्त सुरक्षित वाटतं. इथली माणसं त्यांच्याशी समजूतदारपणे बोलतात. इथले लोक टॅक्‍सीवाल्यांशी हिंदीत बोलतात, कारण ते समजूतदार आहेत. त्यामुळे आम्हाला कुणी समजूतदारपणा शिकवण्याचा प्रयत्न करू नये. जर सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी केवळ मराठीतच बोलायचं ठरवलं तर मात्र इतरांना अवघड जाईल हे त्यांनी विसरू नये.मी इतक्‍या देशांमधून नाटकांसाठी, कार्यक्रमांसाठी फिरलो, पण इंग्रजीवाचून माझं कधीच अडलं नाही. जपानमध्ये मात्र इंग्रजी येऊनही माझं अडलं, कारण जपानमधील लोक जपानी भाषेतच बोलतात. माझी मुलगीही इंग्रजी शाळेत जाते; मात्र माध्यम म्हणून ती इंग्रजी भाषा शिकते, पण ती बोलते मराठीतूनच. मध्यंतरी मी तिच्या शाळेत गेलो असताना तिच्या शिक्षकांनी मला ती इंग्रजीत बोलत नाही, मराठीतच बोलते असे सांगितले. त्यावर मी त्यांना ती अभ्यासात हुशार आहे ना मग झालं, असं सांगितलं. शिवाय मराठी आहे त्यामुळे ती मराठीतच बोलेलं हे सांगायलाही विसरलो नाही. अर्थात, मी महाराष्ट्रात राहतो, मी मराठी आहे, तर मी मराठीतच बोलेन या जिद्दीने प्रत्येकाने जास्तीत जास्त मराठी बोलले पाहिजे. मराठीचा प्रसार केला पाहिजे.शेवटचा आणखी एक मुद्दा मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो, की केवळ भारत देशच नाही, तर संपूर्ण जग ज्यांना वंदनीय मानत त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचे गुरू गोपाळकृष्ण गोखले हेदेखील मराठीच होत हे सर्वांनी धान्यात ठेवावे. तसेच इतिहासाच्या तीनशे वर्षांच्या राजकारणात दिल्लीनं कधी महाराष्ट्राचं राज्य चालवलं नाही, तर महाराष्ट्रच बहुंताशवेळा दिल्लीचं राज्य चालवतं, हेही विसरून चालणार नाही. यावरूनच महाराष्ट्र व इथली भाषा प्रत्येकाने शिकली पाहिजे आणि ती बोललीही पाहिजे.-
(शब्दांकन ः माधवी यादव-पाटील)

आगरी माणसासारखीच त्याची भाषा


समीर पारखी
"गल्यान्‌ साखली सोन्याची ही पोरी कोनाची' या लोकप्रिय गाण्याशिवाय आजही महविद्यालयातील विद्यार्थ्यांची पिकनिक पूर्ण होत नाही. या गाण्याचे बोल जसे उच्चारासाठी सहज आणि सोपे वाटतात. हे गाणं आहे आगरी बोलीतलं. ही बोलीभाषा असली, तरी ती भारदस्त आणि कणखरही आहे. या भाषेवर कोळी आणि कोकणी भाषेचा काहीसा प्रभाव जाणवतो. 90च्या दशकापासून या समजातील बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आता या समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित आणि उच्चपदावर आढळतात. सध्या खेडेगावात आगरी भाषा बोलली जाते. पण शहरातील सुशिक्षित मंडळी आगरी भाषा अभावानेच बोलतात. ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातील मूळ समाज आगरी आहे.
आगरी शब्दातील मूळ शब्द आगर. आगर म्हणजे भात, भाजीपाला, फुले, मीठ तयार करण्याची जागा. या शब्दावरून आगर पिकविणारा तो आगरी. भातशेती हे या समाजाचे मुख्य उद्दीष्ट. समुद्र, खाडी किनारी हा समाज मोठ्या संख्येने आहे. आगरी लोकांना कुणबी, खारकी अशीही विशेषणे आहेत. आगरी समाजातील शेतकऱ्याला कुणबी या अर्थाने ओळखले जात असे. जुन्या पुस्तकांमध्ये आगरी समाजाचा उल्लेख कुणबी म्हणून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावरील मावळे हे आगरी, कोळी समाजातील होते. पुस्तकांमध्ये आरमारकरी, तराकेवाले असा आगरी समाजाविषयी उल्लेख आहे. अलिबाग, पालघर, डहाणू परिसरातील आगरी समाजाला खारपाटी म्हणूनही संबोधण्यात येते. समुद्र किनाऱ्यापासून दूर राहणाऱ्या समाजाला उथळी म्हटले जाते. आगरी समाजाच्या शुद्ध आगरी, दास आगरी व वरप आगरी अशा पोटजाती आहेत. केवळ मिठाची शेती करून उपजीविका करणारे ते मीठआगरी. पिढ्यान्‌ पिढ्या ढोल वाजविणारे ते ढोल आगरी. बागबगिचे, उद्यानांमध्ये काम करणारे ते जस आगरी म्हणून ओळखले जातात. दास आगरी समाज पालघर तालुक्‍यात आढळतो. उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता प्राप्त केलेला आगरी समाज समाजाविषयी अभिमान बाळगून आहे. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरानुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती ही भाषा बोलतात.
नव्या पिढीला आगरी भाषेविषयी औत्सुक्‍य वाटते. तसेच काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बुशकोट, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफ पॅन्ट, बुशकोट, टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. लग्न समारंभातील हळदीची आणि परंपरागत आगरी भाषेतील गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. कारण आगरी भाषेत लग्न समारंभाविषयीची माहिती या विशिष्ट गाण्यामधून कळायची. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकाला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने शद्ब उच्चार आणि बोलण्याची ढब बदलली आहे. पूर्वी कुटुंबातील महिलेला किंवा बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "दादुस' म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. "इच्या बना' ही शिवी-वजा विशेषणाचा सऱ्हार्स वापर केला जायचा. मात्र आता त्याच्यावर काहीसे र्निबंध आल्याचे जाणवते. किंवा हे वाक्‍य विस्मरणात गेले. आगरी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोली भाषेतून जाणवतो. तर आगरी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोली भाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोली भाषा काळानुरूप बदलत आहेत. नवा बदल या मंडळींच्या अंगवळणी पडत आहे. समाजातील काही तरुण मंडळींनी agrisamaj.com ही वेब साईट सुरू केली आहे. यामध्ये आगरी समाजाविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आगरी समाज ग्लोबल झाला आहे.