Thursday, April 29, 2010

उत्फूर्त प्रतिसाद (लेख- 5.)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे



अभिमानगीत जडणघडण होताना, ते संगीतबद्ध करण्याच्या सुरेल प्रवासात कोणकोणते अनुभव आले?

- जनमानसानं "मराठी अभिमानगीता"ची कल्पना अतिशय उत्स्फूर्तपणं उचलून धरली. तिला दाद दिली. एक आठवण सांगतो... एका कार्यक्रमात एक आजीबाई आल्या माझ्याकडं आणि त्यांनी माझ्या हातावर पाचशे रुपये ठवले. अगदी प्रेमानं म्हणाल्या, "मी फार काही देऊ शकत नाही. पण हा माझा खारीचा वाटा." मी सांगितलं, "आज्जी, हा सेतू खारीच बांधायत सगळा आणि हा खारींनीच बांधलेला सेतू आहे. कारण माकडं खरोखर काही करत नाहीयेत आपल्याकडं." त्यावर त्या मिश्‍किलपणं हसल्या. त्यांनाही त्यातला विनोद कळला... मध्यंतरी माझे लाडके ज्येष्ठ संगीतकार खळेसाहेबांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता गेलो होतो. गप्पा मारताना ते म्हणाले, "माझी तब्येत तेवढी बरी नाही". मी म्हणालो, "कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आलो होतो. पण तुमची तब्येत..." ते म्हणाले, "अरे, सोड ते. यासाठी मी येणार. मी परका नाही." म्हणालो "मी ने-आणायची व्यवस्था करतो." ते म्हणाले "तसं नको, मी येईन", असं म्हणत त्यांनी पाचशे रुपये काढून दिले. मी म्हणलो, "आम्ही थांबवलंय आता पैसे घेणं." ते म्हणले,"माझे घ्यायचेच." एका कार्यक्रमात एक "स्पेशल" मुलगा कार्यक्रमाला आला होता. त्याला हे कळतं होतं की हे खूप काहीतरी भारावून जाण्यासारखं आहे. कारण मी आवाहन केलं नि गाणं गायलो. त्याला लोकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. त्यानं उत्साहात देणगीदारांचा पत्ता लिहायचा होता, ते कार्डं घेऊन अर्धवट भरलं. मग तो बहुधा पैसे मागायला त्याच्या आईवडिलांकडं गेला असावा. त्यांना कदाचित ते पटलं नसावं किंवा हे काय यानं काहीतरी भरून आणलं असं काही वाटलं असावं. त्यांनीं त्याला सांगितलं असावं की हे कार्डं तू परत कर... ते घेऊन तो आमच्याकडं आला नि ते परत केलं. आम्ही मात्र ते कार्डं ठेऊन दिलंय. कारण त्याची इच्छा हेच त्याचे पैसे आहेत. आता आम्ही त्याला सीडी पाठवून देणार आहोत. सीडीसाठी देणगी देणाऱ्या साडे
चौदाशे मान्यवरांत त्याचं नाव आहे... म्हणूनच आम्ही असं ठरवलं कुणी पाचशे दिले, कुणी हजार कुणी आणखीन... पण कुणी किती पैसे दिलेत ते लिहायचं नाही. कारण पाचशे रुपयांची किंमत कुणाच्या लेखी किती असेल ते आपण नाही ठरवू शकत. त्यामुळं आपणही काहीतरी या गाण्यासाठी करावं असं वाटणारे आणि ते करणारे कितीतरी लोक पुढं आले नि त्यांनी मदतीचा हात दिला.
सांगायला अतिशय आनंद होतो की, आपल्याकडचे मराठी गायक -"मराठी" म्हणजे जे मराठी गातात ते सगळे - त्या साऱ्यांना आपल्या भाषेची जाण आहे. कणव आहे. तिच्याविषयी खूप काही वाटतं त्यांना म्हणून सांगू? त्यामुळं मला एकही असा अनुभव आला नाही की, हे काय आहे? का करायचं? असा एकही अनुभव आला नाही. "मला काही बुवा हे मान्य नाही," असं म्हणणारं कुणीही भेटलं नाही. हा अगदी शंभर टक्के प्रतिसाद होता. काही अनुभव भारावून टाकणारे होते. उदाहरणार्थ- आरती अंकलीकर, सावनी शेंडे, बेला शेंडे, शौनक अभिषेकी ही मंडळी पुण्याहून आली होती- फक्त एक ओळ गाण्याकरता ! नुकत्याच आरतीताई होत्या. म्हणाल्या, "माझं शेपूट तू ठेवलंयस की नाही?... तू शेपटांचाच वाघ केलास." ही खूप छान मार्मिक कॉमेंट होती ती की, "शेपट्यांचा वाघ केलास..." इतर गायकांचेही खूप चांगले अनुभव आहे. स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्तेंनी पैसे गोळा करण्यापासून सगळं केलं. स्वप्नील पत्रकार परिषदेला आला होता आम्हांला पाठिंबा द्यायला की आम्ही तुझ्यामागं उभं आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे की, जो आज मराठीतला स्टार सिंगर आहे, तो आज अशा उपक्रमाला जाहीर पाठिंबा देतोय....
एक चांगल्या प्रस्थापित गायिका रेकॉडिंला आल्या होत्या. त्यांनी मला असं विचारलं की,"चांगलं आहेस. हे गाणं तू करतोयस. पण तुला असं वाटतं का खरंच की यानं काहीतरी होईल? मी गाईनही." त्याप्रमाणं त्या आल्या नि गायल्याही. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की शेवटचं तुम्ही कधी एक ओळ गाण्याकरता बाहेर गेला होतात?" कारण त्या प्रस्थापित मोठ्या गायिका आहेत. तर त्यांनी विचार केला आणि त्या हसल्या. मी त्यांना म्हटलं, " हे बघा, ही शक्ती आहे या गाण्याची! तुमच्यासारख्या मोठ्या गायिकासुद्धा एक ओळ गाण्याकरता येतात. का येतात? फक्त मी तुम्हांला बोलवलं म्हणून का? तर नाही. तुमचं मराठीवर प्रेम आहे. मराठीनं तुम्हाला ए ओळ गायला बोलवलंय. तुम्ही हा विचारच केला नाहीत की, मी प्रस्थापित गायिका आहे वगैरे. तुम्ही आलात. सगळ्यांमध्ये मिसळलात नि हीच या गाण्याची मोठी शक्ती आहे." गाण्याचं रेकॉर्डिंग आजीवसन स्टुडिओत झालं. तिथल्या मंदार आणि अवधूत वाडकर यांची नावं घेतलीच पाहिजेत. सुरेश वाडकर यांच्या या साऊंड इंजिनिअर पुतण्यांनी मला लाखमोलाची मदत केली. त्यांनी स्टुडिओचं वातावरण घरासारखं ठेवलं. त्यांनी हे काम जितकं माझं आहे, तितकंच आपलं म्हणून केलं. अवधूतनं तर पाचशे रुपयांच्या देणगीचं कार्ड रेकॉर्डिंग मशीनवरच सगळ्यांना दिसेल असं ठेवलं होतं की जे पाहून लोकांनीही पैसे द्यावेत. एकूण 112 गायकांपैकी अवधूत-मंदारनं मिळून जवळपास 100 आवाज रेकॉर्ड केले. तेसुद्धा एक कठीण काम होतं. एवढ्या गायकांचे वेगवेगळे आवाज एकाच गाण्यासाठी रेकॉर्ड करणं नि तेही वेगवेगळे रेकॉर्ड करणं ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाची वेळ वेगवेगळी होती, प्रत्येकाच्या आवाजाचा पोत वेगळा असतो, त्याप्रमाणं माइकिंग करावं लागतं, लेव्हल ठेवावी लागते. तांत्रिकदृष्ट्याही ते अत्यंत आव्हानात्मक काम होतं. ते एकदाही कोणतीही सबब न सांगता प्रायोरिटी देऊन ते पूर्ण केलं.
चेन्नईत रहमानचा स्टुडिओ बुक करण्यासाठी मला मुरुगन मोहन नावाचा तिकडचा एक कम्पोजर आहे, त्यानं मला तिकडं सगळं अरेंज करून दिलं. स्टुडिओ बुक करण्यापासून ते इल्लया राजाचे सगळे वादक बुक करण्यापर्यंत सगळंच. तोवर त्याला हे माहित नव्हतं की मी हे कशासाठी काय करतोय वगैरे. चेन्नईला गेल्यावर स्टुडिओत गाणं सुरू व्हायच्या आधी प्रभाकर या व्हायलोनिस्टनी माझी त्यांच्या टीमशी ओळख करून दिली. तेव्हा मुरुगनही सोबत आला. एकानं विचारलं हे फिल्मसाठी आहे गाणं? मी म्हटलं नाही. या गाण्याचं कारण असं असं आहे. तेवढ्यात मुरुगन आणि वादकानं उत्स्फूर्तपणं पाचशे रुपये काढून दिले. म्हणले, "हे आमच्या राज्यात कधीच झालं नसतं." अशी वागणूक त्यांच्या भाषेला मिळणंच शक्‍य नाही. ही एक मनोमनी साठवलेली आठवण तर आहेच, शिवाय हा एक प्रकारचा मानसिक बळ देणारा अनुभव आहे. मराठीसाठी, तिच्यासाठी चालेल्या या उपक्रमाला त्यांनी दिलेली ही दाद होती. भाषिक अस्मितेविषयी दक्षिणेच्या लोकांना खूप भान आहे. कमला हसनने एका मुलाखतीत मराठीत काम करायचंय असं म्हटलं होतं. तो म्हणाला होता,"मराठीत खूप टायलेंटेण्ड लोक आहेत. त्यांना स्वत:च्या भाषेविषयी तमिळ लोकांनाहून अर्धी जरी अस्मिता जागृत असती तर त्यांनी अख्खी इंडस्ट्री उभी केली असती..."
शंकर महादेवन या गाण्यात गायला तो तर फार मस्त किस्सा झाला. आमची खूप जुनी मैत्री आहे. तो कंम्पोजर होण्याधीपासून माझ्याकडं गातोय. म्हणून त्याला फोन केला की मी असं गाणं करोत, त्यात एक ओळ तुला गायचेय. तो काहीही आढेवेढे न घेता लगेच हो म्हणला. त्याच्या सोईनुसार मी यशराज स्टुडिओत रात्री आठ वाजता गेलो. मी तिथला बी स्टुडिओ बुक केला. तिथले साऊंड इंजिनिअर विजय दयाळ यांनी इन्स्ट्रुमेंटल व्हर्जनमध्ये गिटारची ओळ वाजवलेय. मी गेलो तर संकर निघालो होता, त्याच्या लक्षात राहिलं नव्हतं. आमचा फोन होईपर्यंत तो जुहूला पोहचला होता. राहतो वाशीला. स्टुडिओ अंधोरीत. क्षणभर वाटलं आज काही रेकॉर्डिंग होत नाही. पण तो म्हणला नाही, परत येतोय... आल्यावर विचारलं काय गायचंय? तू काय करतोयस? त्याला सगळी कहाणी सांगितली. तो म्हणला ऐकव... मी ऐकवलं नि त्याच्या डोळ्यातनं पाणीच आलं. तो मागं वळला म्हणला,"कौशल यू हॅव अचिव्ह इम्पॉसिबल!" मग गायला. इतकं अप्रतिम गायला तो... "येथल्या वनावनात गुंजते मराठी" ही ओळ गायला. बाहेर येऊन म्हणाला की, "हरिहरनला तू विचारलंस का?" म्हटलं आमची ओळख नाहीए."तो म्हणाला, मी बोलतो. त्यानं दुसऱ्या दिवशी लक्षात ठेऊन हरिहरनला फोन करून सगळं सांगितलं नि मला तसा एसएमएस केला. स्टुडिओतून जाताना तो म्हणला,"या गाण्यासाठी तू माझा विचार केलास,त्यासाठी आभार." एवढ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायक-संगीतकाराला हे वाटलं नि या गाण्यानं त्याला हेलावून टाकलं. हे मी इतर मित्रांबरोबर शेअर केलं पाहिजे, म्हणून हरिहरनचं नाव सुचवलं. त्याच्या घरी स्टुडिओतला सगळा जामानिमा घेऊन गेलो. त्याच्या जिममध्ये ते सेट केलं. त्याला सगळं सांगितल्यावर तो म्हणाला, "मी गाईनच. रेडिओ कंपनीचं तू सांगितलंस, पण फक्त मराठी नाही तर हिंदुस्थानी संगीताबद्दल त्यांना अनादर आहे. मी याबाबतीत अत्यंत रॅडिकल आहे." मग ते नुसतं गायल
ेत नाहीत तर स्वत:हून आलाप घेत ऍडिशन्सनही केल्या. "येथल्या चराचरात राहते मराठी" अशी ओळ होती. या ओळीनंतर मध्ये एक गॅप होती नि मग मुग्धाची ओळ सुरू होत होती. तिकडं त्यांनी फक्त "मराठी" अशी वरनं तान घेतली. की त्यातून "येथल्या चराचरात राहते मराठी" हा फिलच मिळतो. असे सगळ्या गायकांचे संस्कार या गाण्यावर होत गले.
रेकॉर्डिंगला सगळ्यात कमी वेळ लागला असेल तर तो मुलांना! अतिशय मनापासून ते गायलेत. गाण्यावर- भाषेवर त्यांचं प्रेम अत्यंत निखळ असतं. त्यामुळं मुग्धा, कार्तिकी, आर्या, प्रथमेश नि रोहित जे गायलेत ते इतकं सुरेल नि मनापासून गायलेत की अनेकांनी सांगितलं हे ऐकून अंगावर काटा येतो किंवा रडू येतं... कारण ते मनापासून बोललं गेलंय. ते रेकॉडिंग ठाण्यात रोहित प्रधानच्या स्टुडिओत केलं होतं. तोही एक मस्त अनुभव होता. सुरेश वाडकरांकडूनही खूप ऍक्‍टिव्ह पाठिंबा मिळाला. त्यांना थ्रोट इन्फेक्‍शन झाल्यानं तब्येत बर नव्हती. आम्ही त्यांना चला सांगायला गेलो की आवाज खराब आहे म्हणायचे. मग अमेरिकेला जायचं ठरलं. त्यांच्या सगळ्या व्यापातून त्यांना ही एक ओळ गायचं काय लक्षात राहिल? पण ते जायच्या दिवशी संध्याकाळी स्टुडिओत आवर्जून आले नि गाऊन गेले. इतकं सुंदर गायले... की क्‍या बात हैं ! असा सगळ्याच गायकांनी आपापल्या ओळींवर आपापला ठसा उमटवलाय. ज्यांची मातृभाषा मराठी नाही, ते गायकही अतिशय प्रेमानं गायले. हम्सिका अय्यरचंही मला कौतुक वाटतं. ती माझ्याबरोबर चेन्नईला आली होती. आज ती एवढी मोठी गायिका आहे... पण हे मी करतो म्हणून भाषेचा मला त्रास होऊ नये, याची काळजी घेतली. रिक्षापासून म्युढिशिअन्सना समजावण्यापर्यंत सगळीकडं ती तमिळमध्ये बोलायची. तिच्या आईवडिलांनीही खूप मदत केली. हे काही मी तिच्या मातृभाषेसाठी करतोय, असं नाही. पण हे मातृभाषेकरता करतोय, हाच इन्टिमेट महत्त्वाचा आहे... असे खूप चांगले अनुभव आले, किती किती म्हणून सांगू? आठवणींचं आभाळ अगदी भरून आलंय...

No comments:

Post a Comment