Wednesday, April 28, 2010

.... माय मानतो मराठी ! (भाग 7)

- राधिका कुंटे.

इन्ट्रो- "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी..." हे "मराठी अभिमानगीता"चे शब्द आता अनेक "मराठी"प्रेमी
घरांत गुंजत आहेत. कविवर्य सुरेश भटांच्या शब्दांतली ताकद आणि "संगीत" या माध्यमाचा प्रभाव यामुळं "मराठी"प्रेम सगळ्यांपर्यंत अतिशय प्रेमानं आणि एक प्रकारच्या "संगीतमय गांधिगिरी"नं पोहचलंय. सवरशिलेदार कौशल इनामदार यांच्या या "मराठी बाण्या"ला काय प्रतिसाद मिळाला ते वाचूया.
---
अभिमानगीताच्या सीडीच्या प्रकाशनानंतर "मराठीप्रेमीं"कडून तुम्हांला कसा प्रतिसाद मिळाला?

रसिकांकडून आणि "मराठीप्रेमीं"कडून "मराठी अभिमानगीता"ला चांगला प्रतिसाद मिळाला. उदंड प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं. पण इतका उदंड प्रतिसाद मिळेल, असं वटलं नव्हतं. "स्टार माझा"नं यु ट्युबवर हे गाणं अपलोड केलं असून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्‍या आहेत. खरंतर या गाण्यामुळं मला जो परिणाम अपेक्षित होता की- लोकांना "मराठी" असल्याचा अभिमान वाटावा, तो परिणाम दिसून येतोय. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरूनही या सीडीबद्दल विचारणा होतेय.
अपर्णा सुब्रमण्यम यांनी त्यांच्या ब्लॉगवर यु ट्युबची लिंक दिलेय आणि लिहिलंय की, "जे लोक महाराष्ट्रात राहतात पण त्यांची मातृभाषा वेगळी आहे, जशी माझी मातृभाषा तमीळ आहे, त्या लोकांचं त्यांच्या मातृभाषेवरचं प्रेम वाढणार आहे. माझंही तमीळवरचं प्रेम तीव्र झालंय. माझी आयडेंटिटी माझ्या लक्षात आलेय. त्याबद्दल मी या गीताचे आभार मानते." या गाण्याची लिंक तिनं अनेक दाक्षिणात्यांना फॉरवर्ड केलेय. चेन्नईतले संगीतकार टोनी जोसेफ यांनी मला इमेल केलाय की," हे काही फक्त मराठीचं गाणं नाहीये, तर ते अवघ्या भारताचं गाणं आहे." ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी सांगितलं की, "संगीतातली अशी मोठी कामगिरी जगात घडलेली नाही." पंडित सत्यशील देशपांडे आणि पंडित सुरेश तळवळकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली की, "या गाण्याचं सामाजिक मत्त्व एकीकडं आहेच, पण एक गाणं म्हणून ते त्यांना खूप आवडलं." संगीतातील या दिग्गजांची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी मोलाची नि आनंददायी ठरली.
लोकांकडून विशेषत: मला तरुणांकडून मराठी प्रेमाची जी अपेका होती, त्यांच्याही अतिशय बोलक्‍या प्रतिक्रिया येत आहेत. "हे खूप चांगलं नि मोठं काम केलंत" असं कौतुक तर अनेकांनी केलंय. शिवाय "आत्ताच्या राजकीय परिस्थितीत भाषेबद्दल एक कडवटपणा आल्यानं ती संघर्षाची ठरतेय. खरंतर लोक जोडणं हे भाषेचं काम आहे. ते या गाण्यानं केलंय..." अशी बोलकी प्रतिक्रियाही काहीजणांनी मला दिली.
या गाण्याच्या सीडीच्या प्रकाशनाच्या दिवशी साऱ्याच मान्यवरांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेत. ते मी नम्रपणं स्वीकारले. हा एवढा सगळा प्रवास केल्यावर आता असं वाटतं की श डोक्‍यात जात नाही, तर यशामुळं तुमच्यात एक विनम्रता आपोआप येते. यश कधीच एकट्याचं नसतं. त्यात अनेकजणांचा सहभाग असतो. म्हणूनच यश म्हणजे अनेक लोकांचं रसायन आहे, असं मला वाटतं नि आणखीनच विनम्र व्हायला होतं...
खरंतर हा सारा प्रतिसाद हेलावून टाकणारा होता. मला जो मराठीबाबतचा मुद्दा मांडायचा होता तो व्यवस्थित मांडला गेलाय. मराठी डाऊनमार्केट नाही उलट तिच्याआधारे एक विश्‍व उभं राहू शकतं, हेही लोकांना कळू लागलंय. भारत सगळ्यांचा, मुंबई सगळ्यांची तशीच मराठीही सगळ्यांची हा मुद्दा अतिशय चांगल्या तऱ्हेनं आणि प्रेमानं पोहचलाय. तो पोहचवण्याचं माध्यम होतं संगीत... म्हणूनच त्या संगीताचा मोठेपणा नि कविवर्य सुरेश भटांच्या शब्दांतली ताकद यामुळं हे माध्यम प्रभावी ठरलंय. ही एक प्रकारची "संगीतमय गांधिगिरी"च...

No comments:

Post a Comment