Thursday, April 29, 2010

कोण म्हणतो मराठी गाणी डाऊनमार्केट? (भाग 2)

संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्याशी या मराठी अभिमानगीताविषयी साधलेला संवाद.
मुलाखत- राधिका कुंटे


तुमच्या मनात मराठी भाषेविषयीची भावना रुजली हे खरं. पण मग भवताली असं काय घडत होतं की ज्यानं तुम्ही अस्वस्थ झालात? अशा कोणत्या घटना घडल्या ज्यांनी मराठी भाषेच्या अस्तत्वावर ओरखडा उमटला?

- मराठी भाषा मनात रुजल्यावर तिच्याबाबत मी अधिक सजग होऊ लागलो. भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज येऊ लागला. उदाहरणच द्यायचं झालं तर दादरसारखं खूप मराठी माणसं असणारं ठिकाणसुद्धा बदलत होतं. म्हणजे फक्त भाषाच नाही, मराठी संस्कृतीचं एक वातावरण असतं तेही हळूहळू बदलू लागलं होतं. मुंबईचं लखनौ झालं तरी काही हरकत नाही पण ज्याची काहीच संस्कृती नाही, असं एक मोनोकल्चरल तयार होऊ लागलं होतं. त्यानं मी प अस्वस्थ होत होतो. नवीन मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला म्हणावी तेवढी गर्दी होत नाही. मराठी माणूस नॉस्टेलजियातच अधिक रमतो. नवीन रचना मराठी प्रेक्षकांना अजिबात आवडत नव्हत्या, असं नाही. पण कार्यक्रमाला एका ठराविक वयाचेच प्रेक्षक असत. दुसरीकडं केदार पंडित, सलील कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, अजय-अतुल, अवधूत गुप्ते, मिलिंद जोशी अशी नवीन रचनाकारांची पिढी तयार होत होती.
झ्या असं लक्षात आलं की माझ्याहून लहान असणाऱ्या मुलांना मराठी बोलण्याचा एक प्रकारचा गंड आहे. आख्ख्या पिढीचा मातृभाषेशी हवा तेवढा संपर्क नाही. साधं उदाहरण घ्या- महाराष्ट्रगीत आणि त्याची किमान माहिती आपल्यापैकी कितीजणांना असते? हे विचार डोक्‍यात येत होतेच. सोबत घडत होत्या अगदी छोट्या वाटणाऱ्या घटना... लग्नासाठी ब्लेझर खरेदीला मी हुतात्मा चौकात गेलो होतो. तिथल्या दुकानातल्या म्हताऱ्या सेल्समनला मराठी माहित असेल या हिशोबानं मी विचारलं की,"ब्लेझर्स कुठं मिळतील?" त्यांनी "ऑ?" केलं. मी पुन्हा विचारल्यावर त्यांनीं माझ्याकडं एक दृष्टिक्षेप टाकला नि दिशा दाखवली. मी वळलो नि त्यांनीं त्यांच्या असिस्टंटला सांगितलं - "नजर रखना!" मग माझ्या ते लक्षात आलं हे केवळ मराठी बोलण्यामुळं झालं. मी काही केवळ या एका घटनेवरून निष्कर्ष काढत नाही. पण मला हा अनुभव आला याचं काय करायचं? असा अपमान कुणाचाही होतो, पण तो का झाला याचा मला तर्क नको का लावायला? हळूहळू ही परिस्थिती मला सगळीकडं जाणवायला लागली. टॅक्‍सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, भाजीवाले... दैनंदिन व्यवहारात मी मराठी बोलतोय म्हणजे चुकीचं करतोय, असा फिल देऊ लागले. त्यात मराठीभाषिकही होते. भाषा टिकायची असेल तर टिकेल नाही तर मरेल, असं काही लोक म्हणतात. त्यांना ते परवडणार असेल मला नाही. कारण मी त्या भाषेत काम करतोय. कारण आपल्यामागं एक परंपरा उभी आहे- मराठीची. मला काहीतरी केलं पाहिजे, असं मला वाटलं, हे या गीतामागचं मूळ कारण.
पहिला मुंबई फेस्टिव्हल 2005मध्ये झाला. त्याच्या उद्‌घाटन सोहळ्यात मी संगीतबद्ध केलेली प्रार्थना 63 मुलांनी म्हटली. त्या पाच मिनिटांच्या प्रार्थनेखेरीज नाना पाटेकरांचं भाषण वगळता मराठीचं एकही अक्षर त्या स्टेजवरून उच्चारलं गेलं नाही. मुंबई कॉस्मोपॉलिटिन शहर असलं तरी तिथं बहुसंख्य मराठी नागरिक आहेत ना? नंतरच्या फस्ट्‌÷िहललाही सगळे मराठी कार्यक्रम नर्दुला टॅंक मैदानावर झाले होते नि इतर कार्यक्रम गेट वेला झाले होते. अगदी काळाघोडा फेस्टिव्हलमध्येही मराठीला स्थान नव्हतं. इंग्रजी वृत्तपत्रांत मराठी सांस्कृतिक जगत कुठं येतच नाही. हल्ली काही इंग्रजी वृत्तपत्रांत या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण 27 फ्रेब्रुवारीच्या मराठी दिवसाचा उल्लेखही फारसा येत नाही. मराठी माणसाच्या विश्‍वात घडणाऱ्या घडामोडींची फारशी दखलही घेतली जात नाही, ही खंतही मनात होतीच.
एका रेडिओ स्टेशनसाठी काम करताना मराठी बेदखल होतेय, हे जाणवून तिथल्या अधिकाऱ्याला विचारलं की, "तुम्ही मराठी गाणी का नाही लावत?" तो म्हणला, "हमारी पॉलिसी हेै." पॉलिसी म्हणजे मुद्दामून अवलंबलेलं धोरण. मी म्हटलं,"काय आहे तुमची पॉलिसी?" तो म्हणाला,"मराठी गाणी लावायची नाहीत." महाराष्ट्रात राहून मराठी गाणी लावायची नाहीत, अशी पॉलिसी आहे? भारतातल्या इतर कुठल्या शहरात अशी पॉलिसी आहे? कोईमतूर ,कोलकत्ता, बंगलोरध्ये त्या त्या भाषेतली गाणी न लावायला तुम्ही धजावाल का?, असं विचारलं. तो फक्त हसला. माझ्या मनात आलं हीदेखील एक प्रकारची हिंसाच नाहीेए का? इथं स्थानिकांना कुणी जुमानत नाही. ही पॉलिसी ठरवून झालेय. मराठी गाण्यांसाठी रिक्वेस्ट आली तरीही ते ती गाणी लावत नव्हते. मी म्हटलं,"मुंबई कॉस्मॉपॉलिटिन आहे, असं म्हणता तरी तुम्ही सर्रास पंजाबी गाणी लावता. मग मराठी लावणार नाही अशी पॉलिसी का?" तो म्हणाला, "आमच्या वरिष्ठांना वाटतं की मराठी गाणं लावलं तर एक डाऊनमार्केट फिल येईल..." हे सगळं घडत असताना मनात विचार आला की आपण काय करू शकतो? मी संगीतकार आहे, मी गाणं करीन. एक मराठी अभिमानगीत असेल, ज्यामुळं काहीही डाऊनमार्केट वाटणार नाही. हे गीत एवढं मोठं करायचं की कुणाची टाप नाही होणार त्याला डाऊनमार्केट म्हणण्याची ! इतर कुणी नाही तरी मराठी माणूस बोलणार नाही. कारण मराठी भाषा जागतिक भाषा आहे. भारत, इस्त्रायल, अमेरिका नि मॉरिशिअसमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी बोलली जाते. एवढंच कशाला नासाने अंतराळात पाठवलेल्या यानात 51 भाषांत रेकॉर्ड केलेल्या भाषेत मराठी भाषेतल्या संदेशाचा समावेश केला आहे. मग ही भाषा डाऊनमार्केट कशी होईल? मधल्या काळात एक प्रसंग घडला व्होडाफोनबाबत. व्होडाफोनची अशी पॉलिसी होती की आम्ही मराठी बोलणार नाही, अशी पॉलिसी होती. अजूनही त्यांच्या काही हेल्पलाइन्स तसेच अडेलतट्ट
ू आहेत. अरेरावी करतात की आम्ही मराठी बोलणार नाही. "अगर आप को अंग्रेजी आती हैं तो उस में बोलिए नहीं तो हिंदी में बात किजिए" असं म्हणायचे. ही कुठली भाषा? असा विचार व्यक्त केल्यावर अनेकजण अनेकपरीनं मला समजावायचा प्रयत्न करतात. भाषा ही माणसाशी निगडित आहेच. ती वेगळी कशी काढणार? "मूळ भाषिकत्व हाच भारताच्या अखंडतेचा मोठा गुण आहे," असं शशी थरूर अलीकडंच म्हणाले होते. व्होडाफोनबद्दल मी ब्लॉगवर लिहिल्यावर व्होडाफोनने आठ दिवसांत मराठीत बोलणं सुरू केलंदेखील !

No comments:

Post a Comment