Thursday, April 29, 2010

श्रीमंत गाणं (भाग 4)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे


"मराठी अभिमान गीता"चं संगीत कसं आकारलं ?
- मराठी अभिमान गीता"च्या संगीताची प्रक्रिया अतिशय इंटरेस्टिंग होती. आर. डी. बर्मन म्हणायचा की, "चाल केली म्हणजे गाणं होत नाही. त्यावर काही संस्कार करावे लागतात." त्याचाच नेमका शब्द आहे "नर्चर करावं लागतं". तशी संधी या गाण्याच्याबाबतीत आपोआपच मिळाली. कारण वर्षभर एक गाणं करणं हा समृद्ध करणारा अनुभव होता. काय होतं की, तुम्ही ती चाल मनात रेंगाळू देता मनात. पहिल्या दोन ओळी केल्यानंतर खूप वेळ गेला. त्यामुळं चाल मनात रेंगाळत होती. बऱ्याचदा लोकांना वाटतं की हा काहीच करत नाहीये. दोन ओळी करून बसलाय आपला. तर ते तसं नसतं. आपण इतर काही गोष्टी करत असलो तरीही त्याचा विचार सतत आंतरमनात कुठंतरी चालू असतो आणि ते एका क्षणी सुचतं. सुचायला तो एकच क्षण असतो, पण त्याच्यावरचं जे सतत चालणारं काम असतं, ते वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये चालू असतं. तसंच या गाण्याबद्दल झालं, जे शब्दांत सांगणं कठीण आहे. "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी" याचा सूर कसा असावा, यावर विचार झाला. नंतर बऱ्याच लोकांनी गाणं ऐकल्यावर सांगितलं की आमचं रक्त सळसळत नाही हे गाणं ऐकून ! हे रक्त सळसळण्याचं गाणं नाहीच. ते आनंदाचं गाणं आहे. मराठी म्हटल्यावर फक्त शिवाजी नि तलवारच का आठवावी? मराठी ही सुंदर नि प्रेम व्यक्त करणारीही भाषा आहे. सुरुवातीला चाल ऐकल्यावर नि नंतर पूर्ण गाणं बसल्यावर ते ऐकणाऱ्या माझ्या मित्रांना हे पटलं. कारण मला ते मिलिटन्ट होऊ द्यायचं नव्हतं.
"रुपगंधा" या पुस्तकात ही कविता आहे. त्या पुस्तकात जी कविता आहे, त्यात सुरेश भटांनी नंतर चार ओळी वाढवल्या होत्या. त्या ओळी होत्या- "पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. आपुल्या घरीच हाल सोसते मराठी. हे असे कितीक खेळ पाहते मराठी. शेवटी मदांध तख्त फोडते मराठी." या रक्त सळसळणाऱ्या ओळी आहेत. पण "अभिमान गीतात" त्या असाव्यात की नाहीत, याबद्दल माझ्या मनात खूप द्वंद्व झालं. याला मी चाल केली. पण हे गाण्यात घ्यावं का, ते रत नव्हतं. "पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. आपुल्या घरीच हाल सोसते मराठी" या अीो आहेत, चिरंतन राहाव्यात का? अभिमन गीत का करावं, तर ते चिरंतन रहावं म्हणून. ही परिस्थिती सत्य आहेही. पण ती असावी नि रहावी, असं कुणालाच वाटणार नाही. त्यामुळं याबद्दल खूप विचार करून शेवटी मी ते गाळलं. याला दोन कारणं होती- "संयुक्त महाराष्ट्र चळवळी"च्या वेळी ही कविता लिहिली गेलेय. तेव्हा भटांनी या ओळी लिहिल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांनी त्या लिहिल्या. त्यामुळं एका अर्थाने जी मूळ कविता होती तीच ठेवणं मला श्रेयस वाटलं. दुसरं म्हणजे ही परिस्थिती काही चिरंतन नाहीये नि ती नसावीही, म्हणूनसुद्धा मी ध्वनिमुद्रणामध्ये या ओळी घेतल्या नाहीत. मी काही वेळा कार्यक्रमांतून त्या म्हणतो. तेव्हा टाळ्याही पडतात. पण टाळ्या पडू नयेत खरंतर. कारण ही अभिमान वाटावी अशी गोष्ट नाहीये... हा सगळा विचार करताना रात्रीची झोप उडाली होती की लिहिलेल्या ओळी गाळाव्यात का नाही?...
कवितेच्या ओळी गाळण्याबाबतची एक आठवण आहे. कुसुमाजांच्या "पृथ्वीचं प्रेमगीत"ला मी चाल केली होती. त्यातलं शेवटचं कडवं मी गाळलं. ते होतं- "अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्‌, मला ज्ञात मी एक धुलि:कण, अलंकारण्याला परी पाय तुझे. धुळीचेच आहे मला भूषण." पुढं मी कुसुमाग्रजांकडं गेलो असताना त्यांना "नवलाख तळपती"ची चाल ऐकवली. ते म्हणाले ,"वा छान. आणिक काय केलंयस तू माझ्या कवितांपैकी?" मी अगदी घाबरत म्हणालो, "पृथ्वीचं प्रेमगीत" केलंय." ते म्हणाले,"ऐकव." मी ते ऐकवलं. अत्यंत शांतपणं ते ऐकत होते. शेवटचं कडवं न घेता मी गायलो, तेव्हा ते उठले नि मला मिठी मारली. म्हणाले, "फार सुरेख चाल केलेस तू. फक्त एकच विचारू का, शेवटचं कडवं का गाळलंस?" या प्रश्‍नाची मला भीती वाटत होती, कारण आपण कवीसमोरच त्याच्या कवितेचं शेवटचं कडवं म्हटलं नव्हतं. मी म्हटलं, "मी सांगतो. माझं चुकत असेल तर मला सांगा. मला वाटतं की या ओळी तात्पर्यासारख्या येतात. संगीतात एखादी गोष्ट येते, तेव्हा तात्पर्य सांगायची गरज राहत नाही. म्हणून मी ते गाळलं. "गमे की तुझ्या रुद्र रुपात जावे, मिळोनी गळा घालुनिया गळा, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा", याच ओळीवर या गाण्याला सुंदर अंत मिळतो." यावर त्यांनी क्षणभर विचार केला नि म्हणाले, "तुम्ही तसंच ठेवा." तो माझ्या आयुष्यातला खूप काही शिकण्यासारखा अनुभव होता. आपल्या कलाकृतीकडं तटस्थ राहून बघायला या लोकांकडून शिकलं पाहिजे, असं वाटलं. तसाच विचार भटांच्या कवितेच्या ओळी गाळताना येत होता, की असं आपण करू शकतो का? विचारचक्र चालूच होतं. सुरेश भटांचे चिरंजिव चित्तरंजन भट त्यांच्याशी मी याविषयी बोलत होतो. ते म्हणाले, "तू हवं तसं कर." बऱ्याच लोकांशी मी यावर चर्चा केली. उलटसुलट मतं होती. शेवटचं कडवं म्हटल्यावर टाळ्या यायच्या. त्यामुळं जवळच्या मित्रांचं म्हणणं होतं, तू घे
च ते. शेवटी मी निर्णय घेतला की नाही घ्यायचं. तो एक फार कठीण निर्णय होता.
सुरुवातीला जवळपास 120 गायकांची यादी काढली होती. त्यातले 112 गायले. 24 ओळी असल्याने चांगल्या गायकांना तुम्ही पाच-सहाजण मिळून एक ओळ गा, असं सांगण्याची कठीण वेळ माझ्यावर येणार होती. सगळ्यांच्या सोलो ओळी नाही ठेवता येणार, पण या अभिमान गीतातला त्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असेल, असं वाटलं. हे असं वाटतं हे ज्येष्ठ गायकांना सांगणं तर फारच कठीण होतं. पण ते सांगितल्यावर सगळ्यांनी छान सहकार्य केलं. कुठल्या गायकानं कुठली ओळ गावी, याबद्दल खूप विचार झाला. गाणं आख्खं लिहून काढलं. कुठली ओळी किती वेळा येणार तेही लिहिलं. पुरुष-स्त्री, पुरुष-स्त्री, कोरसमध्ये अशी विभागणी केली. त्याच्या कमलेश भडकमकर, मिथिलेश पाटणकर, मंदार गोगटे नि मी अशा चारजणांत प्रती वाटल्या. गायकांची यादी देऊन प्रत्येकाला मतस्वातंत्र्य दिलं. मग त्यातल्या समान ओळी-गायक कोणत्या ते ठरवलं. त्यात काही वेगळेपणा असेल तर तसं का, अशी चर्चा करण्यात बरेच दिवस गेले. पहिली ओळ ठरली ती अमूकच गायकानं गावी- ती म्हणजे मुग्धा वैशंपायन या चिमुडीची ! मला सगळ्या गाण्याचा ग्राफ पहिल्यापासून दिसत होताच. सगळे एकत्र ओळ गातील, तेव्हा क्षणिक शांततेनंतर एका लहान मूलाचा आवाज यावा, तो मुग्धाचा असावा, असं वाटलं. सगळ्या गायकांना एकेक ओळ आहे. फक्त मुग्धा, आर्या, रोहित, प्रथमेश नि कार्तिकी यांना तीन ओळी आहेत. कारण शेवटी आपल्याला पुढं बघायचंय, मराठी टिकवणारे ते आहेत. त्यांच्या मनात आत्तापासून मराठीबद्दल आत्मीयता निर्माण झाली नि न्यूनगंड नसेल तर आपण जिंकलो ! यातून बऱ्याच गोष्टी सुचवल्या जातात, की आपण पुढं बघतोय. तरुण पिढी गातेय, त्याचा त्यांना अभिमान नि आनंद आहे. जुन्यामध्ये रेंगाळून उपयोग नाही, तर नवीन पाहिलं पाहिजे, हेही दिसतं, जे महत्त्वाचं आहे. काही ओळी लागोपाठ होत्या. उदाहरणार्थ- "आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुला
फुलात हासते मराठी." पकी पहिली ओळ जरा सिनिअर गायिकांनी गायली तर त्यातूनही बऱ्याच गोष्टी सुचवल्या जातात. एक आईपण येतं, कुटुंबाचं फिलिंग येतं. ही ओळ संगीत चितळे, अनुजा वर्तक, वर्षा भावे नि भाग्यश्री मुळे यांनी गायलेय. पुढची ओळ तरुण मुलींनी गावी, म्हणून अनघा ढोमसे, सायली ओक, आनंदी जोशी न मधुरा कुंभार यांना दिली. आवाजातून यातला फरक कळतो नि त्याची लगेच गंमत कळते. पहिली ओळ कुणाच्या आवाजात असावी? यावर विचार चालू होता. खरंतर पहिली ओळ लताबाईंनी गावी, असं माझ्या खूप मनात होतं. त्यांना विचारलं तेव्हा त्यांचं ऑपरेशन झालं होतं, नंतरही आम्ही प्रयत्न केले, पण तेव्हा नाही जमलं. पण मग कुणाचा आवाज? तर तो "मराठी " आवाज असावा. "मराठी" म्हटल्यावर कोण आठवतात, तर रवींद्र साठे ! मग त्यांनी ती पहिली ओळ गायली. असं ते एकेक एकेक ओळीचा विचार ठरत गेलं. मग "आमुच्या घराघरात वाढते मराठी"त माधव भागवत-सुचित्रा भागवत. "येथल्या कळीकळीत लाजते मराठी"यासाठी एक तरुण गायिकाच पाहिजे. "येथल्या तरुलतात साजते मराठी"साठी अगदी टिनएजर मुलीपेक्षा थोडी मोठी गायिका पाहिजे, असं ते सगळं ठरत गेलं. "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी"साठी फोकचा आवाज हवा. त्यात उमप बंधू,अशोक हांडे, अच्युत ठाकूर नि अजय-अतुल गायलेत. "येथल्या वनावनात गुंजते मराठी" या ओळीसाठी ज्याच्या आवाजात वजन नि गुंजन आहे, तो हवा. मग शंकर महादेवनचा आवाज वापरला. ते सगळं विचारपूर्वक घडत गेलं. मग आर. डी. बर्मन जे म्हणतो, की गाण्यावर संस्कार झाले पाहिजेत, तर एरवी ते फक्त संगीतकारांकडून होतात. इथं अनेक संगीतकारांचे अनेक गायकांचे संस्कार या गाण्यावर होत गेले. म्हणून ते अत्यंत श्रीमंत गाणं झालंय, ते केवळ सुरेश भटांचे शब्द आणि इतक्‍या सगळ्या लोकांच्या मनापासून असणाऱ्या इन्व्हॉलमेंटमुळं...

No comments:

Post a Comment