Thursday, April 29, 2010

साकारतंय एक अभिनवगीत... मराठी अभिमानगीत... (भाग 3)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद. मुलाखत- राधिका कुंटे

अभिमानगीत तयार करण्याचं ठरल्यावर कविवर्य सुरेश भटांचीच कविता निवडण्यामागचं नेमकं कारण काय?

- "मराठी अभिमान गीता"साठी मी काही कविता चाचपून बघितल्या होत्या."महाराष्ट्र गीत" त्यापैकी एक. असं लक्षात की "महाराष्ट्र गीता"चा आणि मराठी माणसाचा रोजचा संबंधच उरलेला नाहीये. कर्नाटकचं उदाहरण घ्या. कर्नाटकाची निर्मिती, कानडी भाषेच्या प्रवासाबद्दल खूप लेख, लघुपट, माहितीपट, चित्रपटही आहेत. पण आपल्याकडं "संयुक्त महाराष्ट्र चळवळी"च्या पार्श्‍वभूमीवर असणारी एखादी प्रेमकथाही आढळत नाही. मग तुम्हांला त्या इतिहासाची माहिती मिळणार कशी? तसंच "महाराष्ट्र गीता"बद्दल झालंय, असं मी एका कार्यक्रमात म्हटल्यावर एक बाई म्हणाल्या," ते आहे- गर्जा महाराष्ट्र माझा..." मी म्हटलं, "नाही. बहु असोत सुंदर संपन्न की महा..." बरं ते लिहिलंय श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी हेही माहित नसतं. इतकीही माहिती नाही, असं म्हटल्यावर मग त्याचा संगीतकार नि गायक कोण याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही...
प्रत्येक समाजामध्ये आणि काळामध्ये प्रतीकं ही फार महत्त्वाची कामं करतात. "महाराष्ट्र गीत" आलं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राप्रेमी आहात, असा त्याचा अर्थ होत नाही. पण महाराष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचं, मराठीचा अभिमान व्यक्त करायला हवा. "अभिमान" हा फक्त मिलिटन्टच नसतो. तर तो अत्यंत प्रेमळ असतो. हा अभिमान व्यक्त करण्यासाठी साधनं पाहिजेत. अशा वेळी काही प्रतीकं काम करतात. त्यात संगीत येतं. तसंच "महाराष्ट्र गीता"चं आहे. माझ्या लक्षात आलं की हे गीत कुणालाच फारसं माहित नाही. ते माहित करून घ्यावं, असंही दिसत नाही. या गाण्यात असं काय आहे की ते आपण म्हणतच नाही... खरं तर काही नाही. फार सुंदर कविता आहे ती. पण त्यातली मराठी भाषा आता वापरात नाहीये. "अटकेवरी जेथील तुरंगि जल पिणें" अटक हिंदुस्थानात राहिलं नाही. "तुरंगी" म्हणजे "घोडे" हे माहिती नसतं. पाण्याला आपण जल म्हणत नाही. त्यामुळं ही वापरात नसलेली भाषा आहे. ती पुन्हा आपण सामावून घेऊ शकतो. भाषेच्या संदर्भातच काही वेळा वेगवेगळी विधानं केली जातात. काहीजण म्हणतात मराठी शब्द कठीण असतात. मग आपण इंग्रजी शब्द कसे व्यवस्थित उच्चारतो? उदाहरणार्थ- आपण "डिस्ट्रिब्युशन" म्हणू शकतो. यात आहेत की दोन जोडाक्षरं. मग "वितरण" आपल्याला का बरं अवघड वाटावं? आता बोली भाषेतले शब्दही वापरात आले पाहिजेत. एका व्याख्यानात श्‍याम मनोहरांनी सांगितलं होतं, "हल्ली माझ्यापुढचा एक प्रश्‍न आहे, तो म्हणजे मराठी भाषेमध्ये गंमत येत नाही." त्यावर ते सध्या काम करतायत. हा प्रश्‍न त्यांनी लावून धरलाय. हे वाक्‍य माझ्या डोक्‍यात फिट्ट बसलं होतं. जेव्हा सुरेश भटांचं काव्य मी परत वाचलं, यानिमित्तानं... तेव्हा माझ्या डोक्‍यात चाल निर्माण झाली ती दोन ओळीची... "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी". ही चाल डोक्‍यात बरेच दिवस होती. काव्यनिवडीबाबतचा प्र
श्‍न निर्माण झाला नि हे काव्य पुढ्यात आलं तेव्हा वाटलं की हे करेक्‍ट आहे. एकदम बरोब्बर ! याचाच तर आपण शोध घेत होतो. हेच गाणं का नको घेऊ या? कारण अतिशय ओघवती नि सोपी मराठी भाषा आहे ही... "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. येथल्या नभामधून वर्षते मराठी. येथल्या पिकांमधून डोलते मराठी. येथल्या नद्यांमधून वाहते मराठी. येथल्या चराचरात राहते मराठी." तशा बऱ्याच कविता होत्या डोळ्यांसमोर. उदाहरणार्थ- "मराठी असे आमुची मायबोली.", "माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा" ही कुसुमाग्रजांची. तिचा समावेश या सीडीत करण्यात आलाय. शिवाय "कणखर देशा पवित्र देशा" ही वसंत बापट यांची कविता आणि इतरही अनेक कविता वाचल्या. पण यात भाषेबद्दल सांगणारी कविता नव्हती. तर महाराष्ट्राबद्दल सांगणारी होती. म्हणून मग कविवर्य सुरेश भटांचीच "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी," ही कविता निवडली...



कवितेची निवड झाली. चाल डोक्‍यात आली हे खरं पण फक्त तेवढ्यानं भागत नसतं. मग प्रश्‍न येतो तो पैशांचा. हा प्रश्‍न कसा काय सोडवलात?

- सगळा खर्च मलाच करायला खूप आवडलं असतं. माझ्यासाठी ती आनंदाची नि अभिमानाची गोष्ट होती. पण त्याचा एवढा सगळा व्याप पाहता मी एकट्यानं खर्च करणं अशक्‍य होतं. बरं विषय असा होता की कुठलाही प्रायोजक लगेच तयार झाला असता त्यासाठी. कारण राजकीय दृष्टायसुद्धा मराठीचा विषय ऐरणीवर होता. पण प्रायोजक घेतला तर हे गाणं कमर्शिअल प्रॉडक्‍ट झालं असतं. मनात हेतू होता माणसं जोडायचा नि तेही भाषेच्या निमित्तानं. त्यासाठीचं माध्यम होतं संगीत. समजा दोन हजार लोकांनी पाचशे रुपये दिले - तेही देणगी म्हणून नाही तर सहभाग म्हणून तर? मायकल जॅक्‍सनची सीडी 500 रुपयांना घेतो, तसं भारतात निर्माण झालेलं सगळ्यात भव्य गाणं घ्यावं विकत. माझ्याकडून कमिटमेंट अशी की ती सीडी मी घरपोच पोचती करार. ही कल्पना माझ्या डोक्‍यात आली, तेव्हा माझी एक मैत्रिण समोरच बसली होती. तिच्याशी बोलल्यावर तिनं पटकन हजार रुपये काढून दिले... माझ्या लक्षात आलं की या गोष्टीत ताकद आहे. लोकांनाही वाटतंय की असं काही व्हावसं वाटतंय... मग हे माझ्या कार्यक्रमांतून सांगायला लागलो. मित्रांना फोन केले. म्हणालो, "हे देणगीसाठी आवाहन नव्हे तर या चळवळीत सहभागी होण्याचं आमंत्रण आहे." मला उत्तम प्रतिसाद मिळाला. तरीही ठरवल्याप्रमाणं दोन हजार लोकांकडून पैसे जमवू शकलो नाही. जवळपास साडेतेराशे लोकांकड पैसे गोळा करू शकलो. अजूनही दीड-दोन लाख रुपये कमी आहेत. अर्थात आठ लाख रुपये जिथं जमले तिथं दोन लाख रुपये मला खर्च करायला काहीच वाटत नाही. या संदर्भातली एक आठवण आहे. "मौज" प्रकाशनाच्या कार्यक्रमात सुभाष देसाईं हे ऐकून म्हणाले,"आपण काहीतरी करू या." त्यांनी ते उद्धव ठाकरे यांना सांगितल्यावर लगेच तिसऱ्या दिवशी त्यांनी मला शिवसेना भवनात बोलावून घेतलं. ते म्हणाले, "तुमचा हा प्रकल्प छान आहे. तुमची आमच्याकडून काय अपेक्षा आहे?" मी म्हटलं, "सर, पाचशे रुपये द्या." त्यावर ते हसले. म्हणाले, "मी तुम्हांला अकरा लाख रुपये देतो." तेव्हा माझ्याकडं चाळीस हजार रुपये जमा झाले होते. 10 लाखाच्या बजेटपैकी 11 लाख माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती आणि क्षणभर मला तो मोह झालाही की यामुळं आपले सगळे प्रश्‍न सुटतील. तेही तसंच म्हणाले. त्यांचा हेतू चांगलाच होता. त्यांना प्रकल्प आवडला होता. ते म्हणाले,"तुम्ही कशाला वणवण दारोदार भटकताय? पैसेच हवेत ना तुम्हांला आम्ही देतो. तुम्ही एक मेला हे गाणं आम्हांला द्या." पण माझ्या मनात विचार आला की, "पैसे मिळतील, प्रश्‍न सुटतील. पण मनात जो हेतू आहे लोक जोडण्याचा, तो पूर्णत्वास जाणार नाही. ते शिवसेनेचं गाणं होईल." मी तसं उद्धव ठाकरे यांना सांगितलं. म्हटलं, "सर, तुम्ही पाचशे रुपये दिलेत आम्हांला तर हवेच आहेत." आता राजकारणी नकोत, असं म्हणायचे दिवस गेलेत. कुणालाही बाहेर ठेवायचं नाही. आता सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. म्हणूनच मनसे, शिवसेना, कॉंग्रेसचे - सगळ्यांचेच कार्यकर्ते पाचशे रुपये देतात. अशा प्रकारची ही सगळ्यांची मदत आणखी कुठं मिळणार? ही मंडळीही कुठं एकत्र दिसणार?, असं मला वाटतं. म्हणून मी उद्धवजींना म्हटलं की ,"यात पुढाकार सामान्य माणसाचाच राहावा. तुम्ही पुढाऱ्यांनी आमच्या मागं उभं रहावं. आमची उमेदही वाढेल." ते म्हणाले,"तुमचं म्हणणं मला पटतंय. शिवसेनेकरता हा प्रकल्प मागितला कारण हा चांगला प्रकल्प आहे. आम्हांला आवडलं असतं. पण तुम्ही म्हणाल तशी आम्ही तुम्हांला मदत करू." त्यामुळं मग शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती नि कार्यकर्त्यांपर्यंत
पोचायला त्यांनी मदत केली. अशीच मदत मनसेच्या रमेश प्रभूंनी केली. त्यांनी त्यांच्या परिसरातल्या लोकांना प्रकल्पाची माहिती सांगितली. या गाण्यामध्ये शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा हातभार लागला, जे कोणत्याही व्यासपीठावर शक्‍य झालं नसतं. असं होत होत पैशांचा प्रश्‍न सुटू लागला. ठरवलं होतं त्याच मार्गानं आम्ही जात होतो. पण वेळ लागला. आधी 1मे 2009 रोजी सीडीचं प्रकाशन करायचं होतं, पण तेव्हा अर्धेही पैसे जमले नव्हते. अनेक अडीअडचणी येत गेल्या. शिवाय सगळ्या गायकांपर्यंत पोचेपर्यंतही काही काळ गेला. गायक-वादकांना प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. मग आम्ही चार दिवस मुंबईचा मोठ्ठा स्टुडिओ- आजीवसन स्टुडिओ बुक केला. एखाद्या मतदान केंद्रासारखं चाललं होतं- गायकाला वेळ असेल, तेव्हा त्यानं यावं नि त्याची ओळ गाऊन जावी. तिथल्या फ्लोअर मॅनेजरनं माझा सहकारी मंदार गोगटेला विचारलं की, हा काय प्रकार आहे? एवढे मोठमोठे गायक येतायत नि तुम्हांलाच पैसे देतायत, हे कसं काय? मग त्यालाही सांगितलं. बऱ्याच गायकांनी पैसे तर घेतले नाही, उलट काहींनी पाचशे-पाचशे रुपये काढून दिले होते... 10 नोव्हेंबरला सुचलेल्या या प्रकल्पाला जवळपास सव्वा वर्ष होतंय. साकारतंय एक अभिनवगीत... मराठी अभिमानगीत...

No comments:

Post a Comment